Loksabha election : मी भटकती आत्मा आहे, लोकांवरील दुःखाचा डोंगर पाहून अस्वस्थ होतो – शरद पवार
शरद पवार यांचा मोदींवर पलटवार
एमपीसी न्यूज : लोकांचे दुःख पाहून मी अस्वस्थ होतो, कोणतीही किंमत चुकवावी लागली तरी चालेन पण मी लाचार होणार नाही अशा शब्दात शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना आज (दि.30 एप्रिल) रोजी प्रत्युत्तर(Loksabha election) दिले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आज दि.(30 एप्रिल) रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार शिरूर येथे जनतेला संबोधित करताना म्हणाले की,पंतप्रधान मोदी यांचा माझ्यावर खूप राग आहे.एकेकाळी पंतप्रधान म्हणाले होते की, मी शरद पवार यांच्या बोटाला धरून राजकारणात आलो.मात्र आता ते म्हणत आहेत की, मी भटकती आत्मा असून मी गेल्या 45 वर्षांपासून राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. माझा आत्मा भटकत आहे हे खरे आहे पण तो लोकांच्या कल्याणासाठी,शेतकऱ्यांच्या दुःखाचा डोंगर दूर करण्यासाठी.सध्या भारतातील नागरिक महागाईने त्रस्त असून त्यांना प्रपंच करणे अवघड झाले आहे.त्यासाठी मी अस्वस्थ आहे, असे सांगत शरद पवार यांनी मोदींवर प्रहार केला.
पंतप्रधान मोदी यांनी काल (दि.29 एप्रिल) रोजी पुणे जिल्हयातील चार लोकसभा मतदारसंघात उभे असलेले महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार(बारामती), श्रीरंग बारणे(मावळ),शिवाजीराव आढळराव पाटील(शिरूर) आणि मुरलीधर मोहोळ(पुणे) यांच्या प्रचारार्थ रेस कोर्स मैदान, पुणे येथे सभा घेतली होती. तेव्हा ते म्हणाले होते की, गेल्या 45 वर्षांपासून महाराष्ट्रात एक भटकती आत्मा फिरत आहे आणि ती भटकती आत्मा राज्यातील आणि देशातील सरकार अस्थिर बनविण्याचा प्रयत्न गेल्या कित्येक वर्षांपासून करत आहे अशी टीका शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या(Loksabha election) केली होती.