Blog : ‘मोरे अंग ना लग जा बालमा’!
Blog by Devdatta Kashalikar: 'Moray Ang na lag ja Balma'
एमपीसी न्यूज – शरीराचा शरीराशी जिथे थेट संबंध येतो, तोही किमान अर्धा तास, अशा सहा बाय चारच्या खोलीत, कसलं सोशल डिस्टन्सिंग आणि कसलं काय?… कुठल्याही स्थितीत यावर मार्ग काय, हे समजत नव्हतं. दोन हजारच्या आसपास महिला आणि अडीचशेच्या आसपास लहान मुलं… यांना आता या समस्येतून प्रत्यक्ष ब्रह्मदेव तरी सोडवू शकेल का, असा विचार मनात येऊन गेला. कारण शरीर संबंध हाच व्यवसाय, तेच उदरनिर्वाहाचे साधन… त्यामुळे यावर ही माणसं आता काय करतील, हे एक न सुटलेलं कोडंच होतं… वाचा ‘रेड लाईट एरिया’तील ‘कोरोना इफेक्ट’चा ग्राऊंड रिपोर्ट! मुक्त वृत्त छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांचा मन सुन्न करणारा ब्लॉग!
‘मोरे अंग ना लग जा बालमा’!
पत्रे लावून एरिया सील होताना पहिला होता मी, इकडे लागण झाल्याची बातमी मी तरी ऐकली नव्हती, मग हे काय असावं, असा विचार नुसता मनात आला आणि विरून गेला, आणि लक्षात आलं की, शरीराचा शरीराशी थेट थेट संबंध असतो इथं… कसला सॅनिटायझर आणि कसला मास्क?.. झर्रकन सर्व चित्र डोळ्यासमोर येऊन गेलं…
काका हलवाईजवळ काहीसं रस्त्याचं काम चालू होतं, वळसा घालून जाताना मी हे सर्व पाहिलं होतं. सव्वा दोन महिने झाले तरी पण पत्रे घालताना पलीकडे उभ्या असलेल्या ‘त्या’ बायका, लहान पोरं आणि… आणि त्यांचे चेहरे डोळ्यासमोरून जातच नव्हते. पण प्रत्यक्ष बोलायला व विषय समजावून घ्यायला त्या ठिकाणी, म्हणजेच पुण्याच्या रेड लाईट एरिया अर्थात बुधवार पेठेत जायची हिम्मत होत नव्हती.
बरं तिथे जावे तर कुणाच्या तरी कडून काही माहिती मिळेल, अशा आशेत मी होतो. पण तिथं गेल्यावर कुणी बोलेल का आपल्याशी व स्टोरी पुरते फोटो काढू देतील का त्या बायका, हा यक्षप्रश्न होता.
मित्राच्या मुलासोबत बोललो. त्याने तिकडच्या एका सोशल वर्करची गाठ घालून दिली, मग ठरलं आणि पोहोचलो… देवदासी महिला व वस्तीतील वेश्यांसाठी खूप तळमळीने अनेक वर्षे काम करणाऱ्या प्रकाश यादव यांना भेटलो. त्यांनी मला या ठिकाणची अख्खी ‘सिस्टीम’ समजावून सांगितली.
एकवेळ घरातलेही काळजी घेणार नाहीत, एवढी काळजी हा माणूस गेली कैक वर्षे इथल्या महिलांची, त्यांच्या लहानग्यांची काळजी घेतोय. हमीदभाई म्हणजेच हमीद सलमानी नावाचं एक भन्नाट व्यक्तिमत्व मला इथंच भेटलं. रेड लाईट एरियामधील HIV बाधित महिलांसाठी व TB ची लक्षणे असणाऱ्या सर्व महिलांसाठी सर्वस्व पणाला लावून काम करणारा हा देव माणूस व प्रिया नावाची सोशल वर्कर यांनी मला वस्तीमधील काही घरं दाखवली.
पुन्हा तिसऱ्या दिवशी सकाळीच मी रेड लाईट एरियामध्ये पोहोचलो. मुख्य रस्त्यावरच दोन बायका एकमेकींच्या झिंज्या उपटत होत्या. त्यांचा अविर्भाव पाहून पुन्हा विचार आला, आता जाऊ की नको? …पण मित्राचा मुलगा तेवढ्यात आला व आम्ही आता गेलो.
माणूस चालला तरी दोन्ही खांदे भिंतीला घासतील असं बोळ… त्यात असंख्य पाकिटं… सिगारेटची थोटकं… मधे-मधे उंदीर आणि त्यातून जाणाऱ्या पाईप लाईन… मधेच गडद अंधार… मधे-मधे आरशाचे व्यवस्थित उंचीवर असलेले तुकडे… अशा स्थितीत आतील घरे कशी असतील, या कल्पनेने हादरलो होतो मी! माणूस ‘सुख’ घेण्यासाठी इथवर येतो, हे कल्पनेच्या बाहेर होत चाललं होतं माझ्या!
पाच- सहा बायका असलेल्या एका घरात गेलो तर तिथली मालकीण पडद्याचा आतून माझ्याशी बोलत होती तिचे फक्त सॅंडल दिसत होते व हाताची बोटं. तिला विचारलं, ‘आता पुढं कसं पाहताय या सर्व परिस्थितीकडे?’ ती म्हणाली, ‘मर्द भूखे नाही रहेंगे, जिनको आना है यहाँ, वो जरूर आयेंगे… पर कोरोना की वजह हमने दो महिने से वक्त हुवा एक भी ग्राहक नाही किया, सबने मिलके तैय किया के गिर्हाईक नही करेंगे!’
मी विचारलं, ‘और कितने दिन घर चलाओगे ऐसेही?’ ती म्हणाली, ‘शरीर बेचते है, पर जान भी तो प्यारी है! जिस दिन ये चालू होगा, कस्टमर को नेहलाके, साफ सुथरा करके अंदर लेंगे. और हम भी हर बार साबुन के पानी से साफ करेंगे खुदको’
विचार केला तर तिचं बरोबर होतं, पण येणारी माणसं त्यावेळी बहुतांशी माणसं राहिलेली नसतात… जनावरं झालेली असतात… त्यांना कुणी डोक्यावरून अंघोळ कर म्हणालं तर ऐकतील का? एवढी सोय प्रत्येकीकडे आहे का? इथे राहायची मारामार, मग कसली अंघोळ अन काय? … यासाठी लागणारा संयम…. लागणाऱ्या जास्तीच्या वेळेचा पैसा तो पुरुष खर्च करेल का?… अपेक्षेप्रमाणे याची उत्तरं कुणाकडंच नव्हती.
हमीदभाई व प्रियासारख्या माणसांनी इथे पहारा देऊनही शेकडो घरात कोण काय पाळतंय, हे समजणं शक्य नव्हतं.
हळू हळू त्यांचा माझ्यावर विश्वास बसू लागला व त्यांनी फोटो घेऊ दिले, कुठेही त्यांची आयडेंटीटी एक्सपोज होणार नाही अशा पद्धतीने मी मास्क असताना काही फोटो घेतले.
सुगंधा म्हणाली [नाव बदललं आहे] माझं बाळ आता चार महिन्याचं झालंय अशा अवस्थेत मला खायला तेव्हाच मिळेल व चार पैसे गाठीला असतील जेव्हा माणसं यायला लागतील, त्या खोलीत व्हेंटिलेशनचा कुठेही पत्ता नव्हता, हवा यायला एक इंच पण जागा नव्हती, सहा बाय चारच्या त्या खोलीत ‘बिछाना’ हेच जग आणि ‘बिछाना’ हेच सर्वस्व मानणारी ‘ती’ बोलताना अगतिक वाटत होती.
श्वास आणि उच्छवास यांच्या अपरिहार्यतेमध्ये जवळिकेत अनिच्छेनेही सुखाचे क्षण देऊन पोटाची खळगी भरणाऱ्या या सोशिक जीवांचं जगणं आता करोनामुळे घुसमटू लागलंय. करोनामुळे निर्माण झालेली समस्या मोठी आणि विचित्र आहे, सामाजिक संस्थांकडून मिळणाऱ्या मदतीवर आयुष्याची नाव आजवर तरलीय, पण उद्या?…. मिळेल का किनारा या नावेला कधी सुखाचा? कारण किनाऱ्यानेही आजकाल पत्ता बदललाय…