Dighi: दिघीकर पुन्हा विकासाशी नाळ जोडणार; ‘कपबशी’लाच विजयी करणार -चंद्रकांत वाळके

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार विलास लांडे यांनी डोंगराएवढी विकासकामे केली आहेत. लांडे हे दहा वर्षे आमदार असतानाच मतदारसंघात सर्वाधिक विकास झाला आहे. आज कोणी कितीही बढाया मारत असले, तरी दिघी आणि परिसरातील नागरिक विलास लांडे यांनी या भागातील विकासासाठी दिलेले योगदान विसरलेले नाहीत. त्यामुळे निवडणुकीत ‘कपबशी’ला म्हणजे विलास लांडे यांचाच विजय निश्चित असल्याचा विश्वास माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके यांनी आज (गुरूवारी) व्यक्त केला.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांनी गुरूवारी संपूर्ण दिवसभर दिघी परिसरात पदयात्रा काढून ग्रामस्थ आणि नागरिकांशी संवाद साधला. नागरिक मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते.

माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके म्हणाले, “माजी आमदार विलास लांडे यांची दिघीकरांसोबत असलेली विकासकामांची नाळ पाच वर्षांपूर्वी तुटली. ती आमची चूक ठरली आहे. पाच वर्षांचा विरोधकांचा काळ अनुभवल्यानंतर दिघीकरांना आता पश्चाताप होत आहे. या भागातील नागरिकांवर विकासाच्या नावाखाली केवळ भूलथापा ऐकण्याची वेळ आली आहे. विरोधक कामे न करता काम केल्याचे सांगून कसे फसवतात याचा दिघीकरांना चांगलाच अनुभव आला आहे.

आता दिघीकरांना आपली नाळ पुन्हा विकासासोबत जोडण्याची संधी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्राप्त झाली आहे. या भागाचा विकास करण्याची धमक फक्त विलास लांडे यांच्यामध्येच आहे. त्यामुळे दिघी आणि परिसरातील नागरिक मतदानाच्या दिवशी ‘कपबशी’ या चिन्हांसमोरील बटन दाबून विलास लांडे यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवणार असल्याचे वाळके यांनी सांगितले.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.