Pune News : नवीन शैक्षणिक धोरण भारत केंद्रीत – काशिपतीजी 

विद्या भारतीच्या पायाभूत शिक्षण प्रशिक्षण वर्गाचा समारोप 

एमपीसी न्यूज : नवीन शैक्षणिक धोरण हे भारत केंद्रीत आहे. त्यामुळे नवीन पिढ्या भारताच्या गौरवशाली परंपरेला जोडल्या जातील, असा विश्वास विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थेचे केंद्रीय संघटन मंत्री जे. एम्. काशिपतीजी यांनी रविवारी (ता. 11) व्यक्त केले. 

विद्या भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने ऑनलाइन पद्धतीने आयोजित केलेल्या पायाभूत शिक्षण प्रशिक्षण वर्गाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. नवीन शैक्षणिक धोरण हे भारताच्या सूचक भविष्याचा प्रारंभ आहे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रशिक्षणावर आधारीत एका  `इ-पुस्तिके`चे प्रकाशन श्री. जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार पहिल्या टप्प्यातील शिशूवर्ग ते इयत्ता दुसरी पर्यंतच्या टप्प्यातील शिक्षणाला ‘पायाभूत शिक्षण’, असे संबोधण्यात येते. गेले 4 ते 11 जुलै असे आठ दिवस ऑनलाइन पद्धतीने झालेल्या या वर्गात या गटातील विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिकवतांना कोणकोणत्या पद्धतींचा वापर करावा, शिशू केंद्रीत, संस्कारक्षम आणि अनंददायी शिक्षण कसे द्यावे याचे प्रशिक्षण या कार्यक्रमात देण्यात आले. महाराष्ट्र आणि गोवा राज्यामधून 321 शिक्षक, संस्थाचालक आणि पालक या प्रशिक्षण वर्गात सहभागी झाले होते.

कार्यक्रमाला विद्या भारतीच्या महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे क्षेत्र संयोजक सदाशिव उर्फ भाई उपाले, पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष अनिल महाजन, प्रांत मंत्री मोहन कुलकर्णी, सहमंत्री रघुनाथ देविकर, सुनीता जाधव, आणि इतर कार्यकारीणी सदस्य उपस्थित होते. नाशिकहून सविता कुलकर्णी यांनी सूत्रसंचलन केले. तर पुण्याच्या प्रगती भावसार यांनी संपूर्ण तांत्रिक बाजू सांभाळली.

श्री. काशिपती म्हणाले, “शैक्षणिक धोरण हे कालसुसंगत असले पाहिजे. त्या पद्धतीने नवीन शैक्षणिक धोरणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. शिक्षण हे केवळ शासन, प्रशासनाची जबाबदारी नाही. त्यासाठी सामाजिक सहभाग महत्त्वाचा असतो. सर्व प्रकारची सावधानता बाळगत नवीन शैक्षणिक धोरण समाजात रुजविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. विद्या भारतीचे देशभरातील कार्यकर्ते त्यासाठी प्रयत्नशील आहेत. समाजातील अन्य शैक्षणिक संस्था, शिक्षक व पालकही त्यास जोडले गेले पाहिजेत”.

श्री. जाधव म्हणाले, “पारतंत्र्यात इंग्रजांनी भारतातील पारंपारिक शिक्षण पद्धतीवर घाव घातला. स्वातंत्र्यानंतर प्रथम देशाच्या शिक्षण पद्धतीत बदल केला पाहिजे, असा आग्रह स्वातंत्रयवीर सावरकर यांनी धरला होता. मात्र, स्वातंत्र्यानंतर तत्कालिन काँग्रेस सरकारच्या धोरणांत त्याला वाव नसल्याने स्वात्तंत्र्यानंतरही गेली अनेक वर्षे मेकॉलेची शिक्षण पद्दत अवलंबिण्यात येत आहे. सुदैवाने 2014 मध्ये मोदी सरकारने शैक्षणिक धोरणात बदल करण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली. नवीन शैक्षणिक प्रणाली ही क्रांतीकारक निर्णय असून ती भविष्यात जगाला मार्गदर्शक ठरू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या धोरणाच्या पायाभूत शिक्षणाच्या अंमलबजावणीसाठी विद्या भारतीने पाऊल टाकले आहे. शिक्षकांनी प्रशिक्षण घेण्याचा आग्रह जाधव यांनी धरला.

या पायाभूत शिक्षण प्रशिक्षण वर्गात बालकांचा बौद्धिक, शारीरिक, मानसिक व भावनिक विकास कसा करावा तसेच हसत खेळत शिक्षण देत बाल संगोपन कसा करावे या विषयी संयोजकांनी उत्तम मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणातील शैक्षणिक उपक्रमांमुळे बालकांबरोबर पालकांचेही प्रबोधन होईल. आम्ही आमच्या शिशुशाळांमध्ये राबवू, अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया प्रशिक्षण वर्गात सहभागी झालेल्या सुजाता पाटील (कोल्हापूर), सीमा टोणगावकर (निगडी), सायली देशमुख (सोलापूर), सुवर्णा दुधभाते (उमरगा), सुधा वाघमारे (लातूर), विद्या खराडी, अस्मिता कडू (जुन्नर) यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.