Pimpri: नागरवस्ती विभागाच्या बक्षीस योजनेस विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास मुदतवाढ द्या
विरोधी पक्षनेते नाना काटे यांची मागणी
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाकडील इतर कल्याणकारी योजने अंतर्गंत दहावी आणि बारावीच्या 80 टक्के गुण संपादन करणा-या विद्यार्थ्यांना बक्षिस रक्कम देण्याच्या योजनेला एक महिन्याची मुदतवाढ देण्याची मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.
महापालिकेच्या नागरवस्ती विभागातर्फे दहावी, बारावीच्या 80 टक्क्यांहून गुण मिळविणा-या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येते. या योजनेसाठी विहीत नमुन्यातील फॉर्म, रहिवासी दाखला,आधार कार्ड, गुणपत्रिका, विद्यार्थ्याचे किंवा पालकाचे राष्ट्रीयीकृत बॅकेतील खाते व पास बुकची झेरॉक्स, प्रवेश घेतलेल्या संस्थेतील मुख्याध्यापक / प्राचार्य यांची शिफारस इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतात. या योजनेची अंतिम दिनांक 31 ऑगस्ट आहे. परंतु, अनेक विद्यार्थ्यांची कागदपत्रे गोळा झालेली नाहीत. राष्ट्रीयीकृत बॅकेतील खाते काढणेसाठी वेळ लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येत नाही.
दहावीच्या फेर परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेमधून 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना टक्के या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे जमा करण्यास वेळ लागेल. परिणामी, विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहू शकतात. या योजनेचा शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ होण्याच्या दृष्टीकोनातून योजनेस एक महिन्याची मुदतवाढ देण्याची मागणी काटे यांनी केली आहे. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे.