Narayan Rane : नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेले वक्तव्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य समजावे लागेल – जयंत पाटील 

भाजप राणे यांच्या पाठीशी, अटकेच्या निषेधार्थ निदर्शने करणार - प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – केंद्रात नव्याने मंत्री झालेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य हे त्यांचे नसून नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य समजावे लागेल. कारण त्यांनीच नारायण राणे यांना मंत्री केले आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत लवकर खुलासा करावा. नाहीतर राज्यात व देशात लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्र्यांच्या मागे भाजपचे लोक लागले आहेत, असे चित्र निर्माण होईल, असेही जयंत पाटील म्हणाले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानंतर पत्रकारांनी जयंत पाटील यांना प्रतिक्रिया विचारली असता वरील वक्तव्य केले आहे.

नारायण राणे यांचे वक्तव्य निषेधार्ह आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असे बोलणे हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. अशी भाषा राजकारणात यापूर्वी कधीही कुणी वापरलेली नाही. नरेंद्र मोदींनी कसे सहकारी निवडले आहेत, याची छोटीशी चुणूक नारायण राणे यांच्या वक्तव्यावरुन राज्याला व देशाला कळली असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

राजकारणाचा स्तर खाली गेला असे, नाही तर काही लोकांचा स्तर खाली गेला, अशा शब्दात पाटील यांनी राणे यांचा समाचार घेतला.

अशा पध्दतीने बोलणार्‍या लोकांना प्रत्येक राजकीय पक्षांनी किती महत्त्व देणे, यावर विचार केला पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तुम्हाला भले राग असेल किंवा भाजपला उध्दव ठाकरेंचा द्वेष असेल, राग असेल तरी ही भाषा महाराष्ट्र कधीही मान्य करणार नाही. दुर्दैवाने ही भाषा वापरली त्याबद्दल जयंत पाटील यांनी निषेध व्यक्त केला आहे.

चंद्रकांत पाटील यांना जास्त मनावर घेत जाऊ नका. दोन वर्षे ते राजकीय बदल होणार हेच सांगत आहेत. त्यामुळे तुम्हीच तुमचा टीआरपी टिकवायचा असेल तर चंद्रकांत पाटील यांना किती महत्त्व द्यायचे, हे ठरवा अशी विनंती जयंत पाटील यांनी माध्यमांना केली.

जनतेने निवडलेल्या मुख्यमंत्र्यांचा हा अपमान असून ज्यावेळी मुद्दे संपतात त्यावेळी माणसे गुद्दयावर येतात. भाजपचे मुद्दे संपलेले आहेत, हे यावरून स्पष्ट दिसत आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

 

भाजप राणे यांच्या पाठीशी, अटकेच्या निषेधार्थ निदर्शने करणार – प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

भारतीय जनता पक्ष केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पाठीशी असून त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपचे कार्यकर्ते राज्यभर प्रखर निदर्शने करतील, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केली.

ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी सांगितले की, कोणतेही अटक वॉरंट नसताना केंद्रीय मंत्र्याला अटक करण्याचा प्रकार देशात पहिल्यांदाच घडला आहे. जनादेशाच्या विरोधात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीने सत्तेचा दुरूपयोग करून सूडबुद्धी राणे यांना अटक केली आहे. भाजप याचा निषेध करते.

ते म्हणाले की,  नारायण राणे हे पक्षासाठी महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्या कर्तृत्वामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला आहे. राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे घाबरून आघाडी सरकारने कारवाई केली आहे. त्यासाठी बळाचा वापर करा, असे पालकमंत्री सांगत असल्याचेही वाहिन्यांवरून स्पष्ट झाले आहे.

त्यांनी सांगितले की, नारायण राणे यांच्या सुटकेसाठी भाजप सर्व ते प्रयत्न करेल. या बाबतीत न्यायालय योग्य तो आदेश देईल, असा विश्वास आहे. खासदार म्हणून त्यांना असलेल्या विशेषाधिकारांचा भंग झाल्यामुळे संसदेत संबंधितांकडेही भाजपच्या खासदारांकडून तक्रार करण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.