PCMC : उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्यासाठी अभियान
एमपीसी न्यूज – प्रशासनातील (PCMC) सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ, लोकाभिमुखता व निर्णयशीलता आणण्याकरिता, सर्वाच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्यासाठी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान राबविण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार महापलिका आणि कर्मचाऱ्यांसाठी अभियान व स्पर्धा सन 2023-24 अंतर्गत राबविण्यात येणार आहे. या अभियानात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विभाग आणि कर्मचाऱ्यांनी 6 ऑक्टोबरपर्यंत माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे अर्ज करावेत, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी केले आहेत.
उत्तरदायी, सुलभ, पारदर्शी, आणि गतिमान प्रशासन कार्यान्वित करण्यासाठी महापालिका स्तरावर राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत सर्वोत्कृष्ट कल्पना, उपक्रम सुचविल्याबद्दल महापालिका, अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी प्रथम तीन क्रमांकाची पारितोषकाची रक्कम राज्य शासनाकडून देण्यात येणार आहेत.
महापालिका, अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी प्रथम क्रमांक-50 हजार, द्वितीय क्रमांकाला 30 हजार, तृतीय क्रमांकास 20 हजार रूपये बक्षीस देण्यात येणार आहे.
अभियानासाठी दीड महिन्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. तसेच गेल्या वर्षभरात विभाग आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामांचा व नावीन्यपूर्ण उपक्रमांचा देखील विचार करण्यात येणार आहे.
या बाबींचा समावेश असावा (PCMC)
नवीन संकल्पना असावी, संकल्पना अन्य संस्थेत वापरण्यात आलेली नसावी, पथदर्शी म्हणजे नवीन वाट दाखवणारा उपक्रम, नागरिकांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष फायदा, नाविन्यपूर्ण बदल लागू करून ते पुढील काळात चालू राहण्यासाठी, पालिका खर्चात बचत व उत्पन्नात वाढ होणारा उपक्रम आणि रोजगार मिळण्यास मदत होणारा उपक्रम असावा.