Pune : गायीचे धर्मापलीकडचे महत्व सर्वांपर्यंत पोहोचवा : डॉ. वल्लभभाई ​​कठिरिया

एमपीसी न्यूज- गो -संगोपनाचे महत्व भारतीय कृषी आणि अर्थकारणाच्या दृष्टीने महत्वाचे असल्याने, घरोघरी गोसेवा व्हावी, गायीचे धर्मापलीकडचे महत्व सर्वांपर्यंत पोहोचवावे ‘असे आवाहन रविवारी ‘राष्ट्रीय कामधेनू आयोग ‘ चे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री डॉ. वल्लभभाई कठिरिया यांनी पुण्यात केले.

गो -सेवा ,गो -संगोपन आणि कृषी क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था ,संघ परिवारातील स्वयंसेवक कार्यकर्त्यांची अनौपचारिक बैठक रविवारी सकाळी ‘कौशिकाश्रम ‘ (मित्रमंडळ ,पर्वती) येथे झाली . यावेळी सर्वांशी अनौपचारिक संवाद साधताना डॉ.कठिरिया यांनी हे आवाहन केले. गो सेवा समिती आणि आरोग्यभारती या संस्थांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता .

अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर हे होते . डॉ. शरद खरे यांनी प्रास्ताविक केले. बैठकीला राजेंद्र लुंकड, प्रदीप फासे, डॉ . सुहास गटणे यांच्यासहित 40 संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

डॉ कठिरिया म्हणाले, “गो सेवा ,गो -संगोपनाबद्दल आजही समाजात गैरसमज आहेत. गोसेवा हा विषय धार्मिक नाही तर कृषीविषयक,शास्त्रीय आणि आर्थिक आहे. भावना, आस्था, श्रद्धेच्या पलीकडे समाजात गो सेवा पोहोचवली पाहिजे .त्यामुळे पर्यावरण ,शेती ,शेतकऱ्यांना मदत होईल .

संयुक्त राष्ट्रसंघाने शाश्वत विकासासाठी जी उद्दिष्टे सर्वांसमोर ठेवली आहेत ,ती पूर्ण करताना गोपालन उपयुक्त ठरणार आहे . शहरातही विकास आराखड्यात गोपालनासाठी राखीव भूखंड ठेवले पाहिजेत,असेही डॉ. कठिरिया यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.