Pimpri : रमेश पतंगे लिखित ‘समरसतेचा वाटसरू’ पुस्तकाचे प्रकाशन; अभ्यासकांसह मान्यवरांची उपस्थिती

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासू लेखक रमेश पतंगे लिखित ‘समरसतेचा वाटसरू’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. ‘गुरुकुलम प्रकाशन’ने हे पुस्तक प्रकाशित केले. गुरुकुलम प्रकाशनाचे हे पहिलेच पुस्तक आहे. वैचारिकतेतून निर्माण झालेली सामाजिक समरसता आणि त्या समरसतेची गरज आपल्याला या पुस्तकातून अभ्यासायला मिळते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहसंपर्क प्रमुख मिलिंद देशपांडे, चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, लेखक रमेश पतंगे, विवेक संस्थेचे प्रदीप गुप्ता, कार्यवाह अ‍ॅड. सतीश गोरडे, सहकार्यवाह रवी नामदे यांच्या हस्ते या पुरस्काचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी चापेकर स्मारक समितीचे संचालक गतिराम भोईर, अशोक पारखी, नीता मोहिते, नितीन बारणे, शिक्षक, शहरातील लेखक व अभ्यासक उपस्थित होते.

यावेळी गिरीश प्रभुणे म्हणाले, “समरसता रमेश पतंगे यांच्या जीवनात प्रत्येक क्षणात आढळते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये अनेक नवीन विषय मांडून त्यांनी संघाची वैचारिक जडणघडण केली आहे. ‘समरसतेचा वाटसरू’ या पुस्तकातून संघ विचारांचे दर्शन घडते. संघ विचार म्हणजे केवळ एकाच विशिष्ट जाती-धर्मावर आधारित नसून इथे प्रत्येक जाती, धर्माला सामान स्थान आहे. ही समरसता पतंगे यांनी या पुस्तकातून मांडली आहे.

गुरुकुलम प्रकाशनची दिशा सुरुवातीपासून ठरलेली आहे. कथात्मक आणि केवळ मनोरंजनाची पुस्तके या प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाशित होणार नाहीत. तर वैचारिक साहित्यातून नवीन समाज घडवणारी पुस्तके गुरुकुलम प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाशित केली जाणार आहेत, असेही प्रभुणे म्हणाले.

‘समरसतेचा वाटसरू’ या पुस्तकाचे लेखक रमेश पतंगे म्हणाले, “समरसता आणि समता याबाबत समाजात सध्या अनेक मत-मतांतरे आहेत. या दोन शब्दांना जाती धर्माची किनार दिली जाते. त्यामुळे हे शब्द समजून घेणं आणि ते समाजासमोर मांडणं ही आपली जबाबदारी आहे. त्यातून ‘समरसता’ या शब्दावर लिखाणाचा प्रवास सुरू झाला. काही लोक स्वतःला प्रकांड पंडित म्हणून घेतात. त्यांच्या डोक्यातील हवा काढण्यासाठी हे पुस्तक उपयोगी पडेल. समाजातील सर्व भागातील संदर्भ देत या पुस्तकाचे लिखाण करण्यात आले आहे.”

रमेश पतंगे यांनी पुस्तकाची रॉयल्टी पुनरुत्थान समरसता गुरुकुलमला देण्यात येत असल्याची घोषणा यावेळी केली. पैसे मिळवण्यासाठी या पुस्तकाचे लिखाण केले नसून सामाजिक जडणघडणीत आपली भूमिका मांडण्यासाठी व समाजाला प्रेरणा देण्यासाठी या पुस्तकाचे लिखाण करण्यात आले असल्याचेही पतंगे यांनी सांगितले.

अ‍ॅड.सतीश गोरडे म्हणाले, ‘समरसतेचा वाटसरू’ हे पुस्तक अनुभवात्मक, आत्मचिंतक आहे. या पुस्तकाने आम्हाला संघसाक्षर केले. या पुस्तकामुळे संघाबद्दल असणारे पूर्वग्रह निघून गेले आणि आदर तयार झाला. धर्म आणि जातीचे जोडे बाहेर ठेऊन पुस्तक वाचायला हवे.”एका वळणावरून सुरू झालेला प्रवास विज्ञाननिष्ठ विचारांची कास धरून, जाती निर्मूलन आणि समरसता येथे थांबतो. एक अंतर्मुख करायला लावणारे अनुभव प्रदान करणारे पुस्तक असून हे पुस्तक म्हणजे “संघाची समरसतेची गाथा” असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

शिक्षिका सुनीता गोडे, मंजुषा गोडसे, अ‍ॅड. दीपाली गाडे यांनी पुस्तकाबद्दल मते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता जोशी यांनी केले. असाराम कसबे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.