Omicron Fear : मोठी बातमी ! राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार, परीक्षाही ऑनलाईन

एमपीसी न्यूज – राज्यात वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील सर्व अकृषी महाविद्यालये आणि तंत्रशिक्षण संस्था 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. तसेच, सर्व विद्यापीठांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.

राज्यातील महाविद्यालयांसंदर्भात काल सर्व विभागीयआयुक्त, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व कुलगुरू यांच्या समवेत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत कोविड 19 संसर्गाबाबत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थीं, पालक, प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्या सोबत आरोग्य सुरक्षितते बद्दल सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

‘सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, तंत्रनिकेतन, विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमधली परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विजेची अनुपलब्धता, नेटवर्क कनेक्टिव्हिटीमुळे, विद्यार्थ्यांच्या कुटुंबात किंवा विद्यार्थी करोनाबाधित असतील तर त्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, याची दक्षता सर्व विद्यापीठांनी घेतली पाहिजे. खासगी विद्यापीठांनी देखील याच निर्णयाचं पालन करायला हवं,’ असं मंत्री उदय सामंत म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.