Alandi : स्वास्थ्य, पर्यावरण, विज्ञान, संस्कृती व अध्यात्म यांची सांगड घालणाऱ्या जलदिंडीचे आळंदीमधून पंढरपूरकडे प्रस्थान
एमपीसी न्यूज : आळंदी येथून आळंदी (Alandi) ते पंढरपूर या जलदिंडीचे प्रस्थान सकाळी 10 वाजता पंढरपूरच्या दिशेने झाले. तत्पूर्वी जलदिंडीत नेण्यात येणाऱ्या श्रींच्या पादुकांचे पूजन शांतिब्रम्ह गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर, डॉ. विश्वास येवले यांच्या हस्ते माऊलींच्या समाधी पुढे करण्यात आले. त्यानंतर श्रींच्या पादुका पालखीत ठेवून हरिनामाच्या गजरात माऊली मंदिरातील प्रदिक्षणा पूर्ण करत इंद्रायणी नदी तीरी आणण्यात आल्या.
यावेळी शांतिब्रम्ह मारुती कुरेकर बाबांनी आपले मनोगत व्यक्त केले व जलदिंडी निर्विघ्नपणे पार पडो, असे आशीर्वादरुपी शुभेच्छा दिल्या. स्वास्थ्य, पर्यावरण, विज्ञान, संस्कृती व आधात्म यांची सांगड घालणारी ही जलदिंडी आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये ही जलदिंडी झाली नाही. या जलदिंडीचे हे 21 वे वर्ष आहे. असे डॉ. विश्वास येवले यांनी यावेळी सांगितले.
ही जलदिंडी दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात मार्गस्थ होते आणि याद्वारे नदी काठावरील जनतेशी संपर्क साधण्याचे एक प्रभावी माध्यम ती उपलब्ध करुन देते. दरवर्षी या दिंडीत सहभागी होणा-या लोकांची संख्या भरपूर वेगाने वाढत चालली आहे. शास्त्रज्ञ, विद्यार्थी, तंत्रज्ञ, डॉक्टर्स, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते इत्यादींच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. नदीकाठावरील जनतेत आरोग्य आणि सांस्कृतिक विकास या संदर्भात होत असलेले बदल (Alandi) लक्षात येण्यास सुरुवात झाली आहे.
समाजात शाश्वत विकास होण्याच्या दृष्टीकोनातून उचलले गेलेले हे एक महत्वाचे पाऊल समजावयास हवे. हा आळंदीपासून तर पंढरपूरपर्यंत 450 किलोमीटरचा प्रवास 6 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबरपर्यंत होणार आहे. दिंडी मार्गक्रमण करीत असतांना वाटेत जी गावे लागतात. त्या ठिकाणी पर्यावरण व जलसाक्षरतेसंदर्भात प्रबोधन केले जाते. यात प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांना केंद्रित केले जाते. यात भाग घेणा-यांना होड्या चालविण्याबद्दल प्रशिक्षणही दिले जाते. थोडक्यात सांगावयाचे झाल्यास हा पूर्ण कार्यक्रम धाडस व मौजमजा यांनी समृद्ध असतो. नदी व पर्यावरण यांचे माणसाशी घट्ट बंध निर्माण करण्याच्या दृष्टीने जलदिंडी फारच उपयुक्त ठरते. या दिंडीद्वारे नदीकाठचे पर्यावरण अभ्यासण्याची एक उत्कृष्ठ संधी सहभागी होणा-यांना मिळते. माणसाला ती निश्चितच विचार करावयास प्रवृत्त करते.