New Delhi: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात टोलवसुली बंद ठेवण्याचा निर्णय
एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व टोलनाक्यांवरील टोलवसुली बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला आहे.
कोरोना नियंत्रणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलपर्यंत देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ कमी झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना परवानगी आहे. टोल नाक्यांवर या वाहनांचा काही वेळ जात असून तो वेळ वाचविण्यासाठी टोलवसुली बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्यांची गैरसोय कमी करण्याबरोबरच त्यांचा अमूल्य वेळ वाचविण्यासाठी टोलवसुली बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे गडकरी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. टोलवसुली बंद असली तरी रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे तसेच सुरक्षाविषयक यंत्रणा मात्र सुरूच आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.