Pimpri News : बहुजन समाजाला शिवरायांच्या विचारांची गरज : ॲड. लक्ष्मण रानवडे
एमपीसीन्यूज : बहुजन समाजातील लोकांनी शिवाजी महाराजांचे खरे विचार वाचले आणि समजून घेतले पाहिजे. जेणे करून त्याचा प्रसार आणि प्रचार केला जाईल. शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदार आणि अठरा पगड जाती यांना एकत्र करून कुठल्याही प्रकारचा जातीभेद न मानता स्वराज्य निर्माण केले, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे यांनी केले.
संत तुकाराम नगर येथील पंचशील संघाच्या बुद्ध विहारात आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचशिल संघाचे विजय गायकवाड होते.
गायकवाड म्हणाले, शिवाजी महाराज एक उत्तम संघटक होते. त्यांना माणसांची पारख होती. तानाजी मालुसरे, कोंडाजी, यसाजी, बाजीप्रभू देशपांडे, मदारी मेहतर, काजी हैदर, नूरय्या बेग, हिरोजी फर्जंद, सिद्दी हिलाल असे विश्वासू मावळे महाराजांसोबत होते. म्हणून स्वराज्य निर्माण झाले.
सूत्रसंचालन सचिव रमेश झेंडे यांनी केले. आभार विशाल कांबळे यांनी मानले.