Pune : किशोरीताई आमोणकर यांनी जयपूर अत्रौली घराण्याच्या गायकीला नवा आयाम दिला – पं विश्व मोहन भट्ट

एमपीसी न्यूज – जेव्हा गानसरस्वती किशोरीताई आमोणकर (Pune) गायच्या तेव्हा हजारो कोकिळा गातायेत असा भास व्हायचा. त्यांच्या गाण्यात रागांची शुद्धता होती. त्यांनी जयपूर अत्रौली घराण्याच्या गायकीला नवा आयाम दिला असे गौरवोद्गार ग्रॅमी पुरस्कार विजेते पद्मभूषण पं विश्व मोहन भट्ट यांनी काढले. नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक योगदानाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या गानसरस्वती महोत्सवात ते बोलत होते.

राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे संपन्न झालेल्या यावर्षीच्या दहाव्या गानसरस्वती महोत्सवात पद्मभूषण पं विश्व मोहन भट्ट यांचा सातत्यपूर्ण संगीत सेवेकरिता यावर्षीचा गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार प्रदान करीत सन्मान करण्यात आला. रोख रुपये 51 हजार, मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. नाट्यसंपदा प्रतिष्ठानचे विश्वस्त व सुप्रसिद्ध गायक पं रघुनंदन पणशीकर, अपर्णा पणशीकर, गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे सुपुत्र बिभास आमोणकर, निहार आमोणकर यांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पंडित विश्व मोहन भट्ट यांनी ‘म्हारो प्रणाम…’ चे बोल गुणगुणत उपस्थितांचे नमस्कार स्वीकारले यावेळी (Pune) बोलताना ते म्हणाले, “किशोरीताई यांचे गाणे म्हणजे एखादा बगीचा फुलल्याची, बहार आल्याची जणू जाणीव होती. त्यांच्या गायकीत एक चमक होती. असे कलाकार मोजकेच होतात आणि किशोरीताई या त्यांपैकी एक होत्या. जयपूर अत्रौली घराण्याच्या गायकीला त्यांनी नवा आयाम दिलाच यासोबत या घराण्याची गायकी, चीजा त्यांच्या गायकीतून पुढच्या पिढीला मिळत गेल्या.

Pune : महासंस्कृती महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करा – ज्योती कदम

पंडित विश्व मोहन भट्ट यांनी यावेळी स्वतः तयार केलेल्या मोहनवीणेवर स्वतः रचलेला राग विश्वरंजनी सादर केला. यामध्ये त्यांनी आलाप, जोड -आलापचे दमदार सादरीकरण केले. यावेळी त्यांचे शिष्य आणि सुपुत्र पंडित सलील भट्ट यांनी सात्विकवीणेवर सहवादन केले. पंडित विश्व मोहन भट्ट यांचे मोहनवीणा वादन आणि पंडीत सलील भट्ट यांचे सात्विकवीणा वादन यांनी उपस्थितांना एकाच वेळी सप्तकात अनेक वीणा वाजत असल्याचा अनुभव दिला. ग्रॅमी पुरस्कार विजेती रचना सादर करीत या दोघांनी आपल्या वादनाचा समारोप केला. पंडित विश्व मोहन भट्ट आणि पंडीत सलील भट्ट यांना तबल्यावर अभिषेक मिश्रा यांनी समर्पक साथ केली. मिलिंद कुलकर्णी यांनी यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.