Pimpri News : थकित देय रक्कम द्या ; VRS घेतलेल्या HA कामगारांचे कंपनीसमोर आंदोलन

एमपीसी न्यूज – पिंपरीतील हिंदुस्थान अँटीबायोटीक्स (एचए)च्या व्हीआरएस घेतलेल्या कामगारांनी थकित देय रक्कम द्यावी या मागणीसाठी कंपनीसमोर आज (दि.1) आंदोलन केले. कंपनी व्यस्थापन कामगारांना अपमानकारक वागणूक देत असून आम्हाला कंपनीत प्रवेश दिला जात नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसेच कंपनीने त्वरित थकित देय रक्कम द्यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

पिंपरीतील हिंदुस्तान एंटीबायोटिक्स लि. कंपनीच्या 400 कर्मचा-यांना डिसेंबर 2019 व मार्च 2020 रोजी दोन बॅजमध्ये व्हीआरएस देण्यात आली. त्यानंतर पीएफची रक्कम दिली गेली. सिंगल विंडो पेमेन्ट पद्धतीनुसार इतर देय रक्कम देखील त्वरित मिळणे आवश्यक होते.

मात्र, एक वर्षाहून अधिक काळ उलटला तरी कंपनीने थकित देय रक्कम दिली नाही. कंपनी दमदाटी करत आहे. तसेच, अपमानास्पद वागणूक देत असल्याचे एचए कामगार युनियनचे उपाध्यक्ष वाय. बी. गायकवाड यांनी सांगितले.

गायकवाड पुढे म्हणाले, एक वर्षापासून आम्ही आंदोलन करीत आहोत. पण कंपनी काहीच दखल घेत नाही. कामगारांना वैद्यकीय खर्चाची रक्कम, ग्रॅज्युइटीची रक्कम, चुकीच्या पद्धतीने केलेली कपात आणि फरक मिळावा, अशी आमची मागणी आहे. मात्र, कंपनी व्यवस्थापन चर्चा करण्यास तयार नाही.

तसेच गेट वरूनच कामगारांना हकलून देत धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज पाच लोकांचे पथक कंपनी पदाधिका-यांसोबत चर्चेसाठी गेले. त्यांना आमच्या मागण्यांचे निवेदन दिले जाणार असल्याचे गायकवाड म्हणाले.

‘जानेवारीत कामगार पगारवाढ मागतात. त्यामुळे 31 डिसेंबर 2019 ला एक नोटीस देऊन आम्हाला रात्रीच्या वेळी उद्यापासून कामावर येऊ नका, असे सांगितले. त्यानंतर त्याच दिवशी रात्री आम्ही कंपनीसमोर आंदोलन केलं. व्हीआरएसच्या नियमानुसार सर्व हिशेब एकदम होणं अपेक्षित होते पण तसे झाले नाही. कंपनी व्यवस्थापन उद्धटपणे वागते. – पोर्णिमा जाधव.

‘एक वर्ष झाले अद्याप फरकाची रक्कम मिळाली नाही. कंपनीकडून मिळालेले घर खाली करण्यास सांगितले. कंपनीने केलेल्या हिशोबात चुका आहेत. यावर कामगारांचे आक्षेप आहेत. प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करावा.’ – सॅम्युअल जाधव.

‘जानेवारी 2020 ला पगार वाढ होणार होती, पण 31 डिसेंबर 2019 रोजी व्हिआरएस दिली. यामुळे आर्थिक फटका बसला. एरिअर्सच्या रक्कमेत घोळ आहे. कंपनी अपमानास्पद वागणूक देत आहे. व्हिजिलन्स विभागाच्या निता घोष कंपनी व्यवस्थापनासोबत मिळालेल्या असून, त्या आल्यानंतर कामगारांचा छळ अधिक होऊ लागला. यांच्यामुळे अनेकांना सेवा राहिली असताना देखील व्हिआरएस देण्यात आली. ‘ – अनिता सोनवणे.

दरम्यान, या प्रकरणी कंपनीचे व्यावस्थापन विभाग प्रमुख तसेच, व्हिजिलन्स विभागाच्या नीता घोष यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्य़ाशी संपर्क होऊ शकला नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.