Alandi : मराठी भाषेला प्राधान्य देऊन अन्य भाषेचा वापर केला तरी त्यास विरोध असणार नाही – डॉ.नागनाथ कोत्तापल्ले
एमपीसी न्यूज – भाषा समृद्ध होण्यासाठी विद्यार्थी शिक्षक,समाज, शासन आणि प्रशासनाचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. कुठलीही भाषा श्रीमंत होण्यासाठी शिक्षण, प्रशासन आणि ज्ञानव्यवहार संबंधित भाषेत होणे गरजेचे आहे. प्राथमिकपासून तर उच्च शिक्षणार्पयतचे शिक्षण मराठीतूनच असावे. सर्व ज्ञानशाखा मराठीत असाव्यात, तेव्हा भाषा समृद्ध होईल, मराठी भाषेला प्राधान्य देऊन इंग्रजी किंवा अन्य भाषेचा वापर केला तरी त्यास कोणाचाही विरोध असणार नाही. असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी आज येथे व्यक्त केले.
पुणे जिल्हा मराठी अध्यापक संघाच्या वतीने आयोजित आळंदीत राज्यस्तरीय चिंतन शिबिरात ‘मराठी भाषा काल आज आणि उद्या’ या विषयावर डॉ कोत्तापल्ले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज शिक्षणाधिकारी डॉ.भाऊसाहेब कारेकर होते. यावेळी माजी शिक्षक आमदार तु. ना. माताडे,मुख्याध्यापक संघाचे विश्वस्त अरुण थोरात,शिवाजी किलकीले, पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड, स्वागताध्यक्ष हनुमंत कुबडे, अध्यक्ष यशवंत बेंद्रे, शिक्षणतज्ज्ञ संपदा जोशी, स्वाती ताटफळे, भिकाजी कुलकर्णी, अजिता साने – सोनाले,डॉ.अनिल काळे, कविता कडू, कार्याध्यक्ष ज्ञानदेव दहिफळे, कार्यवाह अशोक तकटे, जिल्हा संघटक नाना शिवले, शंकर घोरपडे,संतोष काळे, सुरेश लोखंडे,कैलास घेनंद,विष्णु मुंजाळे आदी उपस्थित होते.
डॉ. कोत्तापल्ले पुढे म्हणाले, ज्ञानव्यवहार हे मातृभाषेतच व्हायला हवेत. तसेच प्रतिष्ठित लोक कोणती भाषा बोलतात. याचा प्रभाव समाजावर पडत असतो. त्यामुळे प्रतिष्ठितांनी मराठी भाषेचा वापर करावा.सर्व व्यवहार मराठीत असतील तर त्याचा भाषा समृद्धीसाठी फायदा होईल.तसेच दैनंदिन जीवनातही मातृभाषेचा वापर महत्त्वाचा आहे. शासनाकडून भाषेसाठी धोरणांची आखणी आणि अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. आमच्या पुढच्या पिढीचे काय होणार हा आजचा कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे भाषाविषयक धोरणांची कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. मराठीचा आग्रह धरून दुसऱ्या इतर कोणत्याही भाषा वापरास हरकत असणार नाही.’’ ही जबाबदारी विशेषतः मराठी भाषेचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी उचलली पाहिजे.
माधुरी जोशी, अनिल गुंजाळ, चित्रा सोहनी, हेमकिरण पत्की, डॉ. स्नेहा जोशी, डॉ. शिरीषा साठे, हभप चंद्रकांत वांजळे महाराज, कवी प्रवीण दवणे,लोककवी प्रशांत मोरे या मान्यवरांनी विविध विषयावर अतिशय प्रभावीपणे मार्गदर्शन केले.
अनिल गुंजाळ यांनी संवादाचा सेतु , भाषेचा शिक्षक या विषयावर संवाद साधला.विद्यार्थ्यांना कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा आहे हे त्याच्यावर सोपवावे असे सांगताना अनेक उदाहरणे दिली. मुलांना व्यक्त होऊ द्या.फुलू द्या.त्याच्याशी आणि त्याच्या पालकाशी मोकळेपणाने शिक्षकांनी संवाद साधायला हवा.
माधुरी जोशी यांनी या नवीन अभ्यासक्रम व अध्यापन पद्धती या विषयावर मार्गदर्शन करताना गुगलवरील एक लाख सहासष्ट हजार साईड्सचा उल्लेख करताना नेमके ज्ञान कसे निवडता येईल याविषयी सांगितले. पुस्तकाचा सखोल अभ्यास शिक्षकाने करावा हे ही महत्वाचे असल्याचे सांगितले.
डॉ. चित्रा सोहनी भाषेतून विचार विकास या विषयी आपले विचार मांडताना भाषणात मुलांनी संदर्भ पुस्तके वाचायला शिकले पाहिजे असे सांगताना शब्दावरून कविता मुले कशी करु शकतात याचा गमतीदार किस्सा ऐकवला.
वांजळे म्हणाले, संतांनी आपणास एकात्मतेची शिकवण दिली.सर्व विश्व सुखी व्हावे या संतांच्या व्यापक मागणीतून विद्यार्थ्यांच्या मनात भेदाच्या भिंती उभ्या राहू नयेत यासाठी शिक्षक, पालक यांनी सतत सजग राहिले पाहिजे. सुसंगती आणि सदाचार या गोष्टी विद्यार्थी मनावर रुजवायला हव्यात.
साहित्यिक हेमकिरण पत्की यांनी संवेदना गुणसुत्रातून येते त्यावर आपले स्वामीत्व नसल्याचे सांगताना भाषेचे मूलद्रव्य शब्द असल्याचे सांगितले. काही कवितांचा लक्षार्थ उलगडून दाखवला.कवितेवर प्रेम करणं म्हणजे जगण्यावर प्रेम करणं. रसास्वाद हा आकलनातून नवनिर्मितीकडे नेताे.विचार आणि भावनांची वाहनांची शक्ती ज्याच्याकड़े तो भाषा समृद्ध।
डाॅ स्नेहा जोशी यांनी कृतिपत्रिकेविषयी अतिशय सविस्तर मार्गदर्शन केले. बदललेल्या अभ्यासक्रमाबाबत शिक्षकांच्या शंकांचे निरसन केले. डॉ.शिरीषा साठे यांनी नकारात्मक भावना दूर्लक्षित करुन चालणार नाही हे सांगताना मेंदूच्या रचनेचा अतिशय सोप्या पद्धतीने उलगडा केला.मराठी भाषा विनोदाच्या माध्यमातून रुजवणे गरजेचे आहे.संवेदनशील विद्याथी घडवने आवश्यक असून शिक्षकांनी विद्यार्थी माणूस म्हणून तयार करा.
कवी प्रवीण दवणे यांनी भाषेची आनंदयात्रा कशी आनंदी होते हे विद्यार्थीदशेतील उदाहरणे देऊन स्पष्ट केले. कविता नंतर खुलते, आधी आपण खुलून यावे लागते, गाणे नंतर फुलते, आधी आपण गाणे व्हावे लागते. आनंददायी नाही ते शिक्षण कसले असाही सवाल करत पालकाला उत्तम शिक्षक होता आले पाहिजे अन् शिक्षकाला उत्तम पालक होता आलं पाहिजे हे आवर्जून सांगितले.भाषेचा आनंद हा जीवनाचा आनंद आहे.भाषा एक आकाश असून तिला विभागता येणार नाही.कागदावरच्या पुरस्कारापेक्षा काळजावरचे पुरस्कार महत्वाचेअसतात.आज शिक्षकाची उपेक्षा होते कारण समाज त्यांच्या उंची पर्यंत पोहचत नाही.
तर प्रशांत मोरे यांनी आईच्या कवितांतून आईविषयीचा प्रत्येकाचा गहिवर जागृत केला. कवितेतून विद्यार्थ्यांच्या मनात संवेदनशीलता विकसित करता येते असेही सांगितले.
कवितेची संवेदना तोच समजू शकतो जाच्या जवळ मातृहृदय आहे असे पुष्पा पाटील म्हणाल्या. तीन दिवस अशी सर्व ही सर्व सत्रे अतिशय प्रभावी होती. शिक्षक जागृतीला बळ देणारी होती.शेवटच्या दिवशी पुणे जिल्हा मराठी अध्यापक संघांचे विश्वस्त, संस्थापक अण्णा कुबडे यांचा संत तुकारामांची पगडी व मानपत्र देऊन त्यांच्या पंचाहत्तरीच्या निमित्ताने संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी रात्रीच्या वेळी कवी संमेलन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यातच आले होते. अनेक शिक्षक कवी व कलावंतांनी काव्यपरंपरा,भारुड, पोवाडा, कविता, नाटिका,बातम्या,गाणी, स्वगत, कार्यक्रमात रंगत आणली. यामध्ये हेमलता भदाने, हेमलता भूमकर,कल्याणी कुलकर्णी, प्रमिला भालके, स्मिता ओव्हाळ, स्वाती उपार, सुरेखा सोनवणे, हेमलता नवले, वसंत घनवट, संजय गवांदे, सारिका काळभोर, सरिता पोटवदे,रवींद्र खवळे,हेमलता भूमकर,सुजाता बेडेकर,प्रभा जट्टे,प्राजक्ता चव्हाण,आरती वळवी,वैशाली वराडे, दीपाली नागवडे,अनिता घोडके,राजेश हिंगणे यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाना शिवले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्रिया निघोजकर, विष्णु मुंजाळे यांनी केले व आभार संतोष काळे यांनी मानले.