Alandi : स्वास्थ्य, पर्यावरण, विज्ञान, संस्कृती व अध्यात्म यांची सांगड घालणाऱ्या जलदिंडीचे आळंदीमधून पंढरपूरकडे प्रस्थान

एमपीसी न्यूज : आळंदी येथून आळंदी (Alandi) ते पंढरपूर या जलदिंडीचे प्रस्थान सकाळी 10 वाजता पंढरपूरच्या दिशेने झाले. तत्पूर्वी जलदिंडीत नेण्यात येणाऱ्या श्रींच्या पादुकांचे पूजन शांतिब्रम्ह गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर, डॉ. विश्वास येवले यांच्या हस्ते माऊलींच्या समाधी पुढे करण्यात आले. त्यानंतर श्रींच्या पादुका पालखीत ठेवून हरिनामाच्या गजरात माऊली मंदिरातील प्रदिक्षणा पूर्ण करत इंद्रायणी नदी तीरी आणण्यात आल्या.

यावेळी शांतिब्रम्ह मारुती कुरेकर बाबांनी आपले मनोगत व्यक्त केले व जलदिंडी निर्विघ्नपणे पार पडो, असे आशीर्वादरुपी शुभेच्छा दिल्या. स्वास्थ्य, पर्यावरण, विज्ञान, संस्कृती व आधात्म यांची सांगड घालणारी ही जलदिंडी आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये ही जलदिंडी झाली नाही. या जलदिंडीचे हे 21 वे वर्ष आहे. असे डॉ. विश्वास येवले यांनी यावेळी सांगितले.

ही जलदिंडी दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात मार्गस्थ होते आणि याद्वारे नदी काठावरील जनतेशी संपर्क साधण्याचे एक प्रभावी माध्यम ती उपलब्ध करुन देते. दरवर्षी या दिंडीत सहभागी होणा-या लोकांची संख्या भरपूर वेगाने वाढत चालली आहे. शास्त्रज्ञ, विद्यार्थी, तंत्रज्ञ, डॉक्टर्स, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते इत्यादींच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. नदीकाठावरील जनतेत आरोग्य आणि सांस्कृतिक विकास या संदर्भात होत असलेले बदल (Alandi) लक्षात येण्यास सुरुवात झाली आहे.

समाजात शाश्वत विकास होण्याच्या दृष्टीकोनातून उचलले गेलेले हे एक महत्वाचे पाऊल समजावयास हवे. हा आळंदीपासून तर पंढरपूरपर्यंत 450 किलोमीटरचा प्रवास 6 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबरपर्यंत होणार आहे. दिंडी मार्गक्रमण करीत असतांना वाटेत जी गावे लागतात. त्या ठिकाणी पर्यावरण व जलसाक्षरतेसंदर्भात प्रबोधन केले जाते. यात प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांना केंद्रित केले जाते. यात भाग घेणा-यांना होड्या चालविण्याबद्दल प्रशिक्षणही दिले जाते. थोडक्यात सांगावयाचे झाल्यास हा पूर्ण कार्यक्रम धाडस व मौजमजा यांनी समृद्ध असतो. नदी व पर्यावरण यांचे माणसाशी घट्ट बंध निर्माण करण्याच्या दृष्टीने जलदिंडी फारच उपयुक्‍त ठरते. या दिंडीद्वारे नदीकाठचे पर्यावरण अभ्यासण्याची एक उत्कृष्ठ संधी सहभागी होणा-यांना मिळते. माणसाला ती निश्‍चितच विचार करावयास प्रवृत्त करते.

या जलदिंडीची बलस्थाने अशी आहेत. जवळपास 1000 किलोमीटरचा नदीतून प्रवास करावयाची संधी मिळते. पर्यावरण व आरोग्यविषयक तज्ञांचा सहवास मिळतो. माणसाला कार्यप्रवण करण्यासाठी प्रवृत्त करते. आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमात भाग घेण्याची संधी मिळते. या जलदिंडी सुरु करण्यापाठीमागे जी उद्दिष्ट्ये ठरविण्यात आली आहेत. ती प्रमुख्याने म्हणजे आपण सर्व एक आहोत, या भावनेला खतपाणी घालणे, यालाच आपण सोशल इजिनियरिंग असे नामाभिधान देतो.
पाण्याच्या गुणवत्तेचे महत्त्व जनमानसात बिंबवणे आणि तिचा मानवाच्या आरोग्यावर (Alandi) व पर्यावरणावर होणा-या परिणामांची जाणीव करुन देणे. नद्यांचे संरक्षण करण्याचे दृष्टीने जल सेवक आणि जल मित्रांची एक मजबूत फळी तयार करणे. तसेच जलसाठे वाढविण्याचे दृष्टीने, त्यांचे जतन करण्याचे दृष्टीने व त्याची गुणवत्ता टिकवून ठेवण्याचे दृष्टीने प्रोत्साहन देणे. जलदिंडीच्या माध्यमातून जलसाक्षरतेचा प्रचार व प्रसार करणे.
पर्यावरण रक्षणासाठी उपयुक्‍त असे अभ्यासक्रम तयार करुन ते राबविणे. जलदिंडी प्रकल्पांतर्गत समाविष्ट केल्या गेलेल्या विविध योजना आहेत. जलदिंडी हा शब्द जरी छोटा वाटत असला तरी या संकल्पनेची व्याप्ती बरीच मोठी आहे. यात विविध कार्यक्रम अंतर्भूत आहेत. ही जलदिंडी दरवर्षी आळंदीहून निघून पंढरपूरला विसर्जित होते. या दिंडीमध्ये भाग घेणाऱ्या सभासदांचा पर्यावरणाशी जवळून परिचय घडून येतो. या दिंडीमध्ये भाग घेणारे शारीरिक दृष्ट्या कणखर व मानसिक दृष्ट्या सामाजिक प्रश्‍नांशी परिचित होतात. या दिंडीत वृक्षारोपणाला प्रोत्साहन दिले जाते. दिंडीतील सभासद गावोगाव वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेतघेत मार्गक्रमण करतात. मार्गातआरोग्याला चालना देणारी शिबिरे घेतली जातात. तसेच गावक-यांना खेळाच्या सामानाचे वाटपही करण्यात येते.
विविध नद्यांच्या काठी जल मैत्री संमेलने आयोजित करण्यात येतात. आपल्या गावातून वाहणा-या नदीच्या काठावर दररोज आठवड्यातून एकदा नागरिकांच्या भेटी घडवून आणल्या जातात. याशिवाय गावातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे नदीकाठी मेळावे आयोजित करण्यात येतात. असे उपक्रम मुठा, इंद्रायणी, पवना, प्रवरा, गोदावरी, गिरणा नद्यांच्या तीरांवर घेण्यात येतात. या कार्यक्रमांतर्गत 7 ते 14 वर्ष वयातील मुलांची 15 दिवसांची शिबिरे आयोजित करण्यात येतात. या शिबीरात विज्ञान, पर्यावरण, आरोग्य, जलसाक्षरता या विषयातील तज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात येते. शिवाय या मुलांना खेळाचे साहित्यही वितरित करण्यात येते.
जलकुंभांद्वारे विविध जलसाठ्यातील पाण्याचे संकलन केले जाते. ज्यावेळी जलदिंडीला सुरुवात होते. त्यावेळी विविध खेड्यांतून, तलावांतून, नद्यांमधून, किल्ल्यांवरुन पाण्याचे कलश आणले जातात. भारतीय संस्कृती आजवर टिकून राहण्यात प्रवचने व कीर्तने याचा सहभाग फार महत्त्वाचा ठरला आहे. काही कीर्तनकारांनी जलसाक्षरतेत कार्य करण्याची तयारी दाखविली आहे. ते आपल्या रसाळ वाणीने जल साक्षरतेचा, पर्यावरणाचा व आरोग्याचा संदेश गावोगाव पोहोचविण्यास मदत करतात. या कार्यापासून प्रेरणा घेवून महाविद्यालयीन विद्यार्थी हा स्वास्थ्य संदेश वर्षभर वेगवेगळ्या खेडेगावात पोहोचविण्याचे कार्य करतात.
एखादी गोष्ट शब्दांद्वारे समजावून सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून जास्त परिणामकारक ठरते. त्यामुळे उत्साही माणसांच्या सहली वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन लोकांची निसर्गाशी जवळीक साधणे जास्त उपयुक्‍त ठरु शकते. त्यामुळे मानवाचे व निसर्गाचे बंध अधिक घट्ट विणले जातात. आज प्रत्यक्षात आयोजित असलेल्या जलदिंड्या
इंद्रायणी नदीवरील जलदिंडी, भीमा नदीवरील जलदिंडी, मुठा नदीवरील जलदिंडी, पवना नदीवरील जलदिंडी, घोडकुकडी नदीवरील जलदिंडी, गोदावरी नदीवरील जलदिंडी ह्या स्वरूपात आहेत.
लवकरच काही जलदिंड्या या चळवळीत तापी नदीवरील चांगदेव ते श्रीप्रकाशा ही जलदिंडी, गोदावरी नदीवरील प्रवरा ते पैठण ही जलदिंडी, कृष्णा नदीवरील महाबळेश्वर ते संगम माऊली ही जलदिंडी समाविष्ट होत आहेत. आपणा सर्वांना माहितच आहे, की डॉ. विश्वास येवले हे एक उत्कृष्ट असे स्त्रीरोग तज्ञ आहेत.
भारतीय संस्कृतीत स्त्रियांना मातृरुप देण्यात आले (Alandi) आहे. या मातृरुप स्त्रियांचे आरोग्य सध्या बिघडलेले आहे. त्यामुळे त्यांना स्वस्थ करण्यासाठी एका स्त्रीरोग तज्ञांची गरज जास्त आहे. आणि ती पूर्ण करण्यासाठी डॉ. येवले प्रयत्न करीत आहेत. हा निश्‍चितच योगायोग नव्हे. अशी माहिती अजित माळूंजकर यांनी दिली. यावेळी भवसार, सरनाईक, अजित निचीत, विकास महाराज गिरवलीकर व वारकरी संप्रदाय शिक्षण संस्थेतील विद्यार्थी व विविध मान्यवर उपस्थित होते.
https://www.youtube.com/watch?v=SVFN1Beytf4

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.