Nigdi : राष्ट्रहितासाठी संगठन महत्वाचे – स्वामी प्रादीप्तानंद

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचा राष्ट्रीय पुरस्कार स्वामी प्रादीप्तानंद तर राज्य पुरस्कार प्रदीप बच्छाव यांना प्रदान

एमपीसी न्यूज- व्यक्तिहितापेक्षा देशहित महत्वाचे आहे. प्रत्येकाने देशहितासाठी काम करायला हवे. देशहित साधत असताना एकट्याने काम न करता सांघिकता महत्वाची आहे. संगठनात्मक कामातून देशहित लवकर साधता येईल, असे मत बेलडंगा पश्चिम बंगाल येथील भारत सेवाश्रम संघाचे स्वामी प्रादीप्तानंद (कार्तिक महाराज) यांनी व्यक्त केले.

निगडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे दरवर्षी देण्यात येणारा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार स्वामी प्रादीप्तानंद यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. धर्मजागृन समन्वय नाशिक विभाग संयोजक तसेच जनजाती परियोजना पश्चिम महाराष्ट्र प्रमुख प्रदीप हरिभाऊ बच्छाव यांना स्वातंत्र्यवीर सावरकर राज्य पुरस्काराने गौरविण्यात आले. हे पुरस्कार जगद्गुरू शंकराचार्य संस्थानमठ संकेश्वर-करवीर सच्चीदानंद अभिनव विद्यानरसिंहभारती स्वामी यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, मंडळाचे अध्यक्ष सतीश पाटील, कार्याध्यक्ष विनोद बन्सल, उपाध्यक्ष सदाशिव रिकामे, सचिव भास्कर रिकामे, सहसचिव प्रदीप पातळ, पक्षनेते एकनाथ पवार, माजी उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेवक अमित गावडे, चंद्रशेखर जोशी, विश्वास करंदीकर, जया बच्छाव, अनुजा वनमाळ, सुमन बच्छाव, शैलजा सांगडे, अॅड. मंजुषा कजवाडकर आदी ऊपस्थित होते.

पुरस्काराला उत्तर देताना प्रदीप बच्छाव म्हणाले, “भारतभूमी ही आपली माता आहे. तिचे आपल्यावर ऋण आहे. ते फेडणं आपलं कर्तव्य आहे. सामाजिक कामातून नागरिकांच्या अडचणींवर मात करून हे ऋण फेडता येईल. जनजाती परियोजनाच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील आदिवासी पाड्यांमध्ये समाजसेवेचे काम केले जात आहे. मिशन-यांचे जाळे उध्वस्त करून 15 हजार लोकांची घरवापसी यशस्वी केली आहे. अशा कामाची दखल स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळासारख्या संस्था घेत असल्याने काम करण्यास आणखी ऊर्जा मिळत आहे. यापुढील काळात देखील देशसेवेचे हे काम अधिक जोमाने होणार आहे.”

सच्चीदानंद अभिनव विद्यानरसिंहभारती स्वामी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने घेण्यात येणा-या विविध उपक्रमांचे कौतुक केले. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे काम उत्तरोत्तर वृद्धिंगत होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

विनोद बन्सल यांनी प्रास्ताविकात मंडळाच्या वतीने घेण्यात येणा-या उपक्रमांची माहिती दिली. मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि एक लाख रुपयांचा धनादेश असे राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप होते. तर मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि 51 हजार रुपयांचा धनादेश असे राज्य पुरस्कराचे स्वरूप होते.

स्वामी प्रादीप्तानंद यांनी त्यांना मिळालेली पुरस्कार राशी सामाजिक कार्यासाठी समर्पित केली. पुरस्कार राशीतील 50 हजार रुपये चापेकर स्मारक समिती संचालित सामाजिक समरसता गुरुकुलमला देण्यात आले. तर उर्वरित राशी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या सामाजिक कामासाठी दिली. चापेकर स्मारक समितीचे विलास लांडगे आणि शकुंतला बन्सल यांच्याकडे 50 हजार रुपयांची राशी स्वामी प्रादीप्तानंद यांच्या हस्ते देण्यात आली.

विनोद बन्सल यांनी प्रास्ताविक केले. भास्कर रिकामे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.