Mumbai News : शिपाई पद कायमस्वरुपी रद्द करण्याचा शालेय शिक्षण विभागाचा निर्णय !

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिपाई पद कायमस्वरुपी रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे येत्या काळात शिपायांच्या सुमारे 52 हजार नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे.

नवीन भरतीऐवजी शाळांना रोख स्वरुपात शिपाई भत्ता दिला जाणार आहे. यात शिपाई, नाईक, पहारेकरी, रात्रीचा पहारेकरी, सफाईगार, कामाठी, तेलवाला, हमाल, परिचर, चौकीदार, प्रयोगशाळा परिचर यांचा समावेश आहे.

सध्या कार्यरत असलेले चतुर्थ श्रेणी कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर ही पदे रद्द होतील. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा काही जणांनी निषेध केला आहे.

राज्यातील सर्व शासकीय, खाजगी शिक्षण संस्थांमध्ये असलेली शिपायांची पदे भरण्यात येणार नाहीत. तसेच यानंतर रिक्त पदे न भरता गरज असलेल्या ठिकाणी तात्पुरत्या मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीवर शिपाई दिला जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयावर काही स्तरातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.