Pimpri: पवना धरणात 15 टक्के पाणी ; आजपर्यंतचा सर्वात कमी पाणीसाठा

एमपीसी न्यूज – पवना धरणात 15.68 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 15 जुलैपर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा असून आजपर्यंतचा सर्वांत कमी 15 टक्के पाणीसाठा यंदा धरणात राहिला आहे. मॉन्सून लांबणीवर पडल्यास मावळसह पिंपरी-चिंचवकरांना आणखीन पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ परिसरातील भागाला पाणीपुरवठा केला जातो. रावेत बंधा-यातून पाणी उपसा करुन महापालिकेतर्फे शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो. आजअखेर पवना धरणात 15.68 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाची पाणी क्षमता 10 हजार दशलक्ष घनमीटर आहे. महापालिकेने सुरवातीला आठवड्यातून एक दिवस पाणी बंद केले होते.

त्यानंतर पाणी समस्या तीव्र होण्याची शक्‍यता पाहता दिवसाआड पाणी कपात सुरू करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने पाणी कपात करण्याचे धोरण महापालिका प्रशासनाने अवलंबले आहे. गेल्या सात दिवसात केवळ 92 मिली पाऊस धरण क्षेत्रात पडला आहे. मॉन्सून लांबणीवर पडल्यास मावळसह पिंपरी-चिंचवकरांना आणखीन पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

पवना धरणाचे शाखा अभियंता ए.एम. गडवाल म्हणाले, ”पवना धरणात आजमितीला 15.68 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 15 जुलै पर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. धरण क्षेत्रात 92 मिली पाऊस पडला आहे. सुर्यप्रकाश कमी झाला आहे. वातावरण ढगाळ आहे. त्यामुळे बाष्पीभवन कमी झाले आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.