Pune : रस्ते कॉंक्रिटीकरणाची कामे तात्काळ थांबवा ; आयुक्तांना पत्र 

एमपीसी न्यूज – महापालिकेने सुरू केलेली तसेच मान्यतेच्या प्रक्रियेत असलेली गल्ली-बोळांमधील रस्ते कॉंक्रिटीकरणाची कामे तात्काळ थांबविण्यात यावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

गेल्या महिनाभरापासून महापालिका आणि जलसंपदा विभागात शहराच्या पाण्यावरून वाद सुरू आहेत. कालवा समितीच्या बैठकीत मंजूर झालेला पाणी कोटाच पालिकेने शहरासाठी वापरावा, अशी भूमिका घेत जलसंपदा विभागाने पाणी कमी केले आहे. परिणामी, पुण्यात एक वेळ पाणी देण्याची वेळ मनपावर आली आहे. त्यातही अनेक भागांत दीड ते दोन तासच पाणी मिळत आहे.

या पार्श्‍वभूमीवर मनपाने पाण्याची काटकसर करण्याचे उपाय तातडीने हाती घेण्याची मागणी मंचाने केली आहे. गेल्या काही वर्षांत मागणी नसताना गल्ली-बोळांत रस्ता कॉंक्रिटीकरणाचे पेव फुटले आहे. यंदाही अशी असंख्य कामे प्रस्तावित आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागणार आहे. एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याचे टॅंकर विकत घेण्याची वेळ येत असताना, दुसरीकडे कॉंक्रिटीकरणासाठी पाणी वापरणे हा अपव्यय आहे. दोन वर्षांपूर्वी पाणी कपातीचे संकट आले असताना तत्कालीन आयुक्तांनी अशा कामांना स्थगिती दिली होती. या वर्षीही अशा सर्व कामांना स्थगिती द्यावी, अशी मागणी मंचाने महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.