Indrayani : इंद्रायणी नदी शेजारी दुर्गंधी आणि कचऱ्याचे साम्राज्य; प्रशासनाचे दुर्लक्ष
एमपीसी न्यूज – देहूगाव हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले (Indrayani) जाते. संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचे जन्मस्थान म्हणून हे गाव प्रसिद्ध आहे. दररोज वारकरी, भाविक दर्शन घेण्यासाठी येतात. मात्र, देहू परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी देहूतील इंद्रायणी नदी शेजारी कचरा टाकल्यामुळे परिसर अस्वच्छ झाल्याचे आढळून आले आहे.
या परिसरात स्थानिक मंदिरासमोर, इंद्रायणी नदीच्या कडेला व मागच्या बाजूला कचरा टाकत आहेत. तसेच, इंद्रायणी नदीच्या कडेला असणाऱ्या सुरक्षा फलकाची दूरव्यवस्था झाली आहे. ते फलक तुटून पडलेले आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. पुलाच्या बाजूला कचरा साचलेला असल्यामुळे तो कचरा येणाऱ्या जाणाऱ्या वाहनामुळे सर्व परिसरात पसरत आहे. या पुलावरून चारचाकी ,दुचाकी, ट्रेलर, आदी वाहनांची वर्दळ असते.
त्यामध्ये या परिसरात राज्यभरातून जिल्ह्यातून भाविक व वारकरी वर्ग मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी येतात. मात्र, स्थानिक असणाऱ्या नागरिक इंद्रायणी नदीमध्ये कपडे धुतात. तर काही कचरा टाकत असल्यामुळे (Indrayani) परिसर अस्वच्छ दिसत आहे. तसेच कचरा टाकत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी येत आहे.
हा कचरा दोन आठवड्यापासून पडलेला होता. व तो कचरा जाळण्यात आला. त्यामुळे परिसरात धूर निर्माण झाला आहे. त्याचा त्रास येणाऱ्या लोकांना होत आहे.
देहूतील पुलाचे संरक्षण तुटलेले असल्यामुळे रात्रीच्या वेळेत वेगात वाहने येतात. त्यामुळे अपघातही होऊ शकतो. किंवा कोणीही व्यक्ति किरकोळ जखमी देखील होऊ शकतो. या पुलावरून शाळेतील विद्यार्थी ये -जा करतात. त्यांचा देखील तोल जाऊन अपघात होऊ शकतो. रस्त्याच्या कडेला कचरा टाकणाऱ्यावर नगरपंचायत प्रशासनाने कारवाई करणे अपेक्षित असून झालेल्या दुरावस्थेकडे मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.