Nashik News : पेसा सारख्या कायद्यांनी आदिवासी विकासाला गती : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

एमपीसी न्यूज – आदिवासी विकास योजनांमधून विकासाचे काम सुरू आहे, पेसा सारख्या कायद्यांनी त्याला गती मिळाली आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांनी त्यांच्यासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ घेऊन विकास साधावा, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले आहे.

कळवण तालुक्यातील गुलाबी गाव (भिंतघर) येथील एकात्मिक आदिवासी जिल्हा प्रकल्पाच्या जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत बांधलेल्या आदिवासी सांस्कृतिक भवनाचा लोकार्पण सोहळा राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार नितीन पवार, पंचायत समिती सदस्य एन. डी. गावित आदी उपस्थित होते.

यावेळी गवात राज्यपाल कोश्यारी यांचे आगमन होताच त्यांचे पारंपरिक आदिवासी नृत्याने स्वागत करण्यात आले. गुलाबी रंगाने सजलेली घरे आणि पारंपरिक वेशात असलेले गावकरी आणि त्यांच्याकडून झालेल्या उत्स्फूर्त स्वागताने राज्यपाल कोश्यारी भारावले. त्यानंतर सभास्थानी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत आणि गिर्यारोहक हेमलता गायकवाड यांच्या हस्ते पारंपरिक वाद्य पावरी आणि पुष्पगुच्छ देऊन राज्यपाल कोश्यारी यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी बोलताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले, निसर्गाचे वरदान लाभलेला हा परिसर आहे. येथील आदिवासी बांधव विकासाची संधी शोधत आहेत त्यांना ती संधी पेसा सारख्या कायद्याच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. याशिवाय वनपट्टे कसण्यासाठी त्यांना देण्यात येत आहेत, त्याचाही उपयोग हे बांधव करत आहेत. या भागात बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी अधिक प्रयत्न होण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.

विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांनी, या भागात पावसाळ्यात सतत चार महिने पाऊस असतो. मात्र, ते पाणी वाहून जाते. त्यामुळे येथील विकास गतीने होण्यासाठी पाण्याचे साठे निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. विशेष बाब म्हणून त्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ म्हणाले.

यावेळी राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात गुलाब वाघेरे, बंडू कडाले आणि तुळशीदास जाधव यांना वन पट्टे सातबाराचे वितरण करण्यात आले.तसेच प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांपैकी विमल जाधव यांना प्रातिनिधीक प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

गावकऱ्यांच्या वतीने सरपंच कांतीलाल खांडवी यांनी राज्यपाल कोश्यारी यांचे स्वागत केले तर आभार रघुनाथ जाधव यांनी मानले.

दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी या कार्यक्रमानंतर गोविज्ञान सेवाभावी संस्था अंतर्गत येथील जनकल्याण गो शाळेचे उद्घाटन केले. यावेळी आयुर्वेदाचार्य अजित रावळ, राजेन्द्र लुंकड, रवींद्र रगडे, योगिनी चंद्रात्रे, कुबेर पोपटी आदी उपस्थित होते. गो सेवा ही महत्वपूर्ण आहे. त्यामुळे अशा गो शाळांना आवश्यक ते सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी राज्यपाल यांनी स्पष्ट केली.

दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांचे या कार्यक्रमासाठी वावरपाडा येथील हेलिपॅड येथे आगमन झाले. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार नितीन पवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उप विभागीय अधिकारी संदीप आहेर, एकात्मिक आदिवासी जिल्हा प्रकल्पच (कळवण) संचालक विकास मीना, अपर पोलीस अधीक्षक शर्मिला वालावलकर आदींची यावेळी उपस्थिती होती.

“या लोकांत देव दिसतो”
आज राज्यपाल कोश्यारी यांनी या लोकांशी मनमोकळा संवाद साधला. मी सुद्धा पहाडी भागातून आलो आहे. त्यामुळे तुमच्या जीवनशैली मला माहिती आहे. त्यामुळेच मला शहरी भागापेक्षा अशा कार्यक्रमांना येणे आवडते. तुम्हा लोकांमध्येच मला देव दिसतो, अशा शब्दात राज्यपाल कोश्यारी यांनी भावना व्यक्त केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.