Chikhali : महापौरांच्या प्रभागात प्लास्टिक मुक्त अभियानास सुरुवात

एमपीसी न्यूज – स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत पिंपरी-चिंचवड हे शहर प्लास्टिकच्या कच-यापासून मुक्त करण्याची आवश्यकता आहे. त्याची सुरुवात महापालिका व सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस ऑर्गनायझेनशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने प्रभाग क्रमांक दोन जाधववाडी, चिखली येथे महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते झाली.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोबर 2014 पासून देशात स्वच्छ भारत अभियान व महाराष्ट्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. त्यास पाच वर्ष पूर्ण होत आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत अपेक्षित ध्येय साध्य करण्यासाठी 2 ऑक्टोबर 2019 पासून प्लास्टिक मुक्त अभियान चालविण्यात येणार आहे.

महापौर जाधव म्हणाले, देशात प्रत्येक दिवसाला साधारणत: 15 हजार टन प्लास्टिक कचरा जमा होतो. प्लास्टिक कच-याने वातावरण आणि निसर्गाची प्रचंड हानी होत आहे. प्लास्टिक कचरा मोकाट फिरणारी जनावरे, प्राणी यांनी खाल्यास त्यांना दुर्धर आजार होण्याची शक्यता असते. तसेच प्राण्यांचा जीव जाण्याचा धोका असतो. त्यामुळे कापडी पिशव्यांच्या वापरासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे.

याप्रसंगी महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते प्रभागातील महिलांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. तसेच नागरिकांनी प्लास्टिकच्या वस्तू वापरणे टाळावे, असे आवाहन देखील महापौर जाधव यांनी केले. यावेळी महापालिकेच्या क क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आरोग्यधिकारी बी. बी. कांबळे, आरोग्य निरीक्षक व्ही केंचनगोडार, प्रभागातील साफसफाई कर्मचारी तसेच सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस ऑर्गनायझेनशनचे  संतोष सिंग, उपनियंत्रक,  गोपाळ झा,  विनोद पाठक यांच्यासह प्रताप भांबे, संभाजी घारे, सुरेंद्र लोखंडे, कोंडीराम भांगे, दत्ता खबाले, प्रशांत राऊत,  भालचंद्र दरगूडे, अमर चांगभले व बचत गटातील असंख्य महिला कार्यक्रमास उपस्थित होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.