Pimpri : भारत हे आनंदी राष्ट्र झाले पाहिजे – राजेंद्र घावटे

एमपीसी न्यूज – विकास हा सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचला पाहिजे. प्रश्नांना उत्तरे शोधली नाहीत तर महासत्ता बनण्याचे स्वप्न हे दिवास्वप्नच ठरेल. सकल समाज सुखी करणे ही महासत्ता बनण्याची पहिली पायरी आहे. म्हणून प्रथम भारत हे आनंदी राष्ट्र झाले पाहिजे.” असे मत जेष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी किवळे विकासनगर येथे व्यक्त केले.

विकासनगर व्याख्यानमाला समितीची तीन दिवसीय व्याख्यानमालेचे उदघाटन झाले. प्रथम पुष्प जेष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी गुंफले. “भारत एक महासत्ता स्वप्न आणि वास्तव”या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमास माजी नगरसेवक बाळासाहेब तरस, युवा उद्योजक राजेश मांढरे, जेष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष नानासाहेब डोईफोडे; इलियास खान, कुदळे, सुरेखा आदी नागरिक व महिला उपस्थित होते.

राजेंद्र घावटे म्हणाले की “देश महासत्ता होण्याचे स्वप्न जरूर पाहिले पाहिजे. पण आज महासत्ता असणाऱ्या देशात सर्व आलबेल आहे अशी परिस्थिती आहे का ? महासत्ता होण्यासाठी आज अनेक अंतर्गत आणि बाह्य प्रश्न आहेत. त्यांचे योग्य निराकरण करावे लागेल. सरकार कुणाचेही असो, त्यांना उत्तम कार्य करण्यासाठी जनतेचे सहकार्य महत्वाचे आहे. विकास हा सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचला पाहिजे. प्रश्नांना उत्तरे शोधली नाहीत तर महासत्ता बनण्याचे स्वप्न हे दिवास्वप्नच ठरेल. परराष्ट्र धोरण, सामरिक ध्येय, विकास,इतिहास या संदर्भातील अनेक प्रसंग सांगितले”.
राजेंद्र घावटे पुढे म्हणाले की,” महासत्ता नेमकी कोणाला हवी आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना, बेरोजगार असणाऱ्या मजुरांना, प्रचंड आर्थिक विषमतेखाली दबलेल्या दरिद्री जनतेला ? भारताच्या वैभवशाली परंपरांचा, वैशिष्ट्यांचा गौरव करत असतानाच येणाऱ्या आव्हानांना मुकाबला करण्याची तयारी जनतेने मनापासून केली पाहिजे. देशात असणाऱ्या समस्यांनी देशाची प्रगती खुंटते.

आतंकवाद, भ्रष्टाचार,सार्वजनिक नैतिकता, स्वैराचार, पर्यावरण ऱ्हास, नद्यांची गटारगंगा,परीक्षार्थी व पोटार्थी शिक्षणव्यवस्था, टोकाची धर्मांधता, जातीपातीचे गलिच्छ राजकारण, भडक प्रसार माध्यमे, अंधश्रद्धा, दुरावलेला देशाभिमान, सार्वजनिक आचारसंहितेचा अभाव, ह्यावर जनतेने मात केल्यास भारत जगात सुखी समाधानी, आनंदी म्हणजेच सुजलाम सुफलाम होण्यास निश्चितच वाव आहे. सरकार बरोबरच जनतेला त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. संतसाहित्य, सुधारक, समाजसेवक यांचे अनेक दाखले देत, कुसुमाग्रज, केशवसुत, रवींद्रनाथ टागोर, बाबा आमटे आणि संतांच्या काव्यपंक्तीची आपल्या मनोगतात पेरणी करत घावटे यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आणि समर्थ भारतासाठी आशावाद व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश गाडे यांनी केले. रवींद्र कदम यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे नियोजन उपाध्यक्ष सुनीता पांडे, डॉ. कुलकर्णी, माणिकराव ऐकाड, मारुती बराटे यांनी केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.