New Delhi News: संरक्षण मंत्रालयातर्फे ऑनलाईन क्विझ स्पर्धेचे आयोजन
एमपीसी न्यूज – प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आणि भारत-बांगलादेश युद्धाला 50 वर्ष झाल्याच्या स्मरणार्थ केंद्रीय संरक्षण मंत्रालय आणि माय गव्हर्नमेंट ऑनलाईन क्विझ स्पर्धा घेणार आहे. 14 वर्षे आणि त्यापुढील भारतीय नागरिक या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात.
ऑनलाईन क्विझची स्पर्धा ही दिनांक 11 जानेवारी ते 22 जानेवारी यादरम्यान होणार आहे. स्वातंत्र्ययुद्ध, 1971 च्या युद्धात देशासाठी बलिदान दिलेले योद्धे, अशा बाबींबाबत जागरूकता निर्माण करणे, तसेच देशाप्रती साहसाची भावना निर्माण करणे, हा या स्पर्धेमागचा हेतू आहे.
ही स्पर्धा जिंकणाऱ्यांना मोठ्या रकमेची बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकाला 25,000, द्वितीय क्रमांकाला 15,000 व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्याला 10,000 रुपयांचे तर उत्तेजनार्थ क्रमांक मिळवणाऱ्या 7 जणांना प्रत्येकी 5,000 रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.
हे क्विझ माय गव्हर्नमेंट पोर्टलवर व या https://quiz.mygov.in/quiz लिंकवर उपलब्ध आहे.