Pimpri: पर्यावरण जपण्याच्या संदेशाची गरज -नितिन यादव
एमपीसी न्यूज – “रासायनिक रंग आणि पाणी न वापरता धुलवड साजरी करुन पर्यावरणपूरक संदेश देणारे नवयुग हे एकमेव मंडळ आहे. पर्यावरण जपण्याच्या संदेशाची आज गरज आहे, असे मत लेखक नितीन यादव यांनी व्यक्त केले.
बीना इंग्लिश स्कूल, आकुर्डी येथे नवयुग साहित्य, शैक्षणिक आणि सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित “रंगात रंगूनी सा-या “या होलिकोत्सवा निमित्त विनोदी आणि विडंबन कवितांच्या कवीसंमेलनाच्या अध्यक्ष स्थानावरुन ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अशोक कोठारी, प्रा. पी बी शिंदे, संपत शिंदे, राजेंद्र घावटे, आझमखान हे उपस्थित होते.
- कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हास्यकवी नंदकुमार कांबळे यांनी हसणे म्हणजे आनंद आणि संपन्नतेचे प्रतिक असते. म्हणून सदैव हसत रहा असा संदेश देऊन मिमिक्री द्वारे लोकांना खूप हसवले. नवयुग संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक राज अहेरराव यांनी रसिकांवर फुलांचा वर्षाव करुन कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
यावेळी ते म्हणाले ,”आम्ही देवीदेवतेच्या मुर्ती पूजण्यापेक्षा माणसांच्या अंतकरणातल्या ईश्वराची पूजा श्रेष्ठ समजतो.” विविधरंगी फुलांची उधळण करुन हा होळीचा फुलोत्सव साजरा करण्यात आला. “कसं काय आमदार, बरं हाय का,असे राजकीय विडंबन कैलास भैरट यांनी सादर केले.रमेश वाकणीस यांनी “मोबाईल सोडून मलाच धरताय,या कवितेतून हास्यरंग उधळले.सविता इंगळे यांनी नवोदित कवींना येणारे अनुभव “मी कवयित्री “या कवितेतून मांडले.
- शोभा जोशी, पितांबर लोहार, आय.के.शेख, मधुश्री ओव्हाळ, संगीता झिंझुरके, राधा वाघमारे, बाबू डिसोजा,रघुनाथ पाटील, निशिकांत गुमास्ते, बी.एस.बनसोडे,निलेश शेंबेकर, आनंद मुळुक, दिनेश भोसले, धनेश बडवाने, कवींनी कविता सादर करुन हास्यबहार आणली. सूत्रसंचालन राजेंद्र घावटे यांनी केले.संयोजन नंदकुमार मुरडे, रजनी अहेरराव, अश्विनी कुलकर्णी, अरविंद वाडकर, माधुरी विधाटे, अनिकेत गुहे यांनी केले.राजेंद्र बाबर, शर्मिला बाबर, स्वानंद राजपाठक अजय हेडावू, झिया बागपती आदी उपस्थित होते. आभार संपतराव शिंदे यांनी मानले.