Dehugaon : जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखीचे भाविकांकडून उत्साहात स्वागत

पालखीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी

एमपीसी न्यूज – जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांची पालखी आषाढीवारी संपवून पंढरपूरहून आज दुपारी दोनच्या सुमारास देहूनगरीत प्रवेश केला. यावेळी परिसरातील ग्रामस्थ व भाविकांनी पालखीचे महाद्वार कमानीमध्ये मोठ्या उत्साहात व मोठ्या भक्तीभावाने स्वागत केले. पालखी मंदिरात पोहचल्यानंतर भाविकांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. 

पालखीने देहूनगरीत प्रवेश केला त्याचवेळी जोरदार वरूणराजाच्या उपस्थितीत जलधारांनी देखील आपली कृपादृष्टी दाखवून पालखीचे जोरदार स्वागत केले. पालखी महाद्वार कमानीमध्ये आल्यानंतर येथील रामचंद्र तुपे यांच्या कुटुंबीयांकडून दही भाताचा नैवेद्य दाखवून बैलाचे व पालखी रथाचे औक्षण करून स्वागत केले. पालखीचे स्वागत करण्यासाठी परिसरातील तळवडे, विठ्ठलनगर, माळीनगर, चिंचोली, किन्हई, झेंडेमळा, येलवाडी, सांगुर्डी या गावातील भाविकांसह पालखी सोहळ्यात सहभागी न होऊ शकलेले हजारो भाविकांनी पालखीच्या स्वागतासाठी मोठी गर्दी केली होती.

तत्पूर्वी पालखी चिंचोली येथील शनीमंदिर परिसरातील पटांगणावर काही काळ विसावली होती. दुपारी एकच्या सुमारास पालखी विसावा संपवून देहूकडे मार्गस्थ झाली. पालखी देहूगावच्या वेशीमध्ये आल्यानंतर प्रथेप्रमाणे दहीभात नैवेद्य देऊन पालखी गावात आली. देहूचे ग्रामस्थांनी  पालखीचे प्रवेशद्वारावर कमानी जवळील ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर स्वागत केले. पालखी गावात हनुमान मंदिरासमोर आल्यानंतर अभंग घेण्यात आला. नंतर पालखी बाजारआळी मार्गे जन्मस्थान मंदिर व विश्वबंर महाराज मंदिरासमोर आल्यानंतर ‘श्री संताचीये माथा चरणावरी सांष्टांग हे करी दंडवत’ या अभंग गायन झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महारांची आरती घेतली.

पालखी महाद्वारात आल्यानंतर ‘तुझे द्वारीचा कुतरा / नको मोकलू दातारा // धरने घेतले दारात नको /उठवू धरोनी हात //’ हा अभंग घेऊन पालखीने मंदिरात प्रवेश केला. मंदिराच्या आवारात प्रदक्षिणा घालून पालखी संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरापुढे आली. येथे अभंग गायन झाल्यानंतर महाराजांची आरती झाली.

पालखी भजन मंडपात आल्यानंतर संत नामदेव महाराजांचा ‘देह जावा अथवा राहो / पांडूरंगी दृढ भाव // चरण न सोडी सर्वथा / आण तुझी पंढरीनाथा //’हा अभंग गायला.  या अभंगानंतर वारीत सहभागी झालेल्या सर्व दिंड्यांच्या विणेकऱ्यांना पालखी सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे, काशिनाथ महाराज मोरे व अजित महाराज मोरे यांच्या हस्ते मानाचा श्रीफळ प्रसाद देऊन पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली.

यावेळी संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे उपस्थित होते. संस्थानच्या वतीने सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यानंतर पालखी सोहळ्याची सांगता झाली. पालखी आगमना दरम्यान वाहतूक तळवडे शिव चौकातून बाह्यवळण मार्गावर वळविण्यात आली होती. पालखी माळीनगर येथे आल्यानंतर बाह्यवळण मार्गावरील वाहतूकही थांबविण्यात आली होती. दरम्यानच्या काळात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतुकीचे नियंत्रण वहातूक पोलीस निरिक्षक दिलीप भोसले
यांनी केले होते.

मात्र मोटारगाड्या व दुचाकी या वाहतुकीसाठी अडथळा ठरतच होत्या. तर स्थानिकांनी पालखी मार्गावर ठिकठिकाणी आपली वाहने लावल्याने काहीशी अडचण जाणवत होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.