Pimpri News : शहरवासीयांवर लादलेले दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या धोरण तात्काळ हटवा; मनसेची मागणी

एमपीसी न्यूज – मागील दोन वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरवासीयांवर लादलेले दिवसाआड पाणीपुरवठ्याचे धोरण हटविण्यात यावे. शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा करावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिका प्रशासनाला दिला आहे.

शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची भेट घेऊन निवेदन दिले. शिष्टमंडळात उपशहारध्यक्ष बाळा दानवले, विशाल मानकरी, राजु सावळे, विभाग अध्यक्ष मयुर चिंचवडे, दत्ता घुले, सचिव रुपेश पटेकर, सिमा बेलापुरकर, संगीता देशमुख, विभाग अध्यक्ष श्रद्धा देशमुख, अनिता पांचाळ, वैशाली बौत्रे यांचा समावेश होता.

निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात तत्कालीन आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी तांत्रिक कारणे देत 24 नोव्हेंबर 2019 रोजी दिवसाआड पाणी पुरवठा चालू केला आहे. त्यावेळी शहरवासीयांना केवळ सहा महिने हा त्रास असेल. त्यानंतर नियमित पाणी पुरवठा होईल असे आश्वासन आयुक्त यांनी दिले होते.

आज जवळपास दोन वर्षापासुन दिवसाआड पाणी पुरवठ्याची टांगती तलवार शहरवासीयांच्या मानगुटीवर बसवली आहे. आंद्रा व भामा आसखेड धरणाच्या पाण्याचे गाजर अजुन किती दिवस लोकांना दाखविणार आहात. नागरिकांना दररोज पाणी द्यावे. अन्यथा मनसे आपल्या पद्धतीने आंदोलन करेल असा इशारा निवेदनातून दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.