Pimpri News: टपरी धरकांवरील अन्यायाविरुद्ध कायदेशीर मार्गाने लढा देऊ – बाबा कांबळे  

एमपीसी न्यूज – फेरीवाल्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी लढायला सज्ज असले पाहिजे. अनेक वेळा महापालिकेचे अधिकारी चुकीची कारवाई करतात. या विरोधात आवाज उठविला पाहिजे. तरच आपल्याला न्याय मिळेल. तसेच चुकीच्या पद्धतीने नियमबाह्य कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांना घरी बसविण्याची ताकद फेरीवाल्यांकडे आहे. टपरी धारकांवरील अन्यायाविरुद्ध कायदेशीर मार्गाने लढा दिला जाईल, असे टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे म्हणाले.

पथारी, हातगाडी पंचायतीच्या वतीने फेरीवाला जनजागृती अभियानांतर्गत शगुन चौक येथे बैठक पार पडली. यावेळी टपरी, पथारी, हातगाडी पंचायतचे कार्याध्यक्ष बळीराम काकडे, उपाध्यक्ष प्रकाश यशवंते, शहराध्यक्ष रमेश शिंदे, सल्लागार गणेश आहेर आदी उपस्थित होते.

दोन वर्षे कोरोनाने जगभरासह देशभरात हाहाकार उठविला होता. या काळात झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हातचे काम गेले. शहरात सुमारे दोन लाख लोकांचे रोजगार गेले आहेत. कोविडमुळे दोन वर्षे टपरी, पथारी, हातगाडी धारकांचा व्यवसाय बंद होता. या काळात पिंपरी-चिंचवड महापालिकेने तीन हजार रुपये कष्टकऱ्यांना देऊ असे जाहीर केले. परंतु, प्रत्यक्ष मात्र ते कागदावरच राहिले. कष्टकऱ्यांची फसवणूक केली.

सध्या चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात आहे. या कारवाईतून फेरीवाल्यांना उध्वस्त करू नका. फेरीवाले हे उपद्रव करणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे क्षेत्र आहे. मोकळी जागा, व्यावसायिक ठिकाणी जागा देण्याची तरतूद फेरीवाला कायद्यातही आहे. तसेच फेरीवाल्यांना त्रास द्यायचा नाही, असा कायदा आहे.  2007 साली पिंपरी-चिंचवड महापालिकेने फेरीवाला कायदा करून काही निकष ठरविले. त्याला आता 14 वर्षे पूर्ण होऊनही त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. महापालिका अन्याय करत आहे. हा अन्याय होत राहील जो पर्यंत तुम्ही सहन कराल. त्यामुळे या अन्यायाविरुद्ध कायदेशीर मार्गाने लढा देऊ, असे आवाहन बाबा कांबळे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.