Dighi Crime News : महिलेचे अपहरण करून जबरदस्तीने विवाह केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – महिलेचे अपहरण करून तिला नरसोबाची वाडी, सांगली येथे नेले. तिथे तिच्या वडिलांना मारून टाकण्याची धमकी देत महिलेसोबत विवाह केला. याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 17 जुलै सकाळी अकरा ते 18 जुलै रात्री आठ वाजताच्या कालावधीत घडली.

याप्रकरणी शिवाजी जाधवर, महिला आरोपी आणि एका अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित महिलेने 18 ऑगस्ट रोजी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने फिर्यादी यांना फोन करून फिरायला जायचे असल्याचे सांगितले. 17 जुलै रोजी सकाळी अकरा वाजता आरोपी महिलेने एका अनोळखी मुलाला फिर्यादी यांच्या घरी पाठवले. अनोळखी मुलासोबत फिर्यादी दुचाकीवरून दिघी येथून भोसरी येथे गेल्या.

त्यानंतर भोसरी येथून इंदापूर पर्यंत कारमधून गेल्या. इंदापूर मधून पुढे नरसोबाची वाडीपर्यंत आरोपी शिवाजी आणि त्याचे मित्र कारमध्ये बसले. नरसोबाची वाडी येथील एका मंगल कार्यालयात नेऊन 18 जुलै रोजी फिर्यादी यांच्यासोबत आरोपी शिवाजी याने जबरदस्तीने विवाह केला. फिर्यादी यांच्या वडिलांना मारून टाकण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी यांचे दोन ग्रॅम सोन्याच्या रिंगा आरोपींनी परत दिल्या नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.