Hinjawadi : बापलेकावर जीवघेणा हल्ला पाच जण अटकेत
एमपीसी न्यूज – वडील आणि मुलगा यांच्यावर पाच जणांनी मिळून जीवघेणा हल्ला केला. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. या प्रकरणात हिंजवडी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 16) रात्री नऊच्या सुमारास हिंजवडी येथे घडली.
आकाश रोहिदास मेटे (वय 24, रा. दुसाने ता. मावळ), आकाश लक्ष्मण कांबळे (वय 21, रा. थेरगाव. मूळ रा. शिंदेगे, ता. सोलापूर), शैलेश शांताराम भोईर (वय 32, रा. भोईरवाडी, जय गणेश कॉलनी, ता. मुळशी), कृष्ण रमेश कडेळ (वय 20, रा. साखरे वस्ती हिंजवडी. मूळ रा. गोपाळपूर बीड), राजाराम खेंगरे (वय 21, रा. साखरे वस्ती हिंजवडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी ज्ञानेश्वर सतु केदारी (वय 55, रा. पिंपळे सौदागर पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ज्ञानेश्वर यांचा मुलगा दत्तात्रय ज्ञानेश्वर केदारी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. आरोपींनी दत्तात्रय याच्या बरगडीवर तीक्ष्ण हत्याराने वार केले. यामध्ये दत्तात्रेय गंभीर जखमी झाला. तसेच इतर आरोपींनी ज्ञानेश्वर यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारून गंभीर जखमी केले. दोघांनाही तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हिंजवडी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.