Pune : अवकाळी पावसामुळे पालेभाज्या महागल्या; पुणेकरांचे बजेट कोलमडले

एमपीसी न्यूज – पुणे विभागात सातत्याने सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे पालेभाज्यांचा दारात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे पुणेकरांचे बजेटच कोलमडले आहे. किरकोळ बाजारात टोमॅटो 50 ते 60 रुपये किलो, कोथिंबीर 50 ते 60 रुपये, मेथी 20 ते 30 रुपये, पालक 40 ते 50 रुपये, शेपू 20 ते 30 रुपये, मटार 120 रुपये, गाजर 60 ते 80 रुपये दराने विकली जात आहेत.

साधारणपणे दिवाळीनंतर नवीन पालेभाज्यांची आवक होते आणि दर कमी होतात. पण, यावेळी ऑक्टोबर महिना संपला. नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी पाऊस काही थांबायला तयार नाही. अवकाळी पावसामुळे शेतक-यांचेही मोठे नुकसान झाल्याचे पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले. येत्या 5 नोव्हेंबर नंतर आणखी अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आणखी पालेभाज्या कडाडणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

300 रुपये कमी पडतात
पालेभाज्या घेण्यासाठी गेलो असता 300 रुपये सुद्धा कमी पडत असल्याचे गृहिणी सुनीता गुंड यांनी सांगितले. पालेभाज्यांचा दारात सातत्याने वाढ होत आहे. त्यामानाने पगारात वाढ होत नसल्याचे अशोक दांगट म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.