Cyclone Taukate Live Updates : कोल्हापूर जिल्ह्यात घरांची पडझड, मुंबईला अतिवृष्टीचा इशारा

एमपीसी न्यूज : दक्षिण पूर्व आणि लगतच्या मध्य अरबी समुद्रात कमी दबावाच्या क्षेत्रामुळे तौकते चक्रीवादळ तयार झाले. हे वादळ वेगाने पुढे सरकत असून रविवारी संध्याकाळी मुंबई किनारपट्टीजवळून गुजरातकडे सरकणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. चक्रीवादळामुळे प्रभावित भागांत वेगवान वाऱ्यांसह मूसळधार पाऊस सुरू आहे. किनारपट्टीला पावसाने अक्षरश: झोडपले आहे. 

सध्या अरबी समुद्रात घोंगावत असलेले चक्रीवादळ हळूहळू महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून हे वादळ पुढे गुजरातच्या दिशेने जाणार आहे. त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीतील यंत्रणांना सर्तक झाल्या आहेत. वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे वादळाची चाहूल लागली असून, कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस झाल्याने घरांसह शेतमालाचे नुकसान झाले आहे.

तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाऱ्याचा वेग वाढला आहे. रविवारी पहाटे 4 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रात दाखल होणारे हे वादळ दुपारी २ वाजता जिल्ह्याची सीमा ओलांडून पुढे जाणार आहे. त्यामुळे पहाटे 4 ते दुपारी 2 या कालावधीमध्ये नागरिकांनी अधिक दक्ष रहावे.” असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी देले आहे.

दरम्यान, दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेले चक्रीवादळ तौक्ते गुजरातच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. शनिवारी सायंकाळी ताशी 30 ते 40 किलोमीटरने वादळ पुढे सरकत होते. हवामाना विभागाच्या ताज्या माहितीप्रमाणे हे वादळ सध्या मुंबईच्या दक्षिणेला 490 किमी अंतरावर असून, 18 मे रोजी ते गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. हे चक्रीवादळ गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरून जाणार असल्याने राज्यात अनेक जिल्ह्याला तडाखा बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, प्रशासन सज्ज झाले आहे. मुंबईतील जम्बो कोविड सेंटरमधील 580 रुग्णांना रात्रीतूनच सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तर दुसरीकडे चक्रीवादळाच्या आगमनाआधीच राज्यातील काही जिल्ह्यात वाऱ्याच्या वेग वाढला आहे. तर काही ठिकाणी पावसालाही सुरूवात झाली आहे.

शनिवारी रात्री मुंबईत पाऊस झाला. तिकडे कोकण किनारपट्टीतील जिल्ह्यांना लागून असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वारे आणि पावसामुळे नुकसान झाले आहे. इचलकरंजीत शनिवारी रात्री पावसाला सुरूवात झाली. तर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागांमध्ये घरांची पडझड झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. वादळाच्या पार्श्वभूमीवर राजापूर, रत्नागिरी तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर गुहागर व दापोली तालुक्यातही संचारबंदी लागू केली जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास 104 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही वाऱ्याचा वेग वाढला आहे.

असा असेल चक्रीवादळाचा मार्ग

तौते चक्रीवादळ 16 मे रोजी अतितीव्र स्वरूप धारण करणार आहे. त्यामुळे समुद्रात वाऱ्यांचा वेग ताशी 124 ते 175 किलोमीटर असेल. 16 ते 18 मे या कालावधीत ते अतितीव्रच राहणार असून, याच काळात ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळून जाणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या संभाव्य मार्गानुसार चक्रीवादळ 18 मे रोजी दुपारी किंवा संध्याकाळी गुजरातच्या पोरबंदरजवळ धडकून पुढे जाईल. त्यानंतर त्याचा वेग आणि प्रभाव कमी होईल. मात्र, त्यामुळे गुजरातमध्ये त्याचा मोठा तडाखा बसण्याची शक्यता आहे.

मॉन्सूनवर काय होणार परिणाम

दरवर्षी 1 जून रोजी हजेरी लावणारा मान्सून यावर्षी एक दिवस आधीच केरळात दाखल होणार आहे. मान्सून यावर्षी सरासरी 103 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, स्कायमेटने देखील 30 मे रोजीच मान्सून केरळात दाखल होणार असल्याचं म्हटले आहे.. प्रतीवर्षी सरासरी प्रमाणे 1 जून रोजी मान्सून केरळात हजेरी लावत असतो. मात्र, यावर्षी एक दिवस आधीच तो दाखलहोण्याची शक्यता आहे. मात्र यंदा तोक्ते चक्रीवादळामुळे तो आधीच दाखल होण्यचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.