World Cup 2023 : भारताचे नेदरलँड समोर 411 धावांचे लक्ष्य

एमपीएससी न्यूज (विवेक कुलकर्णी) – बंगलोर येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध नेदरलँड सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना श्रेयस अय्यर 128 धावा आणि के एल राहुल 102 धावा यांनी केलेली शतकी खेळी त्यासोबतच कर्णधार रोहित शर्मा 61 धावा शुभमन गिल 51 धावा आणि विराट कोहली 51 धावा यांनी दिलेले अर्धशतकी योगदान या दमदार खेळीच्या जोरावर भारताने नेदरलँड समोर 411 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले आहे. या विश्वचषकमध्ये (World Cup 2023) भारतीय गोलंदाजांनी मागील 8 सामन्यांमध्ये केकेल्या शानदार कामगिरीचा विचार करता, नेदरलँडचा संघ किती धावांपर्यंत मजल मारेल, हे पाहणे महत्वाचे ठरेल. 

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अतिशय शानदार (World Cup 2023)फॉर्मात असलेल्या भारतीय संघाने या विश्वकप स्पर्धेत यजमानपदाला जितक्या उत्तमपणे न्याय दिला,तितक्याच शानदार पध्दतीने संघाने एकापेक्षा एक अशा दिग्गज संघाला चारी मुंड्या चित करत सलग 8 विजय मिळवून इतर संघांना कडक इशारा दिलाच होता. आज ते आपल्या सलग नवव्या विजयासाठी नेदरलँड या तशा तुलनेने नवख्या पण एका जिगरबाज संघासोबत बंगलोरच्या चिंनास्वामी मैदानावर लढणार होते ज्यात नाणेफेकीचा कौल रोहितच्या बाजूने लागला.आज भारतीय संघाने आपल्या विजयी संघात काहीही बदल न करता उपांत्यफेरीच्या सामन्याचा सराव करण्याच्या दृष्टीने तोच विजयी संघ कायम ठेवणे पसंत केले.

आज भारतीय डावाच्या सुरुवात करताना गील (World Cup 2023)आणि रोहित शर्मा जोडीने अतिशय स्फोटक अंदाजात केली.दोघेही फलंदाज एकमेकांना सुयोग्य साथ देत नेदरलँड संघाच्या गोलंदाजीवर तुटून पडले होते.

पण यात पहिल्यांदा बाजी मारली ती शुभमन गीलने.त्याने बघताबघता कर्णधार रोहितलाही मागे टाकत पहिल्यांदा अर्धशतक नोंदवले.हे त्याचे एकूण बारावे, विश्वकप मधले 3रे अर्धशतक केवळ 30 चेंडूत आले,ज्यात 3 चौकार आणि 4 उत्तुंग षटकार सामील होते,आणखी एक खास म्हणजे पठयाने 2023 सालात 1500 धावा ही पूर्ण केल्या आहेत ,त्याच्या या फटकेबाजीमुळे भारतीय सलामीने 12 व्या षटकाच्या आतच शतकी भागीदारी पूर्ण केली.दुसऱ्या बाजूने रोहितही त्याच्या चिरपरिचित शैलीत खेळत होता, ही जोडी चांगलीच जमलीय असे वाटत असतानाच गील अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर लगेचच आणखी एक षटकार मारण्याच्या नादात सीमारेषेवर झेलबाद झाला.

तो बाद झाल्यावर मैदानात टाळ्यांच्या कडकडाटात विराट कोहली उतरला.दुसऱ्या बाजूने रोहित शानदार खेळत होताच,थोड्याच वेळात त्यानेही आपले 55 वे अर्धशतक पुर्ण केले.हे करताना त्याने ए बी डीच्या नावावर असलेल्या एका वर्षात मारलेल्या 58 षटकाराच्या विक्रमालाही नेस्तनाबूत करत आपल्या नावावर आणखी एक मोठा विक्रम नोंदवला.कसोटी क्रिकेटमधे भलेही रोहितला आपल्या दर्जाला तितका न्याय देता आला नसेलही, पण एकदिवसीय क्रिकेटमधील तो जगातील सर्वात खतरनाक खेळाडू आहे हे त्याने वारंवार सिद्ध केलेले आहे.त्यातच कर्णधार झाल्यापासून तर त्याच्या एकंदरीत देहबोलीतही प्रचंड सकारात्मक बदल झाला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुन्हा एकदा विश्वकप जिंकेल अशी अपेक्षा करोडो भारतीय समर्थकासह देशभरातील मोठमोठ्या समीक्षकानाही आहेच.

या स्पर्धेत भारतीय संघ तो विश्वास पावलोपावली सार्थ ठरवत अजिंक्य तर राहिलाच पण त्याच सोबत सर्वप्रथम उपांत्यफेरीतही दाखल झालेला आहेच.तिसरे विश्वकप जेतेपद आता फ़क्त दोन पावलावर आहे,त्यात भारतीय संघाला नक्कीच यश मिळावे हीच प्रार्थना आणि अपेक्षा भारतातील प्रत्येक क्रिकेटवेड्या चाहत्यांची असेल.रोहित आज पुन्हा एकदा मोठ्या खेळीकडे वाटचाल करत आहे असे वाटत असतानाच तो वैयक्तिक 63 धावांवर असताना एक उंच फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला, पण त्याने बाद होण्याआधी संघाला खूपच शानदार सुरवात करुन दिली होती.त्याने 54चेंडूत 8 चौकार आणि दोन षटकार मारत या धावा केल्या. त्याच्या जागी खेळायला आला तो या सर्प चांगली कामगिरी करत असलेला श्रेयस अय्यर.बघताबघता या जोडीने जलदगतीने धावा करत अर्धशतकी भागीदारी नोंदवली.

दोघेही आक्रमक आणि आकर्षकरित्या खेळत होते. विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय करीयरमधे एक अतिशय खराब काळ आला होता, त्यातून तो तावूनसुलाखून बाहेर पडला आणि आज त्याचे बावनकशी सोने झाले आहे असे वाटावे असा खेळ तो या वर्षभरात सातत्याने करत आहे.या वर्ल्डकप मधे तर त्याने सर्वाधिक धावा करुन संघाच्या मिशन वर्ल्डकपचे ध्येय पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण फलंदाजी करत संघातल्या अनुभवी सदस्याचे कर्तव्य चोख पार पाडले आहे.आजही त्याने आपले 71 वे अर्धशतक पूर्ण करतानाच या विश्वकप 593 धावा करून आफ्रिकेच्या डिकॉकलाही मागे टाकत विश्वकप स्पर्धा 2023 मध्ये सर्वाधिक धावा करण्यात यश मिळवले आहे. तो पूर्ण भरात येतोय असे वाटत असतानाच तो स्थिर झाल्यानंतर सुद्धा वानडरमर्व्हच्या एका सरळ येणाऱ्या चेंडूवर साफ चकला आणि स्वतःसह असंख्य चाहत्यांनाही निराश करत तंबूत परतला.

त्याने शतकांचे अर्धशतक करावे म्हणून त्याचे असंख्य चाहते वाट बघत आहेत,आज तरी त्या साऱ्यांच्या पदरी निराशाच पडली.विशेष बाब म्हणजे या विश्वकप स्पर्धेत विराट पहिल्यांदच स्पिनरला बाद झाला. यानंतर खेळायला आला तो स्थानिक खेळाडू के एल राहुल.त्याच्या साथीने खेळताना श्रेयसने थोड्याच वेळात आपले या विश्वकप स्पर्धेतले चौथे अर्धशतक पूर्ण केले जे केवळ 49 चेंडूतच आले.या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाच्या पहिल्या चारही फलंदाजांनी अर्धशतक पूर्ण केले आणि अशी कामगिरी करणारा भारतीय संघ या स्पर्धेतला पहिला आणि एकमेव संघ ठरला आहे.या विक्रमात नंतर टेंव भर पडली जेंव्हा के एल राहुलनेही वाहत्या गंगेत हात धुवून घेत आपलेही अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर हो जोडी फेविकॉलच्या जोड सारखी चांगलीच जमली फक्त फरक एवढाच होता की ती टुकुटूक करत नव्हती,अतिशय आक्रमक अंदाजात नेदरलँडच्या गोलंदाजीवर तुटून पडले.

बघताबघता श्रेयसने आपले विश्वकप स्पर्धेत या आधी दोन वेळा हुकलेल्या शतकाला आज पूर्ण करत आपले पहिले शतक पूर्ण करुन संघ व्यवस्थापण त्याच्यावर का भरोसा दाखवत होते हे सिद्ध केले.त्याला साथ देता देता राहुलने पण टॉप गीयर टाकला आणि एक तुफानी खेळी करत केवळ 62 चेंडूत शतक पुर्ण करत वेगवान शतक मारले.या जोडीने 5 व्या गड्यासाठी 208 धावांची मोठी भागीदारी जोडत संघाला चारशे धावांचा मोठा टप्पाही पार करुन दिला. या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर भारतीय संघाने आपल्या निर्धारित 50 षटकात 4 गड्यांच्या बदल्यात 410 धावा पूर्ण करून नेदरलँड संघापुढे धावांचा मोठा डोंगर उभा केला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.