आनंदी जीवन कसे जगावे

(महेश काटे)
तुमचा रुटीन किंवा दिनक्रम काय? असा प्रश्न मी आपणांस विचारल्यास, आपले उत्तर काय असेल? सकाळी उठून आवरणे, नोकरीवर जाणे, रोजचे काम जमेल तितक्या आवडीने करणे, घरी येऊन परिवारासोबत वेळ घालविणे, मनोरंजनासाठी टी.व्ही. बघणे आणि जेवण वगैरे उरकून झोपी जाणे. आपण गृहिणी असाल, तर यात स्वैपाक करणे, मुलांची काळजी घेणे, त्यांचा होमवर्क वगैरे करून घेणे, या जबाबदाऱ्यासुद्धा आल्या. हे चक्र रोज त्याच गतीने फिरत असते. जवळजवळ त्याच वेळेला, रोज त्याच गोष्ट घडत असतात. अगदी रविवारचे रुटीनसुद्धा तेच-तेच झालेले असते – उशिरा उठणे, मनसोक्त टी.व्ही. बघणे, पिक्चर बघायला जाणे आणि बाहेर खाणे.

आयुष्याला शिस्त असणे, एक व्यवस्थित ढाचा असणे, ही खरेतर चांगली गोष्ट आहे, नाही का? पण मग आपण आपल्या जीवनात आनंदी का नसतो? ‘कंटाळा आला तेच तेच करून’; ‘हरवल्यासारखं झालंय’; ‘बोअर झालंय’….अशी वाक्ये सारखी का ऐकू येतात? आपले काम, आपला परिवार, सगळेच आपल्याला आवडत असते. मग हे आपल्या मनासारखे जीवन आपल्याभोवती उभे करूनही, काय निसटते आहे? काय राहून जाते आहे? सारखे आपल्या स्मार्टफोन्समध्ये आपण नेमके काय शोधत असतो? जीवन खरोखर आनंदी कशाने होते?

याचे उत्तर खरेतर इतके सोपे नाही. कारण आनंद ही अशी एक भावना नाही. पतंग उडविताना जो आनंद मिळतो, तो प्रमोशन मिळाल्यावर होणाऱ्या आनंदापेक्षा वेगळा; पहिल्या पावसात भिजण्याची मजा, ही पहिली कार घेतल्यावर होणाऱ्या हर्षापेक्षा निराळी. आपला पिंड काय, आपल्याला काय आवडते, यानुसार आपला आनंद कशात आहे, हे ठरत जाते. पण या सगळ्यामध्ये एक घटक सातत्याने असावा लागतो –

आनंदाचा ध्यास आणि तो मिळविण्याची स्वयंस्फूर्ती.

तसे पाहता, आनंद हेच सर्वसाधारण माणसाच्या जीवनाचे उद्दिष्ट असते. पण त्यासाठी तो अनेक ताणतणावांतून जात असतो. याचे कारण आपला आनंद हा भौतिक गोष्टींशी जोडला गेला आहे. म्हणजेच, पर्यायाने तो पैसे कमविण्याशी जोडला गेला आहे. तो कमविण्यासाठी मग ऑफिसात वेळेवर पोचायला हवे; त्यासाठी वेळेवर लोकल गाठली पाहिजे; ट्रॅफिकचा, हॉर्न्सचा गोंगाट ऐकला पाहिजे; बॉसची बोलणी ऐकायला हवी; प्रमोशन मिळवत राहायला हवे; कार विकत घ्यायला हवी आणि सरतेशेवटी पॉलिसी काढून, पुढच्या पिढीचीही सोय करायला हवी. या छोट्या-छोट्या गोष्टी जोडत जाताना, आयुष्याविषयीचा मोठा दृष्टीकोन हरवत जातो. जगणे संकुचित होत जाते. स्वयंस्फूर्ती वगैरे
बद्दल तर मग बोलायलाच नको.

‘रोज एक तास व्यायाम’, ‘एक तास लिखाण’, ‘अर्धा तास वाचन’ असे अनेक निर्धार आपण नववर्षाच्या सुरुवातीला करतो. जानेवारीच्या साधारण दुसऱ्या आठवड्यापर्यंत ते कोलमडतात. पुन्हा त्याच चक्रामध्ये आयुष्य फिरू लागते. पण आपले किती निर्धार खरोखर मनापासून केलेले असतात? एखादी गोष्ट मनापसून आवड असते, म्हणून ती आपण करतो का? आपल्याला मनापासून खरंच काय आवडते, हे आपल्याला माहिती आहे का? तेच माहित नसल्यास, आपल्याला आनंद कुठून मिळतो, त्याचा नेमका (आपल्यासाठीचा) स्त्रोत कुठला, हेच आपल्याला कळणार नाही.

यातूनच आपण दुसऱ्या मुद्द्यकडे वळतो. स्वयंस्फूर्तीच्या शोधासाठी लागणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट – आत्मसंवाद.

आपण कोण आहोत? आपला स्वभाव नेमका कसा आहे? आपल्यात कुठली कौशल्ये आहेत? आपली बलस्थाने कुठली? आपल्यात दोष कुठले आहेत? हे प्रश्न केवळ नोकरीच्या इंटरव्यूपुरते महत्त्वाचे नसतात. ते आपल्या रोजच्या आयुष्याला दिशा देणारे, त्याला काहीएक उद्दिष्ट देणारे आहेत. स्वतःचा शोध आपण जितका घेत जातो, त्यानुसार जितके स्वतःत बदल घडवितो, तितके आपले आयुष्य अधिक समृद्ध, अधिक अर्थपूर्ण होत जाते. त्यातूनच मग ‘समाधान’ नावाची एक निसटती गोष्ट हळूहळू हाती लागू लागते.
पण हे तर तुम्ही अनेक सेल्फ-हेल्प पुस्तकांमध्ये वाचले असेल. प्रश्न असा आहे, की हा आतला आवाज इतक्या सहजासहजी सापडतो का? आधी म्हंटल्याप्रमाणे, आजूबाजूच्या गदारोळामध्ये, गोंगाटामध्ये आपण सतत ओढले जात असतो. यातला बराच भाग ऐच्छिकही असतो – रिअॅलिटी शोज, अर्थहीन सिनेमे, कानातल्या हेडफोन्सवर वाजणारी रॅप वगैरे गाणी…हे सगळे आपणच आपल्यासाठी निवडतो. या सगळ्यात जागा कुठे आहे – नवीन विचार डोक्यात शिरायला, स्वतःबद्दल काही प्रश्न पडायला, उत्तरांचा शोध घ्यायला…आपल्या आतला आवाज मग दबतच जातो, त्याला वाटच मिळत नाही.

मग आतला आवाज कायमचा मरतो का?

अजिबातच नाही. मानवी मेंदू, त्याचे मन, हे विचार करण्यासाठीच बनलेले आहे. ते कार्य ते सतत करतच असते. कुठल्या न कुठल्या दिशेने ते विचार करतच असते. आनंदी असण्यासाठी मात्र, गरज असते ती या विचारांना योग्य दिशा देण्याची. आणि ही दिशा मिळते, ती परस्पर – संवादातून.

एक साधे तत्त्व, खरेतर एक सामान्य निरीक्षण, मला नेहमीच पटते – आपला शोध हा आपल्याला दुसऱ्यांच्या माध्यमातून लागतो. आई जेव्हा कौतुकाने म्हणते, ‘हा फारच आळशी आहे’, तेव्हा आपल्याला उमजते, की खरंच आपल्यात आळस भरत चाललाय. वडील जेव्हा कोणालातरी सांगतात, की ‘हिच्यात व्यवस्थापनाचं कौशल्य आहे’, तेव्हा आपल्यालाही वाटते, खरंच, माझ्यात हा गुण आहे! आनंद कुणाशीतरी शेअर करणे, दुःखं कोणालातरी सांगणे, हा अगदी मुलभूत मानवी स्वभाव आहे. त्यात तात्त्विक वगैरे असे काहीच नाही. एका अर्थाने हा आत्मसंवादच आहे.
ज्यातून आपल्याच मनातील अव्यक्त व्यक्त होत जाते, निराकार आकार घेत जाते, आणि आपण स्वतःला आणखी चांगले ओळखू लागतो. पण परस्पर संवाद वाटतो तितका सोपा नाही राहिलेला. मोबाईल, इंटरनेट मुळे जग खरोखरच जवळ आले आहे. त्याची गरज आणि त्याचे महत्त्व नाकारता कामा नये. आपण त्यामुळे सतत एकमेकांच्या संपर्कात असतो. व्हॉट्स अॅपवर ग्रुप बनवून एकमेकांशी बोलत असतो. त्यातून विनोद शेअर करून आपण हसतो, गंभीर चर्चाही करतो. त्यातून मिळणारा आनंद किंवा समाधान हे तात्पुरते असेल, पण ते खोटे आहे, असे नाही.

पण म्हणून आपली एकमेकांना भेटण्याची आसक्ती कमी होते का? एखाद्या निवांत दुपारी मित्रांबरोबर बसून पिझ्झा खाण्याची गंमतच निराळी! घरी जाऊन आईला एवढ्या-तेवढ्या कामांमध्ये मदत करत, तिच्याशी गप्पा मारण्यातून मिळणारा आनंद कितीतरी मोठा! याचाच अर्थ असा, की अजून तरी, आपण पूर्णपणे आभासी जगात जगायला सुरुवात नाही केलेली. प्रत्यक्ष भेटीची, संवादाची उर्मी, त्यातून मिळणारी उर्जा, यांची आपल्याला अजूनही हाव आहे.

मग गाडी कुठे अडते? पुन्हा तेच – धकाधकीचे जीवन, सगळ्यांच्या आपापल्या प्राथमिकता, भौतिक (आणि भावनिकही) अंतर…आणि प्रत्यक्ष भेटल्यावरही आपण सतत विचलित असतोच. मोबाईलमध्ये म्हणा, ऑफिसातल्या एखाद्या कामाच्या विचारामध्ये म्हणा, आपले मन, आपले लक्ष, दुभाजित असते. हे इतके वाढले आहे, की युरोपातल्या एका कॅफेने त्यांच्या दारासमोर असा बोर्ड लावला आहे – ‘आम्ही फ्री वायफाय देत नाही. आम्हला अपेक्षित आहे की तुम्ही तुमचे फोन बाजूला ठेवावेत, एकमेकांशी बोलावे, एकमेकांचे ऐकावे.’ खरंच, कोणाचेतरी लांबलचक किस्से मनापासून ऐकणे, त्यावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया देणे, गप्पा मारणे, हे आपण शेवटचे कधी केले होते? आपल्याला ही कोणीतरी ऐकणारा
हवाच असतो ना !

पण हे नाहीच जमत! आणि यात आपला किंवा समोरच्याचा दोष नाही. आधुनिक जीवनाच्या गरजा, त्याची गती इतकी आहे, की एका छाताखाली राहूनही, आपल्याला एकमेकांशी बोलायला, एखादी संध्याकाळ राखीव ठेवून, हॉटेलात जावं लागतं (फ्री वायफाय न देणाऱ्या!). परिणामी, विसंवाद वाढत जातो. किंवा संवाद गायबच होत जातो. एक घुसमट तयार होत जाते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपला आतला आवाजही दबत जातो.

या सगळ्यावर एक उपाय म्हणून मग कौन्सिलर किंवा समुपदेशक नावाच्या प्राण्याचा जन्म झाला. तसा समुपदेशक हे काही आजच्या काळाचे उत्पादन नाही. श्रीकृष्णानेसुद्धा अर्जुनाला गीता सांगितली, ते एक प्रकारचे समुपदेशनच होते. आपले संत, सुफी कवी, जे त्यांच्या काव्यातून मांडतात, ते मनाच्या खोल तळाशी जाऊन बसलेल्या आपल्या आतल्या आवाजाला जागृत करण्यासाठीच आहे. म्हणजे समुपदेशक हा एखाद्या मित्राची, आपल्या आईची, वडिलांची, भावंडांची जागा घेऊ शकतो का? असे अजिबातच नाही. तो फक्त तुमचा
काही काळापुरता मित्र होतो. तुमचं सगळं ऐकून घेतो. तुमच्यातला आणि तुमच्या आप्तांमधला खुंटलेला संवाद पुन्हा मोकळा करतो. आणि पर्यायाने तुमच्यातला आणि तुमच्या मनामधला संवादही सुरु करतो. हेच काम तुमचे मित्र, नातेवाईक वेळोवेळी करत असतात. समुपदेशक ते प्रोफेशनल दृष्ट्या करतो इतकेच.

‘प्रोफेशनल’ दृष्ट्या करणे, म्हणजे केवळ पैसे घेऊन करणे, इतकेच नव्हे. समुपदेशक त्याचे शैक्षणिक आणि व्यावसायिक ज्ञान, त्याची बुद्धिमत्ता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अनेक शास्त्रशुद्ध प्रक्रिया अवलंबून, तुमच्याशी संवाद साधत असतो. वरवर या संवादाचे स्वरूप गप्पांसारखेच असते. खोलवर मात्र, तो काही विशिष्ट माहिती मिळवत, विशिष्ट आराखडे आखत, तुमच्या नेमक्या समस्येपर्यंत पोहोचतो आणि तिच्यावर ठोस असे उपाय करतो. हे करताना तो ज्या प्रक्रिया वापरतो, त्या विविध प्रकारच्या असू शकतात. प्रत्येक प्रक्रियेचे, ज्ञानशाखेचे विशिष्ट असे महत्त्व आहे.
यातीलच एक महत्त्वाची, प्राचीन आणि अत्यंत परिणामकारक ठरलेली ज्ञानशाखा म्हणजे संमोहनशास्त्र ! ‘संमोहन’ हा शब्द ऐकल्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल, याची मला, एक संमोहनतज्ज्ञ म्हणून, आता बरीच कल्पना आहे. गेली १४ वर्षे हे काम करताना, मी जिथे जिथे जातो, तिथे लोकांचे अनेक प्रश्न, अनेक गैरसमज, दूर करण्यात मला बराच वेळ द्यावा लागतो. त्यात मला आनंदही मिळतो, कारण संमोहनाचा त्याच्या मूळ स्वरूपात व्यापक प्रचार करणे, हा माझ्या कामाचा एक मोठा भाग आहे. संमोहन हा जादूटोण्याचा प्रकार आहे, असे अनेकांना वाटते. संमोहनतज्ज्ञ तुमच्या डोळ्यांत डोळे घालून, तुमच्यासमोर जादुई लंबक हलवून आणि मग एक चुटकी वाजवून, तुम्हाला संमोहित करतो आणि मग वाट्टेल ते करायला लावतो, असा एक मोठा गैरसमज पसरलेला आहे.

टी.व्ही. किंवा इतर माध्यमांतून, जे मनोरंजनासाठीचे कार्यक्रम दाखविले जातात, त्यातून हा समज अधिक दृढ होत गेला आहे. यात संमोहित व्यक्तींना त्यांचे कपडे काढायला लावणे, विकृत चाळे करायला लावणे, चोऱ्या करायला लावणे, असे विविध प्रकार दिसतात. मूळतः त्यांची टर उडवून, त्यातून विनोदनिर्मिती करण्याचा हा प्रयत्न असतो.

हे सारे खरेतर अतिशय खोटे आणि आभासी आहे. ‘WWF’ मधल्या फाईट्स जशा दिग्दर्शित असतात, तसाच काहीसा हा प्रकार आहे. मग संमोहन म्हणजे काय? तर ही तुमच्यातला आणि तुमच्या अंतर्मनातला संवाद बळकट करणारी एक विशिष्ट उपचार पद्धती आहे. ऋग्वेदामधल्या वर्णनांपासून ते आजच्या आधुनिक मेडिकल सायन्समधल्या उपयोगांपर्यंत, अनेक ठिकाणी संमोहन वापरले जाते. ऋग्वेदामध्ये सांगितलेली ‘स्पर्श चिकित्सा’ किंवा ‘प्राणविद्या’ म्हणजेच संमोहन. ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (W.H.O.)’ ने ५० वर्षांपूर्वी आपल्या Traditional Medicine या ग्रंथामध्ये संमोहनशास्त्राला मान्यता दिली आहे. तसेच, भारत सरकारच्या आरोग्य खात्यानेही (Indian Medical Association) २००३ मध्ये एक खास परिपत्रक काढून संमोहनशास्त्राला ‘पूरक उपचारपद्धती’ म्हणून मान्यता दिली आहे.
अनेक लोक संमोहनाचा वापर चुकीच्या पद्धतीने करतात. एका दिवसाची कार्यशाळा घेऊन, चुकीचे किंवा अर्धवट तंत्र शिकवून ते फक्त पैसे कमवितात. यातून संमोहनाचा मूळ उद्देश बाजूला पडत जातो. तुमच्या समस्यांवर नेमका उपाय शोधणे, विशिष्ट प्रक्रियेद्वारे तो उपाय राबविणे आणि तुमचे जीवन अधिक समृद्ध, अधिक आनंदी बनविणे, हे संमोहनाचे खरे उद्दिष्ट आहे.
हे सगळे करताना, समुपदेशन ही पहिली व अत्यंत महत्त्वाची पायरी असते. आधी नमूद केल्याप्रमाणे, आपल्या समस्या या रोजच्या जीवनातून, ताणतणावांतून आणि संवादाच्या अभावातून निर्माण होतात. त्यांचे प्राथमिक स्वरूप हे भावनिक व मानसिक असते. त्यामुळे एका चांगल्या संमोहनतज्ज्ञाचे पहिले काम, हे तुमच्याशी सविस्तर संवाद साधणे, हे असते. तुमचा त्रास, तुमची समस्या व्यक्त करायला, एक हक्काची जागा तो आधी निर्माण करत असतो. यातून समस्येचे निदान करणे, आणि मग त्यावर उपाय राबविणे, हे त्याचे काम असते. संमोहन हे अनेक बाबतींमध्ये उपयोगी ठरते – मानसिक आजार (चिंताविकृती, उन्माद इत्यादी), मनोशारीरिक आजार (रक्तदाब, मधुमेह इत्यादी) आणि व्यक्तिमत्त्व विकास (बुजरा स्वभाव, आत्मविश्वासाचा अभाव इत्यादी) – या सगळ्यांवर संमोहन परिणामकारक उपचार करू शकते. व्यसने, वाईट सवयी सोडविणे, यामध्ये प्रचंड मदत ही पद्धती करू शकते. विद्यार्थी, महिला, पोलीस, खेळाडू अशा विविध गटांना, त्यांच्या विशिष्ट समस्येनुसार नेमकी मदत यातून करता येते. हे उपचार तुम्हाला दीर्घकाळ परिणाम दाखविणारे आणि महत्त्वाचे म्हणजे, तुम्हाला आत्मनिर्भर करणारे असतात. कुठल्याही लंबकाची, कुठल्याही जादूची यात गरज नसते. कारण खरी जादू, ही तुमच्या अंतर्मनात असते, त्याच्यात असलेल्या अगाध शक्तीमध्ये असते. या अंतर्मनाशी तुमचा संवाद सुरळीतपणे सुरु झाला, की आनंद, हास्य, समाधान, या तितक्याशा अवघड गोष्टी राहत नाहीत.

‘आयुष्य सुंदर आहे’, ‘आनंद आपल्या अवतीभोवतीच असतो’, अशी वाक्ये आपण अनेकदा ऐकतो. पण आनंद खरेतर आपल्या मध्येच आहे. त्याला वाट करून देणे, त्याला दिशा देणे, हे आपले काम आहे. मग रुटीनही मजेदार वाटू शकतो आणि रोजचे आयुष्य आनंददायी होऊ शकते. गरज आहे, ती स्वयंस्फूर्ती शोधण्याची, आपला आतला आवाज शोधण्याची, परस्पर-संवाद साधण्याची. आनंदाच्या रेसिपीचे हे सगळे घटक आहेत. संमोहन केवळ एक माध्यम, एक धग आहे, जी या सगळ्या घटकांना एकजीव करते.

(लेखक ज्येष्ठ संमोहनतज्ज्ञ व ‘महेश काटे हिप्नोथेरेपी सेंटर, पुणे’चे संचालक आहेत.)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.