Pune : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘अनंत’ दृष्टिकोन ठेवावा: डॉ. ज्ञानेश्वर मुळे

अनंत व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प

एमपीसी न्यूज – स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वतःला काय व्हायचं आहे? हे अगोदर ठरवा. यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षेच्या मृगजळात अडकू नका. अपयश आले म्हणून निराश न होता ‘अनंत’ दृष्टिकोन ठेवावा. स्पर्धा परीक्षा हे एक फॅड- फॅशन झाली असून इथं अनेक स्वप्न विकणाऱ्या कोचिंग संस्था तयार झाल्या आहेत.

Dighi : बालविवाह प्रकरणी पतीसह नातेवाईकांवर गुन्हा दाखल

तसेच शिक्षणासाठी, नोकरीसाठी परदेशात जाणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. आपल्या देशातून बुद्धिमत्ता, मेंदूची होणारी निर्यात ही गंभीर समस्या आहे. असे प्रतिपादन भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे माजी सचिव, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य व साहित्यिक डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी केले.

 

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे (Pune) जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने अनंत ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे माजी सचिव, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य व साहित्यिक डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी यूपीएससी, एमपीएससी या नागरी सेवा स्पर्धा परीक्षांमध्ये होणाऱ्या बदलांचा महाराष्ट्रातील स्पर्धकांवर होणारा परिणाम या विषयावर गुंफले. या प्रसंगी ज्ञानेश्वर मुळे बोलत होते.

 

प्रास्ताविक व स्वागत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य ॲड. संदीप कदम यांनी केले.

 

प्रास्ताविकात मानद सचिव ॲड. संदीप कदम यांनी अनंत व्याख्यानमालेचा उद्देश व उपयोगिता स्पष्ट केली. नवीन शैक्षणिक धोरणात अपेक्षित असणारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढी बरोबरच विविध उपक्रमांचे आयोजन संस्थेच्या वतीने केले जातात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची सखोल माहिती मिळणे गरजचे यासाठी आजचे व्याख्यान महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

 

मुळे पुढे म्हणाले, देशसेवा करण्यासाठी अनेक क्षेत्रात प्रचंड संधी आहे. देशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अनेक तज्ज्ञांची आवश्यकता आहे. देशात मोठ्या प्रमाणात विषमता, शांतता आणि पर्यावरण यासंदर्भात समस्या आहेत.

 

या समस्या सोडवण्यासाठी नव्याने विचार करण्याऱ्या नेतृत्वाची गरज आहे. असे नेतृत्व तयार झाले तर जग वाचवण्यासाठीचे नेतृत्व भारतच करेल. स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्ये रुजवून सकारात्मकता, सहवेदना आणि सर्जनशीलता विकसित करत चांगुलपणापणाची चळवळ पुढे नेत नवे जग बनविण्याचा प्रयत्न करूयात.

 

भारतीय परराष्ट्र सेवेत काम करत असताना जागतिक स्तरावरील विविध प्रश्न, सामान्यांना अतिशय अवघड वाटणारी पासपोर्ट प्रक्रिया अतिशय सोपी करत देशभरात निर्माण झालेली ‘पासपोर्ट मॅन’ पर्यंतचा प्रवास त्यांनी उलगडला.

 

या प्रसंगी पुणे (Pune) जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम. पवार, सहसचिव (प्रशासन) ए. एम. जाधव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. एम. जी. चासकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे आदी उपस्थित होते. या व्याखानास तीन हजार श्रोते उपस्थित होते.

 

सूत्रसंचालन अमृता खराडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ. प्राचार्य डॉ. अभय खंडागळे यांनी केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.