Maharashtra News : यशस्वी विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करावीत – दीपक केसरकर

एमपीसी न्यूज – दहावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांची शैक्षणिक दिशा ठरविणारा महत्त्वाचा टप्पा असतो.  या टप्प्यावर यश मिळविलेले विद्यार्थी कौतुकास पात्र आहेत, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करावीत, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

SSC Result : दहावी रिपिटरच्या निकालात पुणे विभाग दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण (Maharashtra News) मंडळाच्या दहावीच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. राज्यात एकूण 93.83 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून परीक्षेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थी, त्यांचे पालक व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षकांचे शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांनी अभिनंदन केले आहे, तर उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांनी नाउमेद न होता पुरवणी परीक्षेस प्रविष्ठ होऊन यश संपादन करावे, असे आवाहन केले आहे.

उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या

दहावीच्या परीक्षेत नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15 लाख 41 हजार 666 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15 लाख 29 हजार 096 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून 14 लाख 34 हजार 898 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची ही टक्केवारी 93.83 अशी आहे, तर पुनर्परीक्षार्थी (Maharashtra News) विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 60.90 अशी असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण उल्लेखनीय

नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 8,397 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 8,312 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले. त्यातील 7,688 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांच्या निकालाची टक्केवारी 92.49 अशी उल्लेखनीय आहे. या विद्यार्थ्यांचेही मंत्री श्री. केसरकर यांनी अभिनंदन केले आहे.

मुलींची आघाडी

सर्व विभागीय मंडळातून नियमित उत्तीर्ण मुलींची टक्केवारी 95.87 इतकी असून मुलांची टक्केवारी 92.05 इतकी आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा 3.82 टक्क्यांनी जास्त आहे.

दहावीच्या एकूण 25 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे, तर 23 हजार 013 शाळांपैकी 6,844 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. नियमित विद्यार्थ्यांपैकी 4 लाख 89 हजार 455 विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, तर 5 लाख 26 हजार 210 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण मंत्र्यांनी कौतुक केले आहे.

विभागीय मंडळनिहाय उत्तीर्ण विद्यार्थी

राज्यातील सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजेच 98.11 टक्के इतका असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 92.05 टक्के इतका आहे. या व्यतिरिक्त पुणे विभागात 95.64, औरंगाबाद विभागात 93.23, मुंबई विभागात 93.66, कोल्हापूर विभागात 96.73, अमरावती विभागात 93.22, नाशिक विभागात 92.22 आणि लातूर विभागात 92.67 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळामार्फत देण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.