Pune : भारत-श्रीलंका लष्कराचा पुण्यात दहशतवादाविरोधात संयुक्त लष्करी सराव

एमपीसी न्यूज – सीमेवर अतिरेकी कारवायांचा बिमोड करण्यासाठी लष्कराचा जसा थरार सुरू असतो तसाच थरार पुण्याच्या औंधमधील लष्करी कॅम्पमध्ये अनुभवायला मिळाला. निमित्त होतं भारत आणि श्रीलंका या दोन देशाच्या लष्कराच्या संयुक्त युद्ध सरावाचे. ‘मित्र शक्ती’ या नावाने या दोन देशात मागील काही वर्षांपासून हा सराव केला जातो. यात दोन्ही देशाचे सैनिक संयुक्तपणे दहशतवादाविरोधातील ऑपरेशन राबवतात.

एखादी कारवाई करण्यासाठी वेगवेगळ्या देशातील सैनिकामध्ये समन्वय असणे ही महत्वपूर्ण बाब असते. दहशतवाद ही जगाला भेडसावणारी समस्या असून त्याविरोधात सर्व राष्ट्रांनी एकत्रित येत त्याचा बिमोड करणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून भारत आणि श्रीलंका या दोन देशातील एकूण 240 जवान मित्र शक्ती या युद्ध सरावात सहभागी झालेत.

दोन आठवडे चालणाऱ्या या युद्ध सरावात घनदाट जंगलातील लपलेल्या अतिरेक्यांचा बिमोड करणे, संशयास्पद वस्तूंची पाहणी करणे आणि सुरक्षेचा दृष्टीने संरक्षित भाग स्वतःचा अधिपत्याखाली आणणे, या सर्व गोष्टींचा अभ्यास केला जात आहे. दहशतवादयांवर कारवाई करताना वेळप्रसंगी हेलिकॉप्टरच्या सह्याने घटनास्थळी पोहचून मदत करणे, ड्रोनच्या मदतीने आक्षेपार्ह घटना टिपणे अतिरेक्यांचा माग कडून त्यांचा बंदोबस्त करणे या संदर्भात सराव केला जात आहे.

विविध ठिकाणी पेरण्यात आलेली भुसुरुंगे ओळखणे, ती निकामी करण्याकरीता विविध तंत्रज्ञानाचा अवलंब करणे. सार्वजनिक ठिकाणी पेरण्यात आलेली भूसुरुंग प्रसंगी खबरदारी घेणे याबाबत जवानांना प्रशिक्षित करण्यात येत आहे.

या युद्ध सरावात भारताची सुमारे 11 कुमाऊ बटालियन सहभागी झाली असून श्रीलंकेची जेमुनू वॉच बटालियनचाही सहभाग आहे. दोन्ही देशांच्या वेगवेगळ्या ड्रिल एकत्रित करत संयुक्य ड्रिल द्वारे ऑपरेशन राबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जागतिक शांततेसाठी आशा प्रकारच्या सरावांचा उपयोग होऊ शकेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.