Chinchwad Bye Election : चिंचवडमध्ये कांटे की नव्हे, ‘काटे से टक्कर’ – आदित्य ठाकरे

एमपीसी न्यूज – गद्दारांना हाताशी धरून भाजपने राज्यात घटनाबाह्य सरकार आणले आहे. या सरकारच्या विरोधात जनतेमध्ये मोठा आक्रोश असून नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेमध्ये शिक्षक आणि पदवीधरांनी महाविकास आघाडीला कौल दिला आहे. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही बदलाचे वारे वाहत असून या ठिकाणी ’कांटे की टक्कर नसून काटे से टक्कर है’, त्यामुळे चिंचवडमध्येही (Chinchwad Bye Election) जनताच परिवर्तन घडवून आणेल आणि नाना काटे यांना विजयी करेल, असा ठाम विश्वास युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचा सोमवारी (दि. 13) वाल्हेकरवाडीत संयुक्त मेळावा पार पडला. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ठाकरे बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सचिन अहिर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (गवई गट) डॉ. राजेंद्र गवई, आमदार सुनील शेळके, अण्णा बनसोडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन भोसले, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, माजी आमदार विलास लांडे, प्रचारप्रमुख भाऊसाहेब भोईर, माजी महापौर संजोग वाघेरे, योगेश बहल यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, पाठीत चाळीस वार करून सध्या राज्यात गद्दारांचे खोके सरकार अस्तित्त्वात आले आहे. हे सरकार घटनाबाह्य आणि अल्पआयु ठरणार आहे. येत्या काही दिवसांत हे सरकार निश्चितच कोसळेल याचा मला ठाम विश्वास आहे. या सरकारबद्दल राज्यातील जनतेत प्रचंड रोष, चिड आणि आक्रोश आहे. आम्ही सत्तेत असताना करोना काळात देखील शेतकऱ्यांना 14 हजार कोटींची मदत केली होती. मात्र या सरकारच्या काळात राज्याची प्रगती थांबली असून शेतकरी आत्महत्या करत आहे.

Pune News : पुणे विद्यापीठातील एक हजार विद्यार्थ्यांचा रिसर्च अँड पब्लिकेशनचा अभ्यासक्रम पूर्ण

सध्याच्या राजकारण अत्यंत घाणेरडे झाले असून त्यात बदल करावा (Chinchwad Bye Election) लागणार आहे. त्यासाठी आपण महाविकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे रहा, असे आवाहनही ठाकरे यांनी यावेळी केले. यावेळी उपस्थितांनी ‘पन्नास खोके, एकदम ओके’च्या घोषणाबाजी केल्याने सभास्थळ दणाणून गेले होते.

राज्यात एकही नविन उद्योग नाही

महाविकास आघाडी सरकारने आपल्या कार्यकाळात साडे सहा हजार कोटींचे नविन उद्योग आणल्याने तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून दिला होता. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली खोके सरकारने गेल्या आठ महिन्यांत एकही उद्योग आणला नाही. जे उद्योग राज्यात येणार होते, ते गुजरातला पाठविल्याने या ठिकाणच्या लाखो तरुणांना रोजगाराला मुकावे लागले आहे. फॉक्सकॉन प्रकल्प गेल्यामुळे पुणे जिल्ह्यासह पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळच्या तरुणांवर अन्याय झाला आहे. बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला असून हा प्रश्न सोडवायचा असेल तर आपणाला महाविकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे लागेल, असेही ठाकरे म्हणाले.

राज्याच्या विकासासाठी महाविकास आघाडी

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची विचारधारा वेगळी असली तरी महाराष्ट्राचे हित डोळ्यासमोर ठेऊन महाविकास आघाडीची निर्मिती करण्यात आली आहे. संविधानाचा खून करणारे सरकारमध्ये बसले आहेत. सध्याची लढाई ही महाशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी सुरू आहे. सरकारमध्ये बसलेल्यांची निवडणुकांना सामोरे जाण्याची हिंम्मत नाही. ते पाठीत खंजीर खूपसून सत्तेत बसले आहेत. आपला लढा मोठा आहे. गद्दार आणि त्यांना पाठींबा देणारे भाजप या दोघांना धडा शिकविण्याची हीच योग्य वेळ असून चिंचवड पोटनिवडणुकीत नाना काटे (Chinchwad Bye Election) यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करा, असे आवाहनही ठाकरे यांनी यावेळी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.