Nigadi : युवकांनी दिला ‘सायकल चालवा, पर्यावरण वाचवा’ संदेश
पंधरा दिवसांत २३१३ किलोमीटर प्रवास पूर्ण
एमपीसी न्यूज – भगवान महावीर अहिंसा ट्रस्टच्या युवकांनी निगडी ते झारखंड असा सुमारे २३१३ किमीचा प्रवास १५ दिवसांत पूर्ण केला. भगवान महावीर अहिंसा ट्रस्ट निगडी प्राधिकरणाचे अध्यक्ष अजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा सायकल प्रवास करण्यात आला. प्रकाश शेडबाळे, सुदिन खोत, संजय नाईक, धनंजय शेडबाळे, धन्यकुमार चिंचवाडे या पाचजणांनी वाटेत जागोजागी ३०० रोपे आणि ५०० कापडी पिशव्या मोफत वाटल्या. प्रत्येक ठिकाणी “पर्यावरण वाचवा, प्लॅस्टिकमुक्त भारत आणि सायकल चालवा” असा संदेश दिला.
याबाबत अजित पाटील म्हणाले, अहिंसा, सद्वभावना आणि पर्यावरणाचा संदेश घेऊन हा प्रवास पूर्ण केला. मालगाव-मिरज मार्गे- सांगली-बाहुबली-कुंभोज-सातारमार्गे-पुणे-नगर-औरंगाबाद-लोणार-वर्धा-नागपूर-भंडारा-राजनांदगावहून छत्तीसगढमध्ये त्यांनी प्रवेश केला. आरंग-सराईपल्ली मार्गे उडिसामध्ये पोहचले. संबळपूर ओलांडून ते झारखंडमध्ये गेले. झारखंड राज्याचे मुख्य सचिव सुधीर रहाते यांनी पोलीस संरक्षण देऊन विशेष अतिथी म्हणून सत्कार केला.
- प्रकाश शेडबाळे, सुदिन खोत, संजय नाईक, धनंजय शेडबाळे, धन्यकुमार चिंचवाडे या पाच जणांनी वाटेत जागोजागी ३०० रोपे आणि ५०० कापडी पिशव्या मोफत वाटल्या. प्रत्येक ठिकाणी ‘पर्यावरण वाचवा, प्लॅस्टिकमुक्त भारत आणि सायकल चालावा” असा संदेश दिला. पंधरा दिवसात एकूण २३१३ किमीच्या या प्रवासात प्रतिसाद चांगला मिळाला.
झारखंड राज्याचे भारत पेट्रोलियम कार्पोरेशनचे प्रदेश व्यवस्थापक अभिजित पानारे यांनी मदत केली. एमआय़डीसीचे पुणे विभागाचे मुख्य अभियंता सुधाकर वाघ यांनी सर्व सायकलस्वारांचा सत्कार केला. भगवान महावीर अहिंसा ट्रस्ट, निगडी प्राधिकरणाच्या सर्व पदाधिका-यांनी या मोहिमेला पाठिंबा आणि मदत केली. यापूर्वीही प्रकाश शेडबाळे यांनी निगडी ते शिर्डी हे २२१ किमी अंतर एका दिवसात सायकलने पार केले. याचटिमने निगडी ते गोमटेश्वर (श्रवणबेळगोळ) हे ८७३ किमीचे अंतर सायकलने सहा दिवसांत पूर्ण केले.