Eng Vs WI: आजपासून अंतिम व निर्णायक कसोटी, वेस्ट इंडिजसाठी ठरू शकतो ऐतिहासिक विजय
From today, the final Test start in between eng vs wi साउथहँम्टनच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर जैव-सुरक्षित प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याबद्दल मागील दुसऱ्या कसोटीकरिता जोफ्रा आर्चरवर बंदी घालण्यात आली होती.
एमपीसी न्यूज – इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दरम्यान सुरू असलेल्या तीन कसोटी मालिकांची अंतिम व निर्णायक कसोटी आजपासून सुरू होत आहे. पहिली कसोटी वेस्ट इंडिज तर दुसरी इंग्लंडने जिंकल्यानंतर मालिका 1-1 ने बरोबरीत आली आहे. अंतिम व निर्णायक असणाऱ्या या कसोटीत दोन्ही संघ सुरवातीपासूनच वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करतील.
ओल्ड ट्रॅफर्ड या मैदानावर आजपासून (दि. 24) रंगणाऱ्या या सामन्यासाठी इंग्लंडने त्यांच्या संघाची घोषणा केली असून, वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि जोफ्रा आर्चर या खेळाडूंचा समावेश केला आहे.
मँचेस्टर येथील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला होता. तर साउथहँम्टनच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर जैव-सुरक्षित प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याबद्दल मागील दुसऱ्या कसोटीकरिता जोफ्रा आर्चरवर बंदी घालण्यात आली होती.
यानंतर जोफ्रा आर्चरने आपल्या कृतीवर माफी मागितली होती. तर इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट मंडळाने जोफ्रा आर्चरवर कारवाई करत, दंडही ठोठावला होता.
याअगोदर इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात 8 जुलै रोजी पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाच्या फलंदाजांसोबत गोलंदाजांनी देखील उत्तम कामगिरी केली.
त्यामुळे वेस्ट इंडिज संघाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकत 1-0 ने आघाडी मिळवली होती. मात्र मँचेस्टर येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघाने जोरदार पुनरागमन करत, वेस्ट इंडिज संघाचा पराभव केला होता.
या विजयसोबतच तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये इंग्लंडने वेस्ट इंडिज संघाशी 1-1 ने बरोबरी साधली. त्यामुळे उद्यापासून ओल्ड ट्रॅफर्ड येथे वैस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्यात तिसरा व शेवटचा कसोटी सामना खेळवण्यात येणार असून, दोन्हीही संघ मालिका काबीज करण्याच्या हेतूने मैदानात उतरणार आहेत.
दोन्ही संघ मैदानावर जिंकण्याच्या हेतूने मैदानावर उतरतील. पण वेस्ट इंडिजसाठी हा विजय ऐतिहासिक असेल. जर हा सामना वेस्ट इंडिजने जिंकला तर 32 वर्षानंतर वेस्ट इंडिज संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकेल.
त्यामुळे कोरोना माहामारीनंतर सुरू झालेल्या पहिल्या कसोटी मालिकेच्या अंतिम सामन्याकडे सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष लागून राहिले आहे.