Akurdi : स्वातंत्र्य, समता, बंधुता म्हणजेच समरसता!” – रमेश पतंगे
दहावे विद्यार्थी समरसता साहित्य संमेलन संपन्न
एमपीसी न्यूज – “स्वातंत्र्य, समता, बंधुता यांचा व्यवहार म्हणजे समरसता होय!” असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक आणि पत्रकार रमेश पतंगे यांनी आकुर्डी येथे व्यक्त केले.
आकुर्डी येथील श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट सांस्कृतिक भवनात हे संमेलन पार पडले. समरसता साहित्य परिषद (पिंपरी-चिंचवड शाखा) आयोजित एक दिवसीय दहाव्या विद्यार्थी साहित्य संमेलनात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना रमेश पतंगे बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ.शरद कुंटे, आनंदवन भूजल-शाश्वत सहयोग प्रमुख भास्कर गोखले, प्रतिभा महाविद्यालयाचे विश्वस्त डॉ.राजेंद्र कांकरिया, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी संघचालक डॉ.गिरीश आफळे, समरसता साहित्य परिषद (पिंपरी-चिंचवड शाखा) अध्यक्षा शोभा जोशी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. संमेलनानिमित्त कार्यक्रमस्थळाचे संगीतकार सुधीर फडके प्रवेशद्वार, महाकवी गदिमा कलादालन, साहित्यिक पु.ल.देशपांडे व्यासपीठ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृह असे नामकरण करण्यात आले होते. समरसतेचे मानदंड असलेल्या महापुरुषांचे प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलन तसेच समरसता गीत सादर करून संमेलनाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटक डॉ.एन.एस.उमराणी म्हणाले की, “संस्कृती ही आपल्याला आनंद, श्रीमंती आणि उत्कृष्टता प्रदान करते. संस्कृतीमध्ये साहित्याचा अंतर्भाव असून आपल्या अवतीभवती असलेल्या प्रश्नांची उत्तरे संस्कृतीच्या अभ्यासातून मिळतात!” डॉ.शरद कुंटे यांनी, “समता साधण्याचे मूलभूत तत्त्व म्हणजे समरसता होय!” असे मत व्यक्त केले. भास्कर गोखले यांनी, “दिवसेंदिवस पाण्याची समस्या गंभीर होते आहे म्हणून आनंदवनाने भूजल हा प्रकल्प राबवला आहे!” अशी माहिती देत विद्यार्थ्यांना यात सहभागी होण्याचे आवाहन केले. डॉ.राजेंद्र कांकरिया यांनी, “भूत, चमत्कार ही अंधश्रद्धेची मानसिकता माणसाला मूर्ख बनवते!” असे सांगून प्रेमकविता सादर केली. समरसता साहित्य परिषद (पिंपरी-चिंचवड शाखा) कार्यवाह सुहास घुमरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून, “महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची भाषा ही भविष्यकालीन असल्याने त्यांचे विचार समजून घेण्यासाठी दहा वर्षांपासून समरसता साहित्य परिषद संमेलने आयोजित करत आहे!” अशी भूमिका मांडली. समरसता साहित्य परिषद (पिंपरी-चिंचवड शाखा) उपाध्यक्ष कैलास भैरट संपादित ‘दशकोत्तम‘ या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले; तसेच विद्यार्थी संमेलनाचे माजी अध्यक्ष अपर्णा मोहिले, डॉ.संजीवनी तोफखाने, विनिता ऐनापुरे, राज अहेरराव यांचा सन्मान करण्यात आला.
संमेलनाध्यक्ष रमेश पतंगे पुढे म्हणाले की, “संविधानाने सर्वाना स्वातंत्र्य दिलेले आहे; पण ते सर्वांना उपभोगता येते का, हा खरा प्रश्न आहे. समरसता म्हणजे दुर्बलांना सशक्त करणे आणि ज्ञानाने दुर्बल माणूस आत्मनिर्भर होतो. हेच कार्य क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी केले. सर्व समान आहेत असे घटना
सांगत असली तरी व्यवहारात वंचितांना, शोषितांना सन्मानाने मूलभूत गोष्टी मिळणे म्हणजेच समता असते. शब्दांचे अर्थ समजून घेत त्यांचा प्रत्यक्ष जगण्यात वापर करणे म्हणजे साहित्याची अनुभूती घेणे होय. त्या दृष्टीने वाल्मीकी, ज्ञानेश्वर, तुकाराम यांचे साहित्य चिरंजीवी आहे!”
पंजाबराव मोंढे यांनी उद्घाटन सत्राचे आभार मानले.
प्रथम सत्रात जन्मशताब्दीवर्षाचे औचित्य साधून मीना पोकरणा यांच्या प्रमुख उपस्थितीत संजीवनी तोफखाने (ग.दि.माडगूळकर), प्रदीप गांधलीकर (पु.ल.देशपांडे) आणि पद्माकर पाठकजी (सुधीर फडके) यांनी संगीत आणि साहित्य क्षेत्रातील या दिग्गजांचे व्यक्तिमत्त्व उलगडून सांगितले.
दुसऱ्या सत्रात राजेंद्र घावटे संचलित प्रश्नमंजुषा या साहित्य-संगीत क्षेत्रातील सामान्यज्ञानावर आधारित कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थी आणि श्रोते सहभागी झाले.
संमेलनाच्या समारोप सत्रात समरसता साहित्य परिषद महाराष्ट्र प्रांताध्यक्षा डॉ.श्यामा घोणसे यांनी, “मोबाईलच्या काळात हातातला पेन विसरू नका; कारण त्यातून निर्माण होणारे साहित्य हे ‘अक्षर‘ असते!” असे विचार व्यक्त केले. अंतिम सत्रातील प्रमुख अतिथी नॉव्हेल शैक्षणिक समूहाचे संस्थापक अमित गोरखे म्हणाले की, “व्यक्तिमत्त्व विकासाचे काम संमेलने करतात. विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य समरसता विद्यार्थी साहित्य संमेलनांनी सातत्याने केले आहे!”
संमेलनाच्या प्रत्येक सत्रात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर पथनाट्ये सादर केलीत; तसेच निबंधलेखन स्पर्धेतही सहभाग नोंदवला. त्याचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले. त्याचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे :-
पथनाट्य :
प्रथम क्रमांक – प्रा.रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी
(‘आता काय करायचं?’)
द्वितीय क्रमांक –
प्रतिभा महाविद्यालय, चिंचवड
(‘महिला सक्षमीकरण‘)
तृतीय क्रमांक –
मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालय, निगडी
(‘बदलते विद्यार्थीविश्व‘)
सर्वोत्कृष्ट लेखन :
प्रथम क्रमांक –
रेहमान पठाण
प्रा.रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी
द्वितीय क्रमांक –
जहीर पटेल
बा.रा.घोलप महाविद्यालय, सांगवी
तृतीय क्रमांक –
नवनाथ हजारे
महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी
सर्वोत्कृष्ट अभिनय :
प्रथम क्रमांक –
भाग्यश्री कोरी
बा.रा.घोलप महाविद्यालय, सांगवी
द्वितीय क्रमांक –
अक्षय बने
प्रा.रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी
तृतीय क्रमांक –
तन्वी वैद्य
प्रतिभा महाविद्यालय, चिंचवड
प्रश्नमंजुषा :
प्रथम क्रमांक –
महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी
द्वितीय क्रमांक –
क्रांतिवीर चापेकर उच्च माध्यमिक विद्यालय, चिंचवड
तृतीय क्रमांक –
मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालय, निगडी
निबंधलेखन :
प्रथम क्रमांक –
क्षितिजा कठाळे
क्रांतिवीर चापेकर उच्च माध्यमिक विद्यालय, चिंचवड
द्वितीय क्रमांक –
वरुण चव्हाण
लोकमान्य होमियोपॅथी महाविद्यालय, चिंचवड
तृतीय क्रमांक –
मोहिनी माळचिमणे
मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालय, निगडी
मंगला पाटसकर यांनी निबंधलेखनाचे तर किरण येवलेकर आणि राकेश शिर्के यांनी पथनाट्याचे परीक्षण केले.
या एक दिवसीय संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक गिरीश प्रभुणे, नगरसेवक सुरेश भोईर, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, पुरुषोत्तम सदाफुले, रविकांत कळंबकर, प्रा.तुकाराम पाटील, सुरेश कंक, आसाराम कसबे, राजन लाखे, मुरलीधर साठे, नंदकुमार मुरडे यांची मुख्य उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या संयोजनात पंजाबराव मोंढे, बाळासाहेब सुबंध, रामचंद्र मोरे, जगन्नाथ देविकर, सविता इंगळे, मुरलीधर दळवी, अंतरा देशपांडे, सुप्रिया लिमये, सुभाष चव्हाण, माधुरी विधाटे, बाबू डिसोजा, रामचंद्र आडकर, मृण्मयी नारद, शिल्पा कुलकर्णी, आरुषी दाते, सुरेश कंक यांनी सहकार्य केले.
अनुक्रमे मानसी चिटणीस, उज्ज्वला केळकर, समृद्धी सुर्वे यांनी सूत्रसंचालन केले.शोभा जोशी यांनी आभार मानले.