Pimpri : महाशिवरात्रीनिमित्त रताळी आणि कवटांना मागणी

एमपीसी न्यूज – महाशिवरात्रीनिमित्त पिंपरीतील लालबहादूर शास्त्री मंडईत सातारा-कोल्हापूर आणि विजापूर भागातील रताळ्यांची रविवारी मोठी आवक झाली आहे तसेच कवठ फळेही मंडईत दाखल झाली आहेत.

येथील मंडईत शनिवारपासूनच रताळी, कवठांची आवक सुरू झाली. सातारा-कोल्हापुरातील कराड-मलकापूर येथील रताळ्याचे भाव ३० ते ४० रुपये, तर विजापूर येथील रताळ्याचे भाव २० ते २५ रुपये प्रतिकिलो आहेत. भाजी विक्रेते अमोल गोरडे म्हणाले, ‘‘कराड-मलकापूर येथील रताळ्याचा रंग गडद लाल-गुलाबी असून विजापुरी रताळी अतिशय फिकट गुलाबी रंगाची आहेत.

  • विजापूरच्या तुलनेत कराड-मलकापूर येथील रताळी चवीला गोड असल्याने त्यांना जास्त मागणी आहे. प्रत्येक दुकानांवर सरासरी ८ ते १० पोती रताळ्याची आवक झाली. त्यांची एकूण आवक ३० टन राहिली.’’ महाशिवरात्रीच्या दिवशी विशेष महत्त्व असलेल्या कवठाचीही आवक झाली. नांदेड, बीड, जालना भागामधील कवठफळे विक्रीसाठी दाखल झाली आहेत. त्यांचे भाव प्रतिनग ५ ते १० रुपये आहेत.

कवठांचे वाढले उत्पन्न
महाशिवरात्रीच्या उपवासासाठी कवठालाही विशेष महत्त्व आहे. याच्या बियांचे सेवन केल्याशिवाय उपवास घडत नसल्याची भाविकांची धारणा आहे. त्यामुळे कवठ खरेदी करण्यासाठीही ग्राहकांनी गर्दी केली होती. १४ ते १५ टेंपो म्हणजेच जवळपास दीड हजार पोत्यांची आवक झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. एका पोत्यामध्ये २०० ते ३०० कवठे असतात. ही आवक नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्‍यामधील कोरडगावातून झाली.
कवठांची २० ते २५ झाडे आहेत. त्यातून वर्षाला ३० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. कवठांपासून उपवासाची चटणी तसेच इतरवेळी साधी चटणीही केली जाते, त्याचप्रमाणे मधुमेहासाठी आयुर्वेदिक औषध म्हणूनही कवठाला मागणी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.