Diwali Special : आनंदाची अन जाणिवेची दिवाळी!

एमपीसी न्यूज (श्रीकांत चौगुले) – रोजच्या जगण्यातले साचलेपण आणि तोचतोचपणा दूर करून, आपल्या जीवनात नवचैतन्य (Diwali) निर्माण करण्याचे काम सण समारंभ करतात, म्हणूनच आपण प्रत्येक सण मोठ्या आनंदाने साजरा करत असतो. सणांमध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेले रीतीरिवाज पाळत असतानाच, काळानुसार झालेले बदलही आपण स्वीकारत असतो. अशा सणांपैकी दिवाळी सण मोठ्या आनंदाचा ठेवा ठरतो. संपूर्ण भारतभर दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीला दीपावली असेही म्हणतात. दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. दिवाळी म्हणजे आनंदोत्सव. लहानथोर सर्वांना आनंद देणारा दिवाळी सण आहे.

 दिवाळी सण साधारण पाच दिवसांचा असतो. त्याची सुरुवात अश्विन वद्य त्रयोदशीपासून (Diwali) होते. त्याला आपण धनत्रयोदशी म्हणतो. या दिवशी धनाची म्हणजेच कुबेराची पूजा करतात. त्यानंतरचा दिवस चतुर्दशीचा. या दिवशी नरक चतुर्दशी साजरी करतात. अमावस्येला लक्ष्मीपूजन असते. त्यानंतरची तिथी प्रतिपदा. ती बलिप्रतिपदा असते तर पुढचा दिवस भाऊबिजेचा. अशाप्रकारे दिवाळीचे चार-पाच दिवस आनंदाचे मजेचे असतात. या दिवसांचे महत्त्व सांगणाऱ्या अनेक पुराण कथा आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे दीपावली म्हणजे दीपोत्सव.. आनंदोत्सव.

दीपोत्सवाची परंपरा मात्र प्राचीन आहे, हे मात्र नक्कीच. भारतीय संस्कृतीत दीप हे मांगल्याचे प्रतीक आहे. दिव्यांमुळे अंधकाराचा नाश होतो. परिसर प्रकाशमान होतो. दिव्यांमुळे मनाची प्रसन्नता वाढते. उजेडाच्या सोबतीने मनातले नैराश्य दूर होते. मनातली भीती दूर होते. पूर्वीच्या काळी तेलवातीचे दिवे दारात, तुळशी वृंदावनात लावत. या दिव्यामुळे सात्विक प्रसन्नता मिळते. अलिकडे तेलाच्या दिव्यांबरोबर मेनाचे दिवे, विजेवरचे दिवे लावले जातात. घराघरावर रोषणाई केली जाते. रंगीबेरंगी दिव्यांमुळे मन आनंदित आणि प्रसन्न होते. काही ठिकाणी याचा अतिरेक केला जातो.

अनाठाही विजेचा वापर केला जातो. याबाबत अंतर्मुख करणारा एक प्रसंग मी काही वर्षांपूर्वी अनुभवला. ऐन दिवाळीत एका विचारवंतांच्या घरी जाणे झाले. चांगल्या वस्तीतील, त्यांच्या घराच्या आजूबाजूला घरांवर विजेच्या माळा ,आकर्षक दिवे यांचा झगमगाटात दिसत होता. त्यांच्या दारात मात्र एक मंद दिवा तेवत होता. बाकी कसलाही लखलखाठ नव्हता. मी थोडं दबकतच त्यांना विचारले. त्यावर ते म्हणाले,,” आपण इकडे शहरात झगमगाटात दिवाळी साजरी करायची आणि ग्रामीण भागातल्या लोकांनी लोड शेडिंग अनुभवायचे. हा विजेचा अपव्यय योग्य नाही. म्हणून आपण मर्यादित विजेचा वापर केला पाहिजे.” हे त्यांचे म्हणणे नक्कीच योग्य होते. आपण आपला आनंद व्यक्त करावा पण दुसऱ्याचा हक्क हिरावून घेऊन तो व्यक्त केला जाऊ नये .हे खरोखरच योग्य आहे.

यासोबत दिवाळीत आनंदासाठी फटाके वाजवले जातात. फटाक्यांचे आकर्षण लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना असते. फटाके वाजवतानाही अतिआवाजाचे, कानठळ्या बसवणारे फटाके वाजवू नयेत. याचेही भान ठेवायला हवे. दिवाळीच्या दिवसात रस्त्यात पडणारा, फटाक्यांमुळे होणारा कचरा आणि ध्वनी प्रदूषण हानिकारक असते. आपला मोठेपणा दाखवण्यासाठी, अधिक किमतीचे, अधिक मोठ्या आवाजाचे, भरपूर फटाके वाजवणे. योग्य नाही. दुसरे एक आपण ज्या श्रद्धा मानतो. त्या जपल्या गेल्या पाहिजेत. नाहीतर आतमध्ये लक्ष्मीपूजन आणि बाहेर लक्ष्मी फटाक्यांच्या नावाखाली लक्ष्मीचे चित्र असणारे फटाके वाजवून, लक्ष्मीच्या चित्राची चिरफाड करायची. हे योग्य नाही.

 दिवाळी सणात गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. पूर्वी घरोघरी पदार्थ तयार केले जात. दिवाळी सणाच्या आधी चार-आठ दिवस सगळीकडे धामधूम असे. करंज्या तयार करणे, हा तर एक सामुदायिक निर्मितीचा प्रकार असे. आता त्यामध्ये बदल होतो आहे. शहरात तर चौकाचौकात मिठाईची दुकाने झाली आहेत. अगदी दररोज म्हटलं तरी मिठाई किंवा खाऊ घरी येऊ लागला आहे. पूर्वी अशा सुविधा नव्हत्या.आर्थिक स्थितीही नव्हती. त्यामुळे दिवाळीच्या दिवसातील फराळाचे फार मोठे अप्रूप असायचे. लाडू चकली म्हणजे आनंदाची पर्वणी असायची. घरातल्या स्त्रिया रात्र रात्र जागून स्वतः फराळ तयार करायच्या. त्यासाठी घरातल्या, शेजारच्या माणसांची मदत होत असे. आवडीने केलेले पदार्थ इतरांना शेजारी पाजारी दिले जात.

आता यामध्ये बदल होताना दिसतो. बहुतेक जण तयार पदार्थांवरच दिवाळी साजरी करताना दिसतात. अलीकडे खेडेगावातही फराळाचे पदार्थ विकत घेतले जातात. त्याचा पुरवठा करणारी मंडळी तयार झाली आहेत. ती घरोघरी आवश्यकतेप्रमाणे पदार्थ आणून देतात. आपल्या घरात आनंदाची दिवाळी साजरी होत असताना ज्यांना घरच नाही. अशांची दिवाळी कशी असेल, याचाही विचार करणारी काही मंडळी आहेत. दिवाळीच्या दिवसात अशा अनाथ, आश्रित, भिकारी व गरजूंना मिठाई देऊन त्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंदात आपला आनंद पाहणारी काही मंडळी आणि संस्था आहेत.
लक्ष्मी म्हणजे धनाची देवता. आपल्याजवळ आहे ते धन वृद्धिंगत व्हावे. आपल्या सुखासाठी अधिकाधिक धन प्राप्त व्हावे. अशी कामना केली जाते. पूर्वीच्या काळी लोकांकडे धन कमी होते पण मन निर्मळ होते. प्राप्त परिस्थितीत आनंदात राहत होते. धनसंपत्तीसाठी वाटेल ते अशी स्थिती तेव्हा नव्हती. आता पैशासाठी कोणत्याही थराला जाऊन, नको ते करण्याची तयारी काहीजण करतात. त्यामुळे वाममार्गाने धनसंचय वाढत आहे .अशा धनाची वृद्धी म्हणजे अधिक भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यासारखे आहे. तेव्हा धनसंपत्तीपेक्षा सुखसमृद्धी लाभावी. जगणे आनंदात जावे. अशी प्रार्थना लक्ष्मीजवळ करणे गरजेचे वाटते.
 दिवाळीच्या दिवसात बाजारपेठ गर्दीने फुलून जाते. सोन्या-चांदीच्या मौल्यवान खरेदीबरोबरच इतर वस्तू खरेदी केल्या जातात. कपड्याच्या दुकानात तर खूपच गर्दी असते. विविध फॅशनचे कपडे बघूनच खरेदीचा मोह आवरत नाही. पूर्वी आजच्या इतकी चैन नव्हती. एक तर शाळेच्या सुरुवातीला किंवा दिवाळीत कपडे मिळायचे. तेही आई-वडिलांच्या पसंतीचे. एखाद्या घरात मुलांची संख्या जास्त असेल तर त्यांना एकाच ताग्यातील कापडावर समाधान मानावे लागे. त्यात टेलरही स्वतःच्या व्यवसायाचा विचार न करता वाढत्या अंगाचे कपडे शिवायचा. सगळं वातावरणच कसं मोकळं मोकळं होतं.
आता रेडीमेडच्या दुनियेत तंतोतंत मापातले कपडे असतात. थोड्याच दिवसात ते बसत नाहीत, मग ते बाजूला पडतात. अशा बाजूला पडलेल्या कपड्यांचाही सामाजिक जाणवेतून विचार केल्यास त्यातूनही आपण समाजसेवा करू शकतो. काही संस्था त्यासाठी काम करत आहेत . सणाच्या काळात जुने कपडे जमा करणे आणि ज्यांना खरोखरच कपड्यांची गरज आहे. त्यांना ते कपडे संस्था पुरवते. ज्यांना खरोखरच कपड्यांची गरज आहे अशा व्यक्तींना कपडे मिळणे म्हणजे त्यांचा आनंद नव्या कपड्यांपेक्षा अधिक असतो.

 दिवाळीत सगळीकडे आनंदी आनंद असतो. बाजारपेठा गर्दीने फुलून जातात. उत्तम व्यापारामुळे व्यापारी वर्ग खुशीत असतो. बोनस मिळाल्यामुळे नोकरवर्ग खुशीत असतो. सरकारी अधिकाऱ्यांना दिवाळीच्या दिवसात विशेष भेटी मिळतात. सगळ्यांना धनलाभ झालेला असतो. सगळेजण आनंदात असतात पण तळातल्या माणसाचे काय… तोही आपल्या परीने दिवाळी साजरी करत असतो. त्याला शक्य नसले तरी तो पैसे जमा करून सण साजरा करतो. संपूर्ण देशात दिवाळी सण साजरा होतो पण महाराष्ट्रात ,मराठी माणसात त्याचे वेगळेपण आहे. इथे दिवाळीच्या आनंदात साहित्य फराळाचीही मेजवानी असते. सुमारे 800 दिवाळी अंक प्रकाशित होतात. या काळात दिवाळी अंकांना मागणी असते. ते दिवाळीची लज्जत वाढवतात.
गेल्या काही वर्षात दिवाळीत साजरे होणारे सांस्कृतिक कार्यक्रम हे दिवाळीचे वैशिष्ट्य ठरत आहे. अनेक गाण्यांच्या कार्यक्रमाबरोबरच शास्त्रीय संगीताच्या मैफिली. या काळात होतात. दिवाळी पहाट, दिवाळी संध्या. या नावाने दिवळीतील दिवस सांस्कृतिक बनून जातात. यामध्ये अनेक कलाकारांना संधी मिळते. रसिकांना आनंदाची पर्वणी मिळते.
दिवाळीत सगळीकडे आकाश कंदीलाचा झगमगाट पाहायला मिळतो. रंगीबेरंगी ,विविध आकारातील आकाश कंदील मनाला आकर्षित करतात. पूर्वीच्या काळी आकाश कंदील लोक स्वतः बनवत. बांबूच्या काड्यांनी चांदणीचा आकार बनवत. त्यावर पारदर्शक रंगीत कागद लावत. मधल्या पोकळी तेलाचा दिवा ठेवत. जोपर्यंत दिव्यात तेल आहे, तोपर्यंत आकाश कंदीलातील प्रकाश चमकत राहत असे. अलीकडे यामध्ये बराच बदल झाला. संपूर्ण जीवनच धावपळीचे आणि धकाधकीचे बनले. वेळ मिळेना असा झाला. तेव्हा तयार मालावर अधिक भर दिला जाऊ लागला. त्यातच आकर्षकता, विविधता, रंगसंगती यामुळे तयार आकाश कंदीलच अधिक उपयुक्त ठरू लागले .घरोघरी वीज आली. त्यामुळे तेलाच्या दिव्यांची जागा विद्युत दिव्यांनी घेतली अन् दिवाळी अधिक प्रकाशमान झाली.
अलिकडे दिवाळीच्या दिवसात एक नवीन ट्रेंड आला आहे. कुटुंबातले अनेकजण नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी असतात .दिवाळीच्या दिवसातच अशांना वेळ मिळतो. ते एकत्र येतात. एकंदर कौटुंबिक आनंद साजरा करतात. काहीजण यातूनच कौटुंबिक सहली काढतात.त्यामुळे दिवाळीच्या काळात पर्यटन खूप वाढले आहे. लोक या काळात बाहेरगावी पर्यटनाला जातात. या काळात सगळीकडे गर्दी असते.
दिवाळीत लहान मुले किल्ले बनवतात. एक उपक्रम म्हणून सुरू झालेला हा प्रकार सार्वत्रिक झाला आणि लोकप्रिय ठरला. किल्ले निर्मितीत मुलांना आनंद मिळतो. मुलांकडून नवनिर्मिती घडते. त्यांच्या कल्पकतेला वाव मिळतो. त्यामुळे किल्ले बनविणे हा प्रकार उपयुक्तच आहे. पूर्वी फक्त शहरांपुरता मर्यादित असणारा हा प्रकार खेडोपाडी पोहोचला आहे. ग्रामीण भागातही दिवाळीच्या काळात मुले किल्ले बनवितात.
 एकंदरीत दिवाळी हा सण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आनंदाचा, सर्वांच्या सहभागाचा आहे. तो सार्वत्रिक आहे. भारतात बहुतेक ठिकाणी दिवाळी सण साजरा केला जातो. आपला आनंद आपण व्यक्त करताना सामाजिक जाण आणि भान ठेवणे हेही गरजेचे आहे‌. सणाच्या अति उत्साहात सामाजिक आणि पर्यावरणीय हानी होणार नाही‌.याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या मर्यादेत राहून आपण आपला आनंद अधिक उत्तमरीत्या व्यक्त करू शकतो. याचाच अधिक विचार होणे गरजेचे आहे. असे वाटते.
– श्रीकांत चौगुले
श्रीकृपा, काटेपुरम चौक. पिंपळे गुरव, पुणे 61
मो.7507779393

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.