Pimpri: ‘बेटी बचाव’चा संदेश देत दोन कन्या साकलवरुन निघाल्या काश्मीर ते कन्याकुमारीच्या प्रवासाला (व्हिडीओ)
16 दिवसांत दोन हजार किमीचा प्रवास
एमपीसी न्यूज – बेटी बचाव बेटी पढाव, देश प्रदूषण मुक्त करा हा संदेश संपुर्ण देशाला मिळावा यासाठी देहू येथील पुजा बुधावले व मुंबंईची सायली महाराव या दोन महाविद्यालयीन तरुणी काश्मीर ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास करत आहेत. त्यांच्या या धाडसाचे पिंपरी-चिंचवडकर व पुणेच्या नागरिकांनीही कौतुक केले आहे.
पुजा व सायली या पुण्यातील महाविद्यालयात शिक्षण घेत असून त्यांनी या प्रवासा विषयी काही सायकल प्रेमींकडे बोलून दाखवले. सायकल प्रेमींनी त्यांच्या कल्पनेचे कौतुक करत पुजा व सायलीला या सायकल स्वारीसाठी प्रोत्साहन दिले. दोघींनी 30 नोव्हेंबर रोजी काश्मीर येथून या प्रवासाला सुरुवात केली. 16 दिवसात त्यानी 2 हजार किमीचा प्रवास करत काल (बुधवार) पिंपरी-चिंचवड शहरामध्ये प्रवेश केला. यावेळी देहु या पुजाच्या गावी तिचे जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना पुजा म्हणाली की, हा सायकल प्रवास आम्ही अजय पडवळ या सायकलपट्टूला समर्पीत केला आहे. मुली देखील असा प्रवास करु शकतात, त्यासाठी त्यांना शिकवा व मोठ करा तसेच प्रदूषण टाळण्यासाठी सायकलचा वापर वाढवा असा संदेश देण्यासाठी आम्ही हा सायकल प्रवास करत असल्याचे तिने सांगितले.
काश्मीर ते कन्याकुमारी हा 4 हजार किमीचा प्रवास केवळ महिनाभरात पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. यासाठी त्या कसोशीने प्रयत्न करत आहेत. या प्रवासामध्ये गावो-गावच्या सायकलप्रेमींची त्यांना मदत मिळत आहे. त्यांच्या या प्रवासाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या दोघीच हा प्रवास पूर्ण करत आहेत. त्यांच्या या धाडसासाठी व प्रवासासाठी एमपीसी न्यूजतर्फे हार्दीक शुभेच्छा.