Charholi News : महाराष्ट्रातील गिर्यारोहकांच्या मी सदैव पाठीशी उभा – छत्रपती संभाजीराजे

एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांच्या 'सागरमाथा : गाथा एव्हरेस्टच्या विजयाची' पुस्तकाचे प्रकाशन.

एमपीसी न्यूज – भारतातील इतर राज्यामध्ये (Charholi News) एव्हरेस्टवीर अथवा इतर मोहिमवीर गिर्यारोहकांना भरीव आर्थिक मदत देण्यात येते. ती व्यवस्था महाराष्ट्रात नसावी, उलट शासनाने या साहसी खेळाचा समावेश पर्यटनामध्ये केला आहे, याविषयी आश्चर्य व्यक्त करून माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी यासाठी आपण गिर्यारोहकांच्या पाठीशी सदैव उभा राहणार असल्याचे स्पष्ट केले. सागरमाथा हे पुस्तक हे केवळ गिर्यारोहकांनाच नव्हे तर आव्हानात्मक काम करणाऱ्या प्रत्येकाला मार्गदर्शक ठरेल, असे छत्रपती संभाजी राजे यांनी गौरवोद्गार काढले.

एव्हरेस्टवीर श्रीहरी अशोक तापकीर यांच्या ‘सागरमाथा – गाथा एव्हरेस्टच्या विजयाची’ या पुस्तकाचे प्रकाशन संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गिर्यारोहक ऋषीकेश यादव होते. महाराष्ट्रातील पहिले एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण, ज्ञान आशा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अमित आंद्रे, ज्ञानेश्वर तापकीर, माजी महापौर नितिन काळजे, साहित्यिक व कामगार नेते अरूण बोऱ्हाडे आदी यावेळी उपस्थित होते.

एव्हरेस्टसारख्या शिखरावर चढाई करणे ही एक प्रकारची लढाईच आहे. कसलेल्या गिर्यारोहकांची जन्म मरणाची ही कसोटी असते, त्यामध्ये यशस्वी झाल्यानंतर या गिर्यारोहकांची शासकीय पातळीवर दखल घेतली जात नाही, हीच मोठी खंत आहे. वास्तविक गिर्यारोहण हा साहसी क्रीडाप्रकार आहे.

ते कार्य सामान्य व्यक्तीच्या कुवतीचे नाही. एव्हरेस्ट शिखरावर जावून भारताचा राष्ट्रध्वज उंचवणाऱ्या या खेळाडूंचा यथोचित सन्मान राज्य सरकारने करायला हवा. एवढेच नाही तर, त्यांना प्रोत्साहन देण्याची योजना असायला हवी. यासाठी आपण स्वतः शासनाकडे पाठपुरावा करू, असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले.

यावेळी सागरमाथा गिर्यारोहण संस्थेचे आणि ज्ञान आशा फाउंडेशनच्या संकेतस्थळांचे युवराज संभाजीरजे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

महाराष्ट्रातील पहिले गिर्यारोहक सुरेंद्र चव्हाण यांनी श्रीहरी तापकीर यांचे कौतुक करताना सामान्य शेतकरी कुटुंबातील हा युवक जिद्द, चिकाटी आणि प्रखर आत्मविश्वास याच्या बळावर जगातील सर्वोच्च शिखरावर चढाई करून थांबला नाही, तर आपल्या अनुभवाची शिदोरी नवीन गिर्यारोहकांना देत राहिला, असे गौरव उद्गार (Charholi News) काढले.

हृषिकेश यादव यांनी श्रीहरी तापकीर यांच्या पुस्तकातून प्रत्येक युवकाला जीवनातील कठीण प्रसंगाला धैर्याने सामोरे जाण्याचे मानसिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.अरुण बोऱ्हाडे यांनी प्रास्ताविक केले. श्रीहरी तापकीर, नितीन काळजे, ज्ञानेश्वर तापकीर, अमित आंद्रे यांनीही मनोगत व्यक्त केले.

Moshi : क्रिकेट स्टेडियमसह आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय क्रीडा संकुल; लेखाशिर्षामध्ये बदल

सागरमाथा गिर्यारोहण संस्था आणि ज्ञान – आशा फाउंडेशन या संस्थांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण, शरद कुलकर्णी, किशोर धनकुडे, भगवान चवले, लहू उघडे आणि सुविधा कडलग या गिर्यारोहकांचा संभाजीराजे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच दिवंगत गिर्यारोहक रमेश गुळवे आणि श्रीहरी तापकीर यांच्या माता पित्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास अनेक गिर्यारोहण क्षेत्रातील मान्यवरांसह ज्ञानेश्वर मोळक, बी.आर. मेहता, बाळासाहेब पाटील, विनायक खोत, निलेश गावडे, ब.हि. चिंचवडे, यश मस्करे, विलास मडेगिरी, विनया तापकीर, सुवर्णा बुर्डे, सचिन तापकीर, कुणाल तापकीर, संदीप तापकीर, सागरमाथा संस्थेचे अध्यक्ष प्रवीण हरपळे, सुमित दाभाडे, पांडुरंग शिंदे इत्यादी उपस्थित होते. नाना शिवले यांनी सूत्रसंचालन केले. सचिव प्रशांत पवार यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.