Akurdi : अभियांत्रिकी महाविद्यालयातून कुशल तंत्रज्ञ तयार व्हावेत – सुरेश गोसावी
एमपीसी न्यूज – सेमी कंडक्टरचे उत्पादन भारतात झाले (Akurdi) पाहिजे, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. त्यासाठी देशात नॅनो टेक्नॉलॉजीचा विकास तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयातून विकसित तंत्रज्ञान हाताळण्यासाठी कुशल तंत्रज्ञ तयार झाले पाहिजेत, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी व्यक्त केले.
पीसीईटीच्या आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरींग मध्ये ‘आयसीसीयुबीईए 2023 आणि आयमेस 2023’ या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी गोसावी बोलत होते. परिषदेचे उद्दिष्ट अभियांत्रिकी क्षेत्रातील सद्यस्थितीतील संशोधन, नाविन्य, विकास हे एका मंचावर आणणे असे आहे.
यावेळी डीआरडीओ, एआरडीईचे माजी संचालक अनिल दातार, आयईईई पुणे विभाग प्रमुख डॉ. सुरेखा देशमुख, मशिन मेकरचे कार्यकारी संचालक श्रीहरि शंकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे डॉ. मोहन चासकर, बल्गेरियन सायंटिफिक कौन्सिलच्या प्रमुख डॉ. कटिया वुतोवा, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. नीळकंठ चोपडे, परिषद प्रमुख डॉ. किशोर किनगे, डॉ. अजय गायकवाड आदी उपस्थित होते.
अनिल दातार म्हणाले की, कम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक (Akurdi) तंत्रज्ञान क्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे. देशाच्या संरक्षणा बरोबरच जनतेच्या भल्यासाठी विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे. पर्यावरण रक्षण, ध्वनिप्रदूषण, पृथ्वीचे संरक्षण, शेती या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर होतो आहे. देशातील नैसर्गिक संसाधने ही अमूल्य संपत्ती असून तीचा योग्य प्रकारे वापर केला पाहिजे.
विज्ञान तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून पर्यावरण बदलांचा अभ्यास करून ठोस उपाययोजना केली पाहिजे. आयईईईची स्थापना 2010 मध्ये झाली. संस्था पर्यावरण बदलांचा अभ्यास करून त्यावर उपाय योजना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहे असे डॉ. सुरेखा देशमुख यांनी सांगितले.
PMPML News : पीएमपीएमएलच्या सक्षमीकरणासाठी ‘पीएमपीएमएल प्रवासी मित्र’ उपक्रम
या परिषदेसाठी जगभरातून 1484 संशोधनपत्र प्रवेशिका आल्या. त्यापैकी 508 प्रवेशिकांची निवड करण्यात आली. यापैकी 14 संशोधनपत्र परदेशातून आले आहेत. यामध्ये युनायटेड स्टेट्स, बांगलादेश, श्रीलंका, सौदी अरेबिया, उजबेकीस्थान देशांचा समावेश आहे. तसेच मेक इन इंडिया अंतर्गत नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे प्रदर्शन आयोजित केले. यामध्ये 25 प्रकल्प सादर करण्यात आले.
स्वागतपर भाषणात डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी परिषदेच्या आयोजनाचा हेतू विशद केला. श्रीहरि शंकर, डॉ. किशोर किनगे, डॉ. अजय गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. अंजली श्रीवास्तव, प्रा. प्रफुल्ल शिनकर यांनी केले. डॉ संतोष सांबारे यांनी आभार मानले.