Bhosari: पदाधिकारी बदला; संघटना वाढीसाठी काम करणाऱ्यांना पदे द्या; निष्ठावान शिवसैनिकांची मागणी

एमपीसी न्यूज – माणसांपेक्षा संघटना महत्वाची आहे. संघटनेसाठी काम करत नसतील तर अशा लोकांकडे पदे ठेवू नयेत. भविष्यात संघटना मजबूत करायची असेल तर भोसरीतील पदाधिकारी बदलावेत. नवीन लोकांना पक्षात घेताना त्यांच्या मागे किती लोक आहेत. त्यांचे समाजकारणात किती योगदान आहे हे पाहिले पाहिजे. यापुढे संघटना वाढीसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना पदे देण्यात यावी, अशी मागणी निष्ठावान शिवसैनिकांनी केली. तसेच शहरप्रमुख केवळ पिंपरी आणि चिंचवडचे काम पाहतात. भोसरीचे काम का पाहत नाहीत? असा सवाल शिवसैनिकांनी उपस्थित केला.

संपर्कप्रमुख बाळा कदम यांच्या उपस्थितीत भोसरीतील आजी-माजी पदाधिकाऱ्यांची सोमवारी ( दि. 8) बैठक झाली. या बैठकीत निष्ठावान शिवसैनिकांनी पदाधिकारी बदलण्याची मागणी केली. गोविंद मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीला उपनेते अजय कदम, पिंपरी-चिंचवड महिला संघटिका वेदश्री काळे, मावळचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरसंघटिका उर्मिला काळभोर, शिरूरच्या संघटिका सुलभा उबाळे, उपजिल्हाप्रमुख नीलेश मुटके, भोसरी विधानसभा प्रमुख धनजंय अल्हाट, महापालिका गटनेते राहुल कलाटे, विभागप्रमुख विश्वनाथ टेमगिरे यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी, सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या पराभवाचे पडसाद बैठकीत उमटले. लोकसभा निवडणुकीत संघटनेत नव्या असल्यांकडे प्रचार यंत्रणा दिली. त्यांनी व्यवस्थित जबाबदारी पार पाडली नाही. मित्र पक्षाशी समन्वय साधला नाही. परिणामी, भोसरीतील मताधिक्य कायम राखू शकले नाही. भोसरीतील मताधिक्य कायम राहिले असते, तरी पक्षाचा उमेदवार निवडून आला असता. भविष्यात असे होऊ नये यासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना पदे देण्यात यावी. माणसांपेक्षा संघटना महत्वाची आहे. संघटनेसाठी काम करत नसतील तर अशा लोकांकडे पदे ठेवू नयेत, अशी मागणी निष्ठावान शिवसैनिकानी केली.

त्यावर बाळा कदम म्हणाले, “गटा-तटामुळे शिरूरची हक्काची जागा गेली आहे. महाराष्ट्रात सर्वात सेफ जागा शिरूरची होती. त्यामुळे गट-तट विसरून सर्वांनी काम करावे. वरिष्ठांनी मार्गदर्शन करावे. विरोधाला विरोध करू नका. आपापसात भांडणे करू नका, नवा-जुना वाद करू नका, सर्वांनी एकत्र बसून मतभेद संपवा. आजपासून एक कुटुंब म्हणून सर्वांनी काम करावे”

“आता पदाधिकारी बदल करून काय होणार आहे ? एक संधी देऊन बघू, बदल करण्याचा मला अधिकार नाही. शाखा प्रमुख देखील आम्ही ठोस कारण असल्याशिवाय बदलू शकत नाही. पण, पद कोणाकडे कायम राहत नसते. तो काही सातबारा नाही. फेरबदल कधी करायचा हे पक्ष ठरवेल” असेही कदम म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.