किंग ऑफ रिदम… किंग ऑफ मेलडी…… ओ.पी.नय्यर

(सतीश व. वैद्य)

एमपीसी न्यूज- ओ.पी.नय्यर म्हणजे सुरांचा बादशहा. त्यापेक्षाही किंग ऑफ रिदम… किंग ऑफ मेलडी म्हणून त्यांची खरी ओळख. 16 जानेवारी ही जन्मतारीख व 28 जानेवारी प्रयाण..असल्यामुळे या महिन्यात ओपींच्या आठवणींना उजाळा…..

1958 सालीं आलेल्या “मुजरीम”नावाच्या चित्रपटाचे पोस्टरवर जाहिरातीमध्ये लिहिले होते..”सूरोंके जादूगर….ओ.पी.नय्यर” व विशेष म्हणजे त्या आधी आणि नंतर कधीही असे घडले नाही की एखाद्या पोस्टरवर, जाहिरातीमध्ये त्या सिनेमाच्या संगीत दिग्दर्शकाच चित्र छापलय ! पण या मुजरीमच्या पोस्टरवर वरील घोषवाक्याखाली ओ.पीं.चा मोठा फूलसाईज फोटो व ते स्वतः पियानोजवळ उभे आहेत.असं ते होतं.

अति संवेदनशील स्वभाव- खरं म्हणजे त्यांचा स्वभाव कोणालाच कळला नाही. वागणं अगदी extreme असे. एखाद्यावर प्रेम केल तर त्याला सर्वस्व देतील पण राग आला की जिभेला हाड नसल्यासारख वाट्टेल ते बोलत, कसाही अपमान करत. काही वेळाने मग स्वतःलाच वाईट वाटे. आपली चूक कळायची,राग अनावर झालेला कळायचा. पण त्यांचा इगो फार मोठा होता. आतून जरी वाईट वाटत असलं तरी आपण होऊन नमतं घेऊन दुखावलेल्या माणसाची क्षमा कधी मागीतली नाही. I am sorry असं कधी म्हटलं नाही. जो हो गया सो हो गया। त्या बद्दल नो रीग्रेटस्. हा स्वाभिमान की गर्व की “झाल गेल विसरून जावं” हे कुणाला कळले नाही. स्वतः खरेपणाने वागले. शिस्तिबद्दल व स्वतःच्या खरेपणाबद्दल अतिदक्ष ! फाजील अभिमान!अंतर्मनान चूक कबूल केली तरी मी कसा बरोबर होतो ते पटवून द्यायचा प्रयत्न असायचा. ह्या वागण्यान लोक त्याना पागल महापागल म्हणायचे. खूद्द अनिल विश्वास यांनी एका जाहीर कार्यक्रमात ओ.पी.आणि सलील चौधरी यांना महापागल म्हटलं होत. पण त्याचबरोबर ये दोनो स्वयंभू महान कलाकार संगीतकार हैं और अपनी विशेष जगह बनाके रखें हूए हैं। असही म्हटलं होत.

ओ.पी.च वागणं कधी एकदम बालीश तर कधी एकदम फाॅर्मल असे. स्वतःच स्वतःविषयी दिलखुलासपणे म्हणायचे यार ओ.पी.का मतलब जानते हो ?” ऊल्लूका पठ्ठा“.. आपल्या बालगंधर्वांसारखे लॅव्हीश लाईफ जगले. पैसा भरपूर कमावला तसाच खर्चही केला. त्या काळी एका सिनेमाचे एक लाख रूपये घेणारा एकमेव संगीतकार ! मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह सारख्या ठिकाणी आलिशान फ्लॅट. इंपाला गाडी घेण्यापूर्वी एक टॅक्सी सकाळी सात वाजल्यापासून रात्री 11वाजे पर्यंत भाड्याने घेत. शोफर ड्रिव्हन गाडीसारखी ती टॅक्सी इमारतीजवळ उभी असायची. तेव्हां मित्रांच्पा आग्रहाखातर गाडी घेतली तर ती पण त्याकाळातली सर्वात महागडी व आलीशान…इंपाला!!

त्याकाळी वादक मंडळींच्या बिदागीविषयी काहीच नियम सूसूत्रता नसायची. कोण किती मानधन देईल ते त्यांना माहीत नसायच व त्यांना मानाची वागणूक नसायची. कधीकधी मानधन बुडवलं जायच. कोणाचा अंकुश नाही. जे काही मिळेल ते बिचारे स्वीकारायचे. पण ओ.पीं.नी याची दखल घेतली. सर्व गायक वादकांना रेकाॅर्डींग झाल की त्या त्या वेळेस लगेच शूभ्र पाकीटावर सोनेरी अक्षरात ”From the desk of OP” अस लिहीलेल, झेप घेणारा गुलाबी पक्षी, मासे व स्वरलिपीच्या खूणा असणार मानान मानधनाच पाकीट देणारा एकमेव संगीत दिग्दर्शक ! एवढेच काय पण तालमीच्या वेळी वादकांना सांगत”मै जानता हूं ये साज तुम्हारी जान है। तुम रेल्वेलोकल, बस की भीडमें मत आवो. मै तुम्हे टॅक्सीभाडा दूंगा।” तालमीचे वेळीही वादकांना टॅक्सीभाड देणारा एकमेव ओ.पी.

जी.एस.कोहली र्हिदम साईड आणि सॅबी म्हणजे गोव्याचा सॅबेस्टीयन मेलडी, आॅर्केस्ट्रेशन असे दोन जबरदस्त असि.मूझीक डायरेक्टर्स. बाकी साथीला मोठमोठे कलाकार पं.रामनारायण, पं.शीवकुमार, पं.हरिप्रसाद, हजारा सिंग सारखे दिग्गजांना बोलवायचे. जे काही करायच ते एकदम टाॅप क्लासच करायच आणि करून दाखवल. सुरवातीला थोड काँप्रोमाईज केल पण 1954 च्या आरपार नंतर सर्व काम आपल्या अटींवर केलं. निर्माते दिग्दर्शक मंडळींना संगीताच्या बाजूबद्दल ‘ही चाल अशी नको अशी करा, हेशब्द बरोबर नाहीत, गाणंअस नको अस करा वगैरे सांगायची हिंमत नसायची. मूळ कथा, वेगवेगळे प्रसंग, सीच्यूएशन या सर्वाबरोबर जाणार संगीतच ते देत.

1949 साली मुंबईला काम शोधायला आल्यावर पहिल फिल्मीस्तानच्या एस.मुखर्जीना भेटले. आपल काही संगीत ऐकवल पण ते म्हणाले ‘इसमें कूछ दम नही है। तुम वापस अपने गांव चले जाओ। यहाँ अपना टाईम मत वेस्ट करो, तुम संगीतकार नही बन सकते।’ दहा अकरा वर्षानंतर त्याच मुखर्जींनी भरपूर पैसा व मान देऊन ‘एक मुसाफिर एक हसीना’ साठी बोलावल. तर…1950 चे सुमारास ओ.पी.नी संगीतबद्ध केलेल एक गैरफिल्मी गाण सी.एच. आत्माकडून रेकाॅर्ड करून घेतल होत ‘प्रीतम आन मिलो ‘हे खूप लोकप्रिय झाल होत. गाण छानच आहे. अजूनही लोकांना आवडत. या प्रायव्हेट गाण्याबरोबरच ओ.पी.नी दोन सिनेमे देखील केले होते लो बजेटचे. त्या पैकी एक आसमान. यात गीता राॅयकडून एक गीत खूप गाजल होत. पण गीता राॅय जी नंतर गीता दत्त झाली तिला ते ‘प्रीतम आन मिलो’ आवडल होत व ओ.पी.ची संगीताची स्टाईल खूप आवडली होती. जेव्हां ‘आरपार’ बनवायचा विचार गुरूदत्त करत होता तेव्हां त्याची बायको गीताने ओ.पी.नय्यरना घेण्याचा आग्रह धरला व त्यांना पंजाबहून पुन्हा बोलावण्यात आले. आणि काय ? ‘आरपार’च्या संगीताने प्रचंड खळबळ माजवली. सर्वच्या सर्व गाणी सुपरहिट ठरली. ओ.पी.ना हवा तसा त्यांचे संगीताला साजेसा गीता दत्तचा आवाज,रफी साहेब,चित्रपटातील माहोल या सर्वाला साजेस संगीत यामुळे आरपार सूपरहिट झाला व गुरूदत्तशी घट्ट मैत्री झाली.नंतर परत चार पाच वर्षांची गॅप गेली पण १९56 मधे सीआय डी,57 ला नयादौर मग तर काय एकाहून एक सरस रचना केल्या. संगीताचे बादशहा झाले.

जवळपास 72 चित्रपटांना संगीत दिलं. सी आय डी, Mr.&Mrs.55, फागून, रागीणी, कल्पना, माईल स्टोन नयादौर,एक मुसाफिर एक हसीना, मेरे सनम, काश्मीरकी कली, फिर वही दिल लाया हूं, किस्मत, बहारे फिरभी…, सावनकी घटा, कीती नांव घेऊ? प्रत्येक सिनेमा फक्त ओपीं वर चालला. लोक म्हणायचे त्यांनी आपल टॅलेंट विश्वजित, जाॅयमुखर्जी, मनोजकुमार सारख्या सुमार हिरोंबरोबर फुकट घालवलं. त्यावेळच्या तीन बिग थ्री, देव दिलीप, राज यांच्या सिनेमांना एखादा अपवाद सोडला तर संगीत दिले नाही. नयादौरबद्दल मात्र दिलीपसाब खूप कौतूक करीत.ये देश है वीर जवानोंका, मै बंबईका बाबू दोन्ही गाणी एकदम भिन्न. पण रफींकडून काय चमत्कार करवून घेतलाय.

सिनेमात काॅमेडीयन नेहमी हिरोचा मित्र असायचा. गाणी मात्र फक्त हिरोच म्हणणार. असं का? ओपींनी सीआयडी “ऐं दिल है मूश्कील जीना यहाँ”पासून काॅमेडीयनला ,जाॅनी पासून गाण द्यायला सुरुवात करून तशी प्रथा पाडली. नंतर जाॅनी, मेहमूद,धुमाळ, आगा सर्वांनाच गाणी देणं सुरू झालं. पण हा प्रकार, ही प्रथा सूरू करणारे ओपी हे प्रथम होते.

आशा भोसले आणि ओपी. यांच्यावर शेकडो कहाण्या सापडतील. नयादौरच्या आधी आशाचा कधीही हिरोईनसाठी आवाज वापरला गेला नव्हता. लताची मोनापाॅली होती . त्यापेक्षा लतानं तशी संधी कोणाला घेऊ दिली नाही. ओपींनी लताकडून एकही गाण गाऊन न घेता तब्बल 72 सिनेमे हिट केले. नयादौरचे वेळी बी.आर. चोपडाना स्पष्ट सांगीतल. हिरोईनसाठी आशाच गाणार. सर्व गाणी हिट करून दाखवली. आशा व ओपीं यांच्या खासगी वैयक्तिक संबंध आणि व्यावसायिक संबंधाबद्दल सर्वांना माहिती आहेच. चौदा वर्ष एकत्र होते पण दोन्ही मोठे कलाकार तऱ्हेवाईक असतील तर ? शेवटी त्या संबंधामधे दरार पडलीच

“चैनसे हमको कभी “ बद्दलची गोष्ट आठवा. आशा सोडून गेली. 80 सालीं रफीसाहेब पैंगरवासी झाले. घरच्यांशी देखील संबंध बिघडले. नवद साली अक्षरशः अंगावरच्या वस्त्रानिशी बाहेर पडले. स्वतःच्य मुलांनी ती वेळ आणली. मुंबईजवळ विरार सारख्या ठिकाणी एका चाहत्याने आश्रय दिला. मधून मधून हैद्राबाद, पतियाळा, मुंबई अशी भटकंती करावी लागली पण तरीही त्यांच्या असंख्य चाहत्यांनी त्यांना कसली कमी पडू दिली नाही. त्यांची तशीच शान विमानानं अप्पर क्लासचा प्रवास फाईव्ह स्टार हाॅटेलस् ची व्यवस्था करून टिकवली. सगळ्यात शेवटी जायच्या अगोदर वर्ष दीड वर्षापूर्वी आपला जीव की प्राण बाजा विकावा लागला ! दुकान बंद !गाणं सपलं. जीवन संपलं 28 जानेवरी2007, लोकांना प्रेम देणारा …रोमॅटिक गाण्यांची बरसात करणारा “प्यारका राही “ हे जग सोडून अनंतात विलीन झाला.16 जानेवारी ही जन्म तारीख व 28 जानेवारी प्रयाण..असल्यामुळे या महिन्यात ओपींच्या आठवणींना उजाळा आशा आहे ओपीप्रेमींना आवडेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.