Nigdi : मनामध्ये करुणा, दयाभाव आणि वात्सल्य नसेल तर धर्म हा बनावटी बनतो – साध्वी डॉ. संयमलताजी
एमपीसी न्यूज – ज्या व्यक्ती आत्मकल्याणाचे (Nigdi) साधन मानून धर्म आराधना करतात, त्यांना जीवनरूपी भवसागरातून मुक्त होण्याचा मार्ग सापडतो. सध्याचा मानव हा तप, त्याग आणि दान करताना प्रथम त्यापासून मिळणाऱ्या फळाची अपेक्षा करतो. त्यातून आपले नाव व्हावे, आपला कोणीतरी सत्कार करावा, अशी अभिलाषा असते. धर्माचा प्रकाश आता घरोघरी पोहोचवण्याची गरज आहे, असे विचार दक्षिण चंद्रिका साध्वी डॉ. संयमलताजी यांनी प्रकट केले.
निगडी-प्राधिकरण येथील पाटीदार भवनमध्ये जैन चातुर्मास निमित्त आयोजित प्रवचानात त्या बोलत होत्या. त्यावेळी उपस्थित जैन भाविकांना त्यांनी मार्गदर्शन केले.
धर्म हा स्वतःमध्ये दडलेला –
पुढे साध्वी डॉ. संयमलताजी म्हणाल्या, की ज्या वस्तूचा जो स्वभाव (Nigdi) आहे तोच त्याचा धर्म आहे. पाण्याचा स्वभाव थंड आहे. अग्नीचा स्वभाव हा उष्ण असतो. मिठामध्ये खारटपणा असतो तर साखरेत गोडपणा दडलेला असतो. त्याचप्रमाणे आपल्या आत्म्याचा देखील एक स्वभाव असतो. ज्ञाता दृष्टा भाव म्हणजे स्वतःला पाहणे, स्वतःला ओळखणे आणि स्वतःमध्येच मग्न होऊन जाणे हे त्यामध्ये अभिप्रेत आहे. मनामध्ये जर करुणा, दयाभाव आणि वात्सल्य नसेल तर तो धर्म हा बनावटी बनतो. धर्म स्वतःच्या बाहेर नाही तर स्वतःमध्ये दडलेला आहे.